तळमळीने सेवा करणार्‍या मथुरा सेवाकेंद्रातील सनातनच्या साधिका मनीषा माहुर (वय २९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

कु. मनीषा माहुर (उजवीकडे) यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

रामनाथी (गोवा) – येथील सनातनच्या आश्रमात ११ जुलै या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एका शिबिरामध्ये मूळ देहली येथील निवासी आणि मथुरा येथील सेवाकेंद्रात राहून साधना करणार्‍या कु. मनीष माहुर (वय २९ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांचा सत्कार श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भेटवस्तू देऊन केला. या वेळी सनातनचे संत आणि साधक उपस्थित होते.

आध्यात्मिक पातळी घोषित केल्यानंतर कु. मनीषा माहुर यांनी व्यक्त केलेले मनोगत

साधनेत अल्पसंतुष्ट होऊन न थांबता पुढे जायचे आहे ! – कु. मनीषा माहुर

कु. मनीषा माहुर

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनीच माझा हात पकडून माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करून घेतले आहेत. आता साधनेत अल्पसंतुष्ट होऊन थांबायचे नाही, तर अजून पुढे जायचे (प्रगती करायची) आहे.

भाव आणि तळमळ असणारी अन् सर्वांचा आईप्रमाणे सांभाळ करणारी कु. मनीषाताई ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

या वर्षी जानेवारी महिन्यात मनीषाताईची भेट झाली, तेव्हा असे लक्षात आले की, ती बरीच स्थिर होती. ती आईप्रमाणे सर्वांना सांभाळत होती. साधनेच्या विचारातही प्रगल्भता जाणवत होती. ती सेवांचे नियोजनही चांगल्या प्रकारे करत होती. तिच्यात भाव आणि तळमळही जाणवली. आता तिने जे सांगितले ते महत्त्वपूर्ण आहे की, तिला साधनेत अल्पसंतुष्ट न रहाता भगवंताच्या चरणी समर्पित व्हायचे आहे.

‘समष्टीमध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासारखे बनायचे आहे’, असे ध्येय ठेवून प्रयत्न करणार्‍या कु. मनीषा माहुर ! – सद्गुरु चारुदत्त पिंगळे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१२ वीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवूनही मनीषाताईंनी पूर्ण वेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. घरी स्वयंपाक करण्याची सवय नव्हती; पण आश्रमात येऊन तिने सर्व सेवा शिकून घेतल्या. आता आश्रमातील सेवा, गृह व्यवस्थापन, सत्संगांचे दायित्व, ‘वर्ल्ड बुक फेअर’ सारख्या कार्यक्रमांचे नियोजन आदी सेवा त्या करत आहेत. परिस्थिती स्वीकारणे, आज्ञापालन करणे हे गुण स्वतःमध्ये आणण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी त्यांना एकदा ‘तू लवकर पुढे जाशील’, असे सांगितले होते. त्या एका वाक्यातून प्रेरणा घेऊन मनीषाताईंनी, ‘मला समष्टीमध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंसारखे बनायचे आहे’, असे ध्येय घेऊन साधनेचे प्रयत्न केले.