भारत पुन्हा विश्वगुरु झाला पाहिजे ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

भांडुप आणि वसई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी !

भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

मुंबई – आजची युवा पिढी भोगवाद आणि चंगळवाद यांकडे जास्त झुकली आहे. आईला ‘मम्मी’ आणि वडिलांना ‘डॅड’ म्हणत पाश्चिमात्य संस्कृती अनुसरण करत आहे. संपूर्ण हिंदु समाज धर्म आणि संस्कृती विसरत आहे. जे काही मोजके लोक धर्मकार्य आणि संस्कृती जतन करण्याचे कार्य करतात, त्यांना मागे खेचण्याचे काम हिंदूच करत आहेत. या गर्तेतून आपल्याला गुरु बाहेर काढू शकतात. गुरूंनी सांगितलेले नाम, साधना, सेवा केली, तर आपली आणि समाजाची उन्नती होईल. अशा सात्त्विक समाजामुळे भारताला विश्वगुरु बनवणे शक्य होईल, असे मार्गदर्शन श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप पश्चिम आणि वसई पश्चिम येथे गुरुपौर्णिमा भावपूर्ण वातावरणात पार पडली. भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी वसई येथे मार्गदर्शन केले. भांडुप येथे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (डॉ.) नीलेश पावस्कर यांनी मार्गदर्शन केले.

भगवंताची भेट घालून देण्याचे कार्य केवळ गुरुच करू शकतात ! – अधिवक्ता (डॉ.) नीलेश पावस्कर, उच्च आणि सर्वोच्च न्यायालय

अधिवक्ता (डॉ.) नीलेश पावस्कर

जीवनात जोपर्यंत गुरु येत नाहीत, तोपर्यंत जीवनाला दिशा मिळत नाही. गुरूंचे स्थान ईश्वरापेक्षा मोठे आहे; कारण केवळ गुरुच आपली भेट भगवंताशी घालून देऊ शकतात. आपल्या सर्वांचे भाग्य थोर आहे; कारण आपल्या जीवनात परात्पर गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) आले आहेत.

दोन्ही गुरुपौर्णिमा महोत्सवांत शालांत, तसेच बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून गुणगौरव करण्यात आला, तसेच ‘आनंदी जीवन आणि रामराज्याची स्थापना यासाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शनही करण्यात आले.