भारतीय संसदेच्या निवडणुका आणि इस्लाम !

१. नेहमी मानवतेचे पुजारी राहिलेले हिंदू !

श्री. प्रशांत पोळ

‘डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे हे मराठीतील प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक होऊन गेले. त्यांनी अनेक वैचारिक निबंध लिहिले. भारत पारतंत्र्यात राहिल्याविषयीही त्यांनी लिहून ठेवले आहे. हिंदु धर्मात एक चांगली संत परंपरा राहिली आहे. जेथे जेथे हिंदु धर्माचा प्रसार झाला, तेथे तेथे संत-महंत झाले. त्यांनी समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे. लोकांना न्याय, नैतिकता, सत्य आणि अहिंसा यांचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले, तसेच देवाची भक्ती केली. समाजाला योग्य दिशेने नेण्याचे हे वारे अखंड भारतात सर्वत्र वाहत असल्याचे दिसते. आपल्या समाजाचे नेतृत्व आणि राजे-महाराजे यांनीही या दिशेने वाटचाल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आपण स्वतःहून कधी कुणावर आक्रमण केलेले नाही. कोणताही हिंदु राजा कधीही आक्रमक झालेला नाही. हिंदु राजाने युद्धात शत्रूवर क्रौर्य किंवा रानटीपणा दाखवल्याचे उदाहरण नाही. आपण सहनशील राहिलो आणि आलेल्या विदेशी नागरिकांचे स्वागत करत राहिलो.

२. धर्म आणि न्याय यांचा मार्ग अवलंबणार्‍या हिंदूंना काय मिळाले ?

हिंदू नेहमी धर्म आणि न्याय यांचा मार्ग अवलंबत राहिले. त्या बदल्यात त्यांना गुलामगिरी, गरिबी मिळाली, आपल्यावर अत्याचार झाले, अपमान झाला, आपली संपत्ती गेली, आपले स्वातंत्र्य जात राहिले आणि आपल्या सुना-मुलीही जात राहिल्या. उलट आपल्यावर आक्रमण करणार्‍यांनी काय केले ? त्यांनी अनेक चुकीचे आणि अनैतिक मार्ग स्वीकारले. छळ आणि बलात्कार यांचा अवलंब केला. क्रौर्याची उंची गाठली, युद्धाचे सर्व नियम मोडले, बलपूर्वक धर्मांतर केले आणि सुना-मुलींची अब्रू लुटली. या बदल्यात मुसलमान, इंग्रज, पोर्तुगीज आणि फ्रेंच आक्रमकांना काय मिळाले ? त्यांना ऐश्वर्य प्राप्त झाले, स्वातंत्र्य मिळाले, सत्तेचा उपभोग घेतला. सर्व पापे करूनही मुसलमान आणि ख्रिस्ती आक्रमकांना हे सर्व मिळाले अन् सर्व चांगली कामे करूनही आपल्याला गुलामगिरी आणि गरिबी मिळाली. असे का ?

३. हिंदूंना समष्टी धर्माचे विस्मरण

मुसलमान आणि ख्रिस्ती आक्रमकांनी एकच धर्म पाळला अन् आपण हिंदु धर्म पाळण्याच्या नादात धर्माचे मर्म विसरलो आहोत, तो म्हणजे संघधर्म किंवा समष्टी धर्म. ज्याचा वेगळा भाग आहे – ‘राष्ट्र सर्वप्रथम’ आणि हेच आपण विसरलो. या लोकसभा निवडणुकीतही हीच गोष्ट समोर आली. आम्ही ५५० वर्षांनी अयोध्येत भगवान श्रीरामाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याचे भव्य मंदिर बांधले. काशीतील त्रिलोकाचे भगवान शंकराच्या काशीविश्वेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरणही केले. उज्जैनमध्ये महाकाल लोक साकारला, देवाची मनोभावे पूजा केली, संतांचा सन्मान केला. त्यानंतर वडिलधार्‍यांना तीर्थक्षेत्रांना भेटी द्यायला लावल्या, राष्ट्रवादी विचारांच्या लोकांनी निवडणुका जिंकाव्या; म्हणून मंदिरांमध्ये पूजा केली. आपले पंतप्रधान मोदी यांनी देवी पार्वतीची तपोभूमी कन्याकुमारी येथे अहोरात्र तपश्चर्या केली. आपल्याला काय मिळाले ? विजय मिळाला; पण तोही अपेक्षेप्रमाणे नाही.

