सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी देहली येथील साधकांना आलेल्या अनुभूती

१. श्री. हरिकृष्ण शर्मा, नोएडा

१ अ. ‘ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमाला आरंभ होण्यापूर्वी दाराला कडी लावूनही दार आपोआप उघडणे आणि सर्व साधकांनी एकाच वेळी ‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आले आहेत’, असे म्हणणे : ‘ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमाला आरंभ होण्यापूर्वी आम्ही घरातील वातानुकूलित यंत्र (ए.सी.) चालू करून दाराला कडी लावली होती; परंतु दुपारी ३:३० वाजता दार आपोआप उघडले. तेव्हा मला असे वाटले की, ‘कुणीतरी बाहेरून दाराला धक्का मारला आहे; परंतु जेव्हा मी बाहेर वाकून पाहिले, तेव्हा तेथे कुणीच नव्हते. तेव्हा सर्व साधकांनी एकाच वेळी म्हटले, ‘‘गुरुदेव आले आहेत.’’ त्यानंतर सर्वांनाच पुष्कळ आनंद आणि उत्साह वाटला.’

२. श्री. वैभव शर्मा, नोएडा

२ अ. ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम पाहिल्यानंतर दुपारी ‘राम सियाराम’ हे भजन ऐकतांना, तसेच पाक्षिक ‘सनातन प्रभात’मधील गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) श्रीराम रूपातील छायाचित्र पाहिल्यावर अधिकच भावजागृती होणे : ‘१२.५.२०२३ या दिवशी दुपारी मी माझ्या संगणकात ‘राम सियाराम’ हे भजन ऐकत होतो आणि संगणकाच्या पटलाशेजारी असलेल्या सुखासनावर बसून भजन ऐकतांना स्वतःही गात होतो. मी डोळे बंद करून ऐकू लागल्यावर माझी भावजागृती झाली. अकस्मात् गुरुदेवांचे छायाचित्र डोळ्यांसमोर तरळले. नंतर जेव्हा मी डोळे उघडून पटलावर पाहिले, तेव्हा मला चैतन्य मिळण्यासाठी वर्ष २०२१ चे एक पाक्षिक ‘सनातन प्रभात’ दिसले. त्यामध्ये गुरुदेवांचे श्रीराम रूपातील छायाचित्र होते. ते पहाताच माझी अधिकच भावजागृती झाली.’

३. सौ. राजरानी माहुर, ग्रेटर नोएडा

३ अ. ‘ब्रह्मोत्सव होणार आहे’, अशी सूचना मिळाल्यावर पुष्कळ आनंद होणे आणि ब्रह्मोत्सवात साधिकांनी नृत्य सादर केल्यावर ‘ते सर्व पृथ्वीवर होत नसून कोणत्या तरी देवलोकात होत आहे’, असे वाटणे : ‘ब्रह्मोत्सव होणार आहे’, अशी सूचना मिळाल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आणि कृतज्ञता वाटली. गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) जन्मोत्सव साजरा करण्याची सूचना केव्हा मिळणार ?’, असे माझ्या मनात वारंवार येत होते. ब्रह्मोत्सवाच्या वेळी गुरुदेव रथातून मार्गक्रमण करत असतांना तिन्ही मोक्षगुरूंनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) प्रत्यक्षात माझ्याकडे पाहिले. साधिकांनी नृत्य सादर केल्यावर ‘ते सर्व पृथ्वीवर होत नसून कोणत्या तरी देवलोकात होत आहे’, असे मला वाटले.’

४. सौ. तारा यादव, नोएडा

४ अ. ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी वहाणार्‍या थंड हवेतील गारवा देहली येथेही अनुभवता येणे : ‘११.५.२०२३ या दिवशी ब्रह्मोत्सवाच्या वेळी चमेलीच्या फुलांचा सुगंध संपूर्ण कार्यक्रमभर येत होता आणि अधून-मधून मंद थंड हवा जाणवत होती. ‘गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव जेथे चालू होता, तेथे जी थंड हवा वहात होती, तिचा गारवा मला देहली येथे जाणवत आहे’, असे मी अनुभवले.’

५. श्रीमती आशा आनंद, देहली (वय ८० वर्षे)

५ आ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी ५ घंटे सलग बसूनही कोणताही त्रास न होणे : ‘मी दोन घंटे जरी आसंदीवरून पाय खाली सोडून बसले, तर मला पायावर सूज येते; परंतु ब्रह्मोत्सवाच्या दिवशी ५ घंटे सलग बसूनही माझ्या पायांवर सूज आली नाही आणि कसलाही त्रास झाला नाही. गुरुदेवांची ती मनमोहक मूर्ती अजूनही माझ्या डाेळ्यांसमोरून जात नाही.’

६. सौ. मंजुला कपूर, देहली (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५६ वर्षे)

६ अ. ब्रह्मोत्सव पहातांना संपूर्ण वेळ तिन्ही मोक्षगुरूंनी भावस्थितीत राहून सर्वांना भावविभोर करणे आणि रथातून दिव्य तेजस्वी प्रकाश प्रक्षेपित होणे : ‘ब्रह्मोत्सव पाहून मला असे वाटले, ‘आमची काही पात्रता नसतांनाही प.पू. गुरुदेव आम्हा सर्व साधकांना सप्तद्वारे ओलांडून वैकुंठात घेऊन गेले आहेत. संपूर्ण वेळ तिन्ही मोक्षगुरूंनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) भावस्थितीत राहून आम्हा सर्वांना भावविभोर केले. रथातून दिव्य तेजस्वी प्रकाश प्रक्षेपित होत होता. रथ ओढणारे सर्व साधक तेजस्वी प्रकाशयुक्त दिसत होते. सर्व सद्गुरु आणि सर्व संत या सर्वांकडून तेजस्वी दिव्य प्रकाश येत होता.

६ आ. सहस्रारचक्रात पुष्कळ जोरात हालचाल होऊन वेदना होणे आणि नंतर शीतलता जाणवणे, रथयात्रेच्या वेळी सर्व साधक अन् रथ यांच्या चोहोबाजूंनी तेजस्वी प्रकाश प्रक्षेपित होणे : माझ्या सहस्रारचक्रात पुष्कळ जोरात हालचाल होऊन वेदना झाल्या. नंतर थोडीशी शीतलता जाणवली. गुरुदेव त्या रथाच्या चाकाला माझे मन बांधून घेऊन जात आहेत. मला चुकांमधून मुक्त करून ‘माझ्या हृदयात तिन्ही मोक्षगुरु विराजमान झाले आहेत’, याची वारंवार जाणीव करून देत होते. रथयात्रेच्या वेळी सर्व साधक आणि रथ यांच्या चोहोबाजूंनी तेजस्वी प्रकाश प्रक्षेपित होत होता. तिन्ही मोक्षगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) दर्शनामुळे सतत शक्ती मिळत होती. ‘प्रत्येक क्षणी गुरुचरणांचे दर्शन घेतच रहावे’, असा ध्यास लागला होता.’ (सर्व सत्रांचा दिनांक १९.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक