कारगिल युद्धाची वीरगाथा आणि ‘ऑपरेशन विजय’ (विजय मोहीम) !

आज ‘कारगिल विजय दिवस’ आहे. त्या निमित्ताने….

२६ जुलै २०२४ ला कारगिल युद्धाला २५ वर्षे पूर्ण होतील. कारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतियाच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. २६ जुलै १९९९ हा दिवस ‘भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेमधील सोनेरी पान’ म्हणून सर्व भारतियांच्या कायम लक्षात राहील. काश्मीरच्या सीमेवर अनुमाने २ लाख सैनिक पहारा देत आहेत; पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ एक ब्रिगेड, म्हणजे ३ ते ४ सहस्र सैनिक तैनात केलेले होते. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवर स्वतःचे सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केले. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ सहस्र ते १८ सहस्र फूट उंचीवर आहे. तिथे वर्षातून ६ मास बर्फ पडतो आणि भूमीवर बर्फ साचलेला असतो. २६ जुलै १९९९ या दिवशी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या कह्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी २६ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो.

जगभरात उंच पर्वतांमध्ये झालेल्या युद्धांपैकी ‘कारगिल युद्ध’, हे एक उदाहरण आहे. पाकिस्तानचे किमान ४ सहस्र सैनिक या युद्धात मारले गेले. भारतीय लष्करातील ५४३ अधिकारी आणि सैनिक यांना या युद्धात वीरमरण आले, तर १ सहस्र ३०० सैनिक घायाळ झाले. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांचा वयोगट १९ ते २८ असा होता.

कारगिल विजय दिवस

१. पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्यामागील कारणे

वर्ष १९९९ मध्ये पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याला २ कारणे होती. पाकिस्तानला सियाचिन सीमेवर असलेल्या भारतीय सैन्याची रसद तोडण्याकरता कारगिल-श्रीनगर या मार्गावर कब्जा करायचा होता. दुसरे जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादाला पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने याआधी दुर्लक्षित असलेल्या भागाकडे भारतीय सैन्याचे लक्ष एकवटण्यास भाग पाडायचे होते.

बिग्रेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

२. कारगिल मुक्तीसाठी राबवलेले ‘ऑपरेशन विजय’ !

विशेष तुकडीच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच ‘नॉर्दन लाईट इन्फट्री’च्या ११ बटालियन तुकड्या या युद्धात गुंतवल्या होत्या. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय’ या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कारवाई चालू केली. भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता रेजिमेंटल आणि बटालियन यांच्यापुरतीच कारवाई शक्य होती. त्यामुळे सैन्याची संख्या केवळ २० सहस्रांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. ‘टायगर हिल’ आणि ‘तोलोलिंग’ येथे झालेला संग्राम हा भारतीय सैनिकांच्या साहसाच्या पराक्रमाचा कळस होता.

हा भाग प्रचंड डोंगराळ असल्याने या भागात तंत्रज्ञान अणि क्षेपणास्त्र यांचा फारसा उपयोग होत नव्हता. हे युद्ध पायदळाचे होते. पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष आक्रमण करून त्यांना मारावे लागत होते. या युद्धात ४ ‘परमवीर चक्र’, ४ ‘महावीर चक्र’, २९ ‘वीरचक्र’ आणि ५२ सेना पदके प्रदान करण्यात आली होती.

कारगिल युद्धात अतिशय क्रौर्यतेने ठार मारलेल्या लेफ्टनंट सौरभ कालिया यांचे नाव आजही भारतियांच्या जीभेवर आहे. मे १९९९ या दिवशी एका स्थानिक मेंढपाळाकडून मिळालेल्या माहितीनंतर बटालिक सेक्टरमध्ये लेफ्टनंट सौरभ कालिया त्यांच्या सहकार्‍यांसह गस्तीवर गेले होते. या वेळी पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्यावर जोरदार आक्रमण केले. या आक्रमणामुळे तेथील घुसखोरी उजेडात आली.

३. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या अधिकार्‍यांचे वीररसयुक्त बोल

३ अ. कॅफ्टन विक्रम बत्रा – ‘विजयी ध्वज रोवून किंवा त्यात लपेटून (गुंडाळून) येईन !’ : कारगिल युद्धात हुतात्मा झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांचे सहकारी त्यांना ‘शेरशाह’ असे म्हणत. केवळ १८ मासांपूर्वी भारतीय लष्करात भरती झालेले बत्रा त्यांच्या ऐतिहासिक संदेशासाठी स्मरणात रहातात. बत्रा यांनी युद्धावर जाण्यापूर्वी सांगितले होते, ‘भारताचा विजयी ध्वज रोवून परत येईन किंवा त्यात लपेटून येईन.’

त्यांच्या कंपनीला ‘पॉईंट ५१४०’ हे शिखर पाकिस्तानी लष्कराच्या तावडीतून परत घेण्याचा आदेश मिळाला होता. त्यांनी शत्रूची दिशाभूल करण्यासाठी शिखराच्या दुसरीकडून चढण्याची योजना आखली होती. त्यात त्यांना यश आले. बत्रा यांनी पाकिस्तानी लष्कराच्या ३ सैनिकांना ठार मारले; परंतु या लढाईत ते घायाळ झाले, तरीही ते लढत राहिले. २० जून १९९९ या दिवशी पहाटे ३.३० वाजता त्यांच्या कंपनीने शिखर ताब्यात घेतले. शिखर ताब्यात आल्यावर बत्रा म्हणाले होते, ‘ये दिल मांगे मोर.’ (हे हृदय अजून मागत आहे.) त्यांच्या याच शब्दांमध्ये त्यांची विरता दडलेली आहे. ८ जुलै १९९९ या दिवशी भारतीय लष्कराने ऐतिहासिक यश मिळवत १६ सहस्र फूट उंचीवर असलेले ‘४८७५ शिखर’ परत मिळवले; परंतु या मोहिमेत कॅप्टन बत्रा कामी आले. ‘४८७५ शिखर’ सर करतांना बत्रा यांनी त्यांच्या सहकार्‍यांना समवेत येण्यास मनाई केली. ‘तुमच्या मागे मुले आहेत’, असे ते अन्य सैनिकांना म्हणत पुढे गेले होते. बत्रा यांना ‘मरणोपरांत परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आले.

३ आ. १५ मीटर अंतरावरून शत्रूशी लढणारे कॅप्टन विजयंत थापर ! : ‘राजपूताना रायफल्स’मध्ये असलेले कॅप्टन विजयंत थापर यांना कारगिल युद्धात ‘डर्टी डझन’ या १२ सदस्यांच्या घातकी पथकाचे प्रमुख करण्यात आले होते. त्यांच्याकडे टोलोलिंग शिखर सर करण्याचे उत्तरदायित्व देण्यात आले होते. १२ जून १९९९ च्या रात्री विजयंत यांनी त्यांच्या तुकडीचे (‘प्लाटून’चे) नेतृत्व केले. टोलोलिंग सर केल्यानंतर त्यांना ‘पिंपल्स’ आणि ‘नॉल’ शिखर सर करण्याचे उत्तरदायित्व सोपवण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास त्यांनी कठीण पर्वत चढून शत्रूच्या चौकीजवळ ठाण मांडले. शत्रूच्या चौकीवर जोरदार आक्रमण केले. त्यांनी केवळ १५ मीटर अंतरावरून पाकिस्तानी लष्कराच्या अनेक सैनिकांना ठार मारले. यात त्यांना वीरमरण आले.

