हिंदुत्व जिवंत ठेवण्यासाठी स्वत:ची भूमिका निश्चित करा !

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन

पुणे – देशात हिंदुत्व जिवंत ठेवायचे असेल, तर रामायणातील खारीप्रमाणे स्वत:ची भूमिका निश्चित करा आणि येणार्‍या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान घडवून आणा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी पुणे येथे केले. ‘केशव माधव प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘सजग रहो’- विद्वेषमुक्त महाराष्ट्रासाठी आणि देशहितासाठी मतदान’ या विषयावर एस्.एन्.डी.टी. विद्यापिठातील तारापोर सभागृहात श्री. तोरसेकर बोलत होते.

व्यासपिठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजी भागाचे संघचालक अनिल व्यास, तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्त राजीव बेंद्रे आणि योगेश कुलकर्णी उपस्थित होते. व्याख्यानास मोठ्या संख्येने श्रोतृवर्ग उपस्थित होता.

श्री. भाऊ तोरसेकर

श्री. तोरसेकर यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे

१. आपण केवळ १०० टक्के मतदान करून उपयोग नाही, तर ते मतदान योग्य ठिकाणी, योग्य उमेदवार निवडण्याकरता करावे.

२. सेतू बांधताना खारीने हा विचार नाही केला, ‘मी न केल्याने ते काम होणार नाही.’ त्याच प्रकारे आपण येत्या निवडणुकीत ‘खारीचा वाटा’ बनून दायित्वाने काम करावे.

३. कुठलीही संस्कृती, समाज, राष्ट्र हे अभिमानावर टिकते. तुम्हाला जर कशाचाच अभिमान वाटत नसेल, तर तुम्ही रक्षण काय करणार ?

मुसलमान भारतात हिंदूंमुळेच सुरक्षित !

हिंदुत्व किंवा हिंदु असणे म्हणजेच ‘सेक्युलारिजम’ आहे. जगात कुठल्या इस्लामी राष्ट्रांमध्ये मुसलमान भारतापेक्षा सुखी आणि सुरक्षित आहेत ? मुसलमान भारतात हिंदूंमुळेच सुरक्षित आहेत. आणि हिंदुत्व टिकले, तर राज्यघटना टिकेल.

वास्तविक जिहाद म्हणजे इतर समाजाची इच्छाशक्ती मारून टाकणे !

आपण केवळ ‘जिहाद’ या एका शब्दाचा विचार करतो. पाकिस्तानचे ब्रिगेडियर एस्.के. मलिक यांनी त्यांच्या ‘युद्धाची कुराण संकल्पना’ या पुस्तकात आधुनिक जिहादचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात की, एखाद्याला मारणे, भूमी बळकावणे, बाँब फोडणे इत्यादी जिहाद नसून ती जिहादची साधने आहेत. वास्तविक जिहाद म्हणजे इतर समाजाची इच्छाशक्ती मारून टाकणे. एकदा इच्छाशक्ती नष्ट झाली की सगळ्या गोष्टी बळकावण्यास मार्ग मोकळा होतो, कारण तुमचे सगळ्या बाजूने खच्चीकरण झालेले असते.