नवी देहली – न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे ५१ वे सरन्यायाधीश होणार आहेत. सनन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी त्यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड १० नोव्हेंबर २०२४ या दिवशी निवृत्त होणार आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे नाव ज्येष्ठता सूचीत आहे.
६४ वर्षीय न्यायमूर्ती खन्ना १३ मे २०२५ या दिवशी निवृत्त होणार आहेत. त्यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ केवळ ६ महिन्यांचा असेल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती खन्ना यांनी ६५ निवाडे लिहिले आहेत. या कालावधीत ते अनुमाने २७५ खंडपिठांचा भाग राहिले आहेत. काश्मीरला लागू करण्यात आलेले कलम ३७० रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला काही याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये ५ न्यायाधिशांच्या खंडपिठाने सरकारच्या हा निर्णय कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. या खंडपिठामध्ये न्यायमूर्ती खन्ना यांचा समावेश होता.