४. मुसलमानांची दिशा देशाच्या भवितव्यासाठी धोकादायक

जे आपल्या विरोधात लढले, तेही आपापसांत लढले आणि चुकीच्या लोकांशी लढले; पण उत्तरप्रदेश असो, बंगाल असो कि महाराष्ट्र… आपल्याला आपल्या पूर्वीच्या स्थितीतूनही मागे हटावे लागले. कोणती कारणे होती ?      पराभवाची अनेक कारणे होती; पण महत्त्वाची गोष्ट होती, ‘त्यांनी’ समष्टी धर्माचे पालन केले, जे आपण केले नाही. मुसलमानांची ‘मतदान पद्धत’ हे एक प्रमुख कारण होते. या निवडणुकीतून एक गोष्ट समोर आली आहे. देशातील मुसलमानांना काय म्हणायचे आहे, हे या निवडणुकीतून बरेच काही स्पष्ट होत आहे आणि ते देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे.

५. मुसलमान मतदारांची राष्ट्रीय स्तरावर संघटित कृती

‘इंडिया टीव्ही’चे रजत शर्मा यांच्या एका ध्वनीचित्रफितीत मौलवी कोणतेही आढेवेढे न घेता अगदी स्पष्टपणे सांगत आहे, ‘‘आम्हाला काहीही करून कोणत्याही परिस्थितीत भाजपचा पराभव करायचा आहे. समोर मुसलमान उमेदवार असला तरीही.  भाजपला पराभूत करण्याची क्षमता त्यांच्यात नसेल, तर त्यालाही मत देऊ नका. जो उमेदवार भाजपला हरवू शकेल, त्यालाच मत द्या.’’ देशभरातील मुसलमानांनी जमेल तिथे हे केले, हे सर्वांत गंभीर होते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे वर्ष २०१९ मध्ये २ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. या वेळी काँग्रेसकडून डॉ. (सौ.) शोभा बच्छाव या उमेदवार होत्या. धुळे लोकसभेत एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी ५ विधानसभा मतदारसंघात भाजपने १ लाख ९० सहस्रांहून अधिक मतांची आघाडी घेतली; पण एकट्या मालेगाव (मध्य)मध्ये काँग्रेसला १ लाख ९४ सहस्र मतांची आघाडी दिली आणि भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांचा अवघ्या ३ सहस्र ८३१ मतांनी पराभव झाला. मालेगाव (मध्य) हा पूर्णपणे मुसलमानबहुल परिसर आहे. येथील आमदार हा ओवैसी यांच्या ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचा आहे. येथे एकूण २ लाख ५ सहस्र मते पडली. त्यापैकी १ लाख ९८ सहस्र ८६९ मते काँग्रेसला गेली.

या निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन समाज आघाडी’चे जहूर अहमद महंमद हेही रिंगणात होते; मात्र मुसलमान मतदारांनी त्यांना पूर्णपणे नाकारले. त्यांना ५ सहस्र मतेही मिळाली नाहीत. रणनीतीचा एक भाग म्हणून मुसलमानांनी त्यांची सर्व मते डॉ. (सौ.) बच्छाव यांना देऊन त्यांचा विजय निश्चित केला. याला एकटा धुळे लोकसभा मतदारसंघ अपवाद नाही. जवळपास सर्वत्र असेच घडले.

६. ‘मोदी’ नावाच्या भीतीने मुसलमानांची एकगठ्ठा मते ठाकरेंच्या पदरात !

महाराष्ट्रात मुसलमान सर्वाधिक द्वेष आणि तिरस्कार ‘ठाकरे’ नावाचा करत होते आणि ‘ठाकरे’ या नावाला घाबरत होते. वर्ष १९९२ च्या दंगलीनंतर मुसलमानांसाठी सर्वांत तिरस्कृत व्यक्ती म्हणजे ‘बाळासाहेब ठाकरे’ ! अलीकडेपर्यंत मुसलमान शिवसेनेवर अप्रसन्न होते; पण या लोकसभेत एक चमत्कार घडला. मुसलमानांनी त्यांची सर्व मते उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार जिथे जिथे होते, तिथे तिथे त्यांना ‘हस्तांतरित’ केली. अर्थात् त्या मौलवीच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करण्यात आले. कारण एकच, त्यांना उद्धव ठाकरेचे उमेदवार भाजपला हरवू शकतात, असे वाटत होते. मुंबईतील मुसलमानबहुल भागातही उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पुढे होते.

७. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसलमानांची खेळी अयशस्वी

मुसलमानांची रणनीती केवळ महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात अयशस्वी ठरली. तेथे वर्ष २०१९ मध्ये ओवैसींच्या ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे इम्तियाज जलील निवडून आले होते. त्या वेळी त्यांनी भाजप आणि अविभाजित शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. त्यामुळे या वेळी मुसलमानांना हे प्रकरण काहीसे सोपे वाटले. शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यात मतांची विभागणी होईल अन् ‘एम्.आय.एम्.’चे इम्तियाज जलील सहज निवडून येतील, असा त्यांचा कयास होता. त्यामुळे महाराष्ट्रातील हा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे, जेथे मुसलमानांनी त्यांची मते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हस्तांतरित केली नाहीत. येथील हिंदु समाजात इम्तियाज जलील यांच्या वर्ष २०१९ च्या विजयाने डंख मारला होता. त्यामुळे शिंदे शिवसेनेच्या डॉ. संदिपान भुमरे यांच्या बाजूने मोठ्या संख्येने हिंदु मतांचे ध्रुवीकरण झाले आणि त्यांनी १ लाख ३५ सहस्र मतांनी निवडणूक जिंकली.

८. बंगालमध्ये मुसलमान खासदार निवडून देण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव

बहरामपूर हा मुसलमानबहुल परिसर आहे. येथे ५२ टक्के मुसलमान मतदार आहेत. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी वर्ष १९९९ पासून येथे निवडणूक जिंकत आहेत. ते काँग्रेस पक्षाचे नेते आणि भाजपचे कठोर टीकाकार आहेत. असे असतांनाही या वेळी रणनीतीचा भाग म्हणून तृणमूल काँग्रेसने गुजरातमधील युसूफ पठाण याला येथून निवडणूक लढवायला लावली. ‘मां, माटी, मानुष’चा नारा देणार्‍या तृणमूल काँग्रेसने बंगाली भाषेचा ‘ब’ही येत नसलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली; पण मुसलमान समाजाची रणनीती अगदी स्पष्ट होती. कोणताही संभ्रम आणि गोंधळ नव्हता. या वेळी त्यांना बहरामपूरमधून मुसलमान उमेदवार निवडून आणायचा होता आणि त्यांनी ते केले. तेही गेली अनेक वर्षे मुसलमानांचे समर्थन करून राजकारण करणार्‍या अधीर रंजन चौधरी यांचा पराभव करून !

ही केवळ काही उदाहरणे आहेत; परंतु संपूर्ण देशात ही पद्धत थोड्या फार प्रमाणात सारखीच राहिली. लोकसभेच्या अनेक जागांवर मुसलमान उमेदवार आपापसांत भिडले; मात्र मुसलमान मतदारांची मानसिकता स्पष्ट होती. छत्रपती संभाजीनगरसारखे एक-दोन अपवाद वगळता भाजपला कोणता उमेदवार पराभूत करू शकतो, हे त्यांना ठाऊक होते. त्यालाच त्यांनी मतदान केले.

९. मुसलमानांचा भाजपला विरोध का ?

या निवडणुकीत मुसलमानांकडून भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. याचे उत्तरही स्पष्ट आहे. या सर्व घटना भारताच्या फाळणीच्या दिवसांची आठवण करून देतात. त्या वेळी मुसलमान समाज संघटित होऊन काँग्रेसचा पराभव करत होता आणि तरीही काँग्रेसला मुसलमान समाज त्यांच्या पाठीशी असल्याचे वाटत होते. कदाचित् अशा अपसमजात भाजप न फसला, म्हणजे मिळवले !’ – श्री. प्रशांत पोळ, अभियंता आणि लेखक, जबलपूर, मध्यप्रदेश. (साभार : फेसबुक)