धर्मशास्त्रात लुडबूड नको !

सध्या ‘हिंदु धर्मावर टीका करणे’, ही जणू रूढी (‘फॅशन’) झाली आहे. अशी टीका करणारे स्वतःला फार शहाणे आणि ज्ञानी समजतात. त्यात त्यांना भूषण वाटते. प्रत्यक्षात ज्या विषयाचा अभ्यास नाही, त्या विषयावर काही बोलू नये, हा साधा व्यावहारिक नियमही धार्मिक विषयांवर बोलणार्‍यांना ठाऊक नसतो. प्रसारमाध्यमेही कुठलाही विषय असला, तरी त्या विषयातील तज्ञांची मुलाखत घेतात; मात्र जेव्हा जेव्हा धार्मिक विषय असतो, तेव्हा मुद्दामहून पुरोगाम्यांच्या, धर्म न मानणार्‍यांच्या, नास्तिकांच्या, हिंदुविरोधी किंवा ‘धर्माचरण म्हणजे बुरसटलेपणा’ असे मानणार्‍यांच्या प्रतिक्रिया घेतात. यात त्या व्यक्तीचाही प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू असतो आणि माध्यमांना त्यांची माध्यमे चालवायची असतात. दोघांच्याही स्वार्थी हेतूमुळे त्यांची, तसेच धर्माचीही हानी होते. त्यांच्या धर्मविषयक चुकीच्या दृष्टीकोनांमुळे समाजातील लोकांची दिशाभूल होऊ शकते. असत्य पसरवल्यामुळे इतरांमध्ये संभ्रम निर्माण होतो. बहुसंख्य हिंदु धर्मियांना आपल्या धर्माविषयी धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा टीकाकारांच्या टीकांना ते फसतात.

हे टीकाकार शास्त्राचा अभ्यास करत नाहीतच आणि साधनाही करत नाहीत. साधना केली, तरच येणार्‍या अनुभूतींमुळे ‘हिंदूंचे धर्मशास्त्र किती सत्य आहे ?’, याची प्रचीती येऊ शकते. अध्यात्म हे सूक्ष्मातील आणि अनुभवण्याचे शास्त्र आहे, तसेच स्पंदनांचे शास्त्र आहे. साधना केली, तर वृत्ती अंतर्मुख राहून मंदिरात पूर्ण वस्त्र घालून जाण्याचे महत्त्व लक्षात येऊ शकते. डोळे उघडले की दिसते, तसे साधनेने सूक्ष्म दृष्टी जागृत झाली की, सूक्ष्मातील कळते. ‘साधनेने सूक्ष्म दृष्टी जागृत होईपर्यंत बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच रहातात’, असे संत सांगतात. त्यामुळे अशा आंधळ्यांना आणि अज्ञानी लोकांना धर्मशास्त्राची महानता लक्षातही येऊ शकत नाही अन् अनुभवताही येऊ शकत नाही.

महाराष्ट्रात श्री सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी वस्त्रसंहिता घोषित केल्यावर तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘‘तो निर्णय लगेच मागे घ्यावा.’’ खरेतर असे सांगण्याचा तृप्ती देसाई यांना काय अधिकार ? त्या काय स्वतःला धर्माच्या ठेकेदार समजतात का ? एखाद्या मंदिरामध्ये जातांना ‘कुणी काय परिधान करावे ?’, हे ठरवण्याचा अधिकार संबंधित देवस्थानाचा असतो.  याआधी तृप्ती देसाई यांनी मंदिर प्रवेशाविषयी आंदोलन करून विरोध केला होता. हिंदुविरोधी तृप्ती देसाई इतर धर्मियांविषयी त्यांची मते मांडतात का ? पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून हिंदु धर्माविषयी बोलणार्‍यांनी धैर्य असेल, तर बुरखाच्या ‘ड्रेसकोड’विरोधात बोलावे ! ‘अभ्यासहीन धर्माचरणशून्य हिंदु धर्मियांना धर्माविषयी काही बोलण्याचा अधिकार नाही’, हे हिंदूंनी आता त्यांना निक्षून सांगितले पाहिजे.

– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.