‘बॅटल ऑफ थ्री पिंपल्स’मध्ये कॅप्टन विजयंत यांना शिखर कह्यात घ्यायचे होते. विजयंत यांच्या तुकडीचे कमांडर मेजर पी. आचार्य हुतात्मा झाले, तेव्हा त्यांनी ‘कमांड’ (सूत्रे) आपल्या हातात घेतली. २२ वर्षांचे विजयंत केवळ काही मासांपूर्वी भारतीय लष्करात भरती झाले होते. त्यांना ‘मरणोपरांत वीरचक्र’ बहाल करण्यात आले.

पाकिस्तानी चौकीवर आक्रमण करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, ‘जर तुम्हाला शक्य असेल, तर येथे येऊन बघा, तुमच्या भविष्यासाठी भारतीय लष्कराने कुठे युद्ध लढले !’ विजयंत यांचे वडील कर्नल व्ही.एन्. थापर (निवृत्त) प्रत्येक वर्षी सहस्रो किलोमीटरचा प्रवास करून स्वतःचा मुलगा जेथे हुतात्मा झाला होता तेथे जातात. मुलाला श्रद्धांजली देण्यासाठी त्याने दिलेला शब्द ते पाळतात.

३ इ. कॅप्टन मनोज पांडे यांचे अंतिम शब्द – ‘त्यांना सोडू नका !’ : ‘खालूबर रिजलाईन’ला पाकिस्तानी सैनिकांच्या तावडीतून सोडवतांना कॅप्टन मनोज पांडे हुतात्मा झाले. कारगिल सेक्टरमधील खालूबर रिजलाईन अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण होते. त्यावर पाकिस्तानी लष्कराने ताबा मिळवला होता. २३ जुलैच्या रात्री पाकिस्तानी सैनिकांनी कॅप्टन पांडे आणि त्यांच्या पथकावर तुफान गोळीबार केला. शत्रू पक्षाचे लक्ष विचलित करण्याचे दायित्व पांडे यांना देण्यात आले होते. त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या २ सैनिकांना ठार मारून पहिल्या ठिकाणावर ताबा मिळवला. त्यानंतर आणखी २ सैनिकांना मारून दुसरे ठिकाण मिळवले. तिसर्‍या ठिकाणावर आक्रमण करतांना त्यांचा खांदा आणि पाय यांना दुखापत झाली. त्यांनी घायाळ अवस्थेतही शत्रूपक्षावर गोळीबार चालू ठेवला. कॅप्टन पांडे आणि त्यांच्या सहकारी यांनी चौथे ठिकाणही कह्यात घेतले. या वेळी पाकिस्तानी लष्कराची एक गोळी कॅप्टन मनोज यांच्या डोक्याला लागली आणि ते हुतात्मा झाले. या वेळी त्यांचे अंतिम शब्द होते, ‘ना छोडनू.’ (नेपाळी भाषेचा मराठी अर्थ ‘त्यांना सोडू नका !’) २४ वर्षांच्या पांडे यांना ‘मरणोपरांत परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आले.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.

शस्त्रापेक्षा शस्त्र चालवणारा सैनिक अधिक महत्त्वाचा !

द्रास गावामध्ये ‘कारगिल युद्ध स्मारक’ बांधलेले असून तेथे अनेक पर्यटक भेटीसाठी जातात. तिथे गेल्यानंतर हिमशिखरे दिसतात आणि आपण नकळतपणे कारगिल युद्धामध्ये लढलेले सैनिक अन् वीरगती मिळालेले हुतात्मा सैनिक यांच्यापुढे नतमस्तक होतो. आपल्याकडे या पराक्रमाला किंवा सैनिकांच्या या बलीदानाला पाहिजे तितके महत्त्व दिले जात नाही. कितीही मोठे तंत्रज्ञान आले, तरी युद्ध जे जिंकले जाते, ते सैनिकांच्या जोरावरच ! जे राष्ट्र आपल्या सैनिकांना विसरते, ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही ! आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबळ आवश्यक आहे. इतकेच नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून स्वतःचे कर्तव्य पार पाडले, तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.