निवडणुकीचा प्रचार कि उणीदुणी काढण्याची स्पर्धा ?

लोकसभा निवडणुकांचे २ टप्पे पार पडले असले, तरी अनेक ठिकाणच्या निवडणुका अद्याप शेष असल्याने प्रचाराला आता अधिक गती येऊ लागली आहे. सर्वच पक्षांतील नेतेमंडळी आजमितीला रस्त्यावर उतरून प्रचाराला लागली आहेत. मोठमोठ्या फेर्‍या निघत आहेत. सहस्रोंच्या सभा घेतल्या जात आहेत. खाणे-पिणे, विश्रांती या सर्वांकडे दुर्लक्ष करून आज प्रत्येक राजकीय नेता जीवघेण्या उन्हातही प्रचारासाठी राबत आहे. समवेत कार्यकर्त्यांचा फौजफाटाही तितक्याच प्रमाणात झिजत आहे. देशाला आज रणांगणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. युद्धात ज्याप्रमाणे रथी रथीशी आणि महारथी महारथीसमवेत लढतो, त्याप्रमाणे पक्षाची वरिष्ठ मंडळी अन्य पक्षांच्या वरिष्ठांना लक्ष्य करत आहेत, तर राज्यस्तरावरील मंडळी समोरील पक्षाच्या राज्यस्तरावरील प्रमुखाला टीकेचा धनी करत आहेत, तसेच एकमेकांची उणीदुणी काढतांना अनेक जण पातळ्या ओलांडत आहेत.

गेल्या २ वर्षांत राज्यातील राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाल्याने कधीकाळी एखाद्यावर विश्वास टाकून खासगीत सांगितलेल्या गोष्टी आज प्रचारसभांतून चव्हाट्यावर मांडल्या जात आहेत. सत्तेत आल्यावर ‘आम्ही नागरिकांसाठी काय काय करू ?’, हे सांगण्यापेक्षा समोरच्या पक्षातील मंडळी किती भ्रष्ट आणि खोटारडी आहेत, हे सांगण्यामध्ये राजकीय नेत्यांना स्वारस्य अधिक आहे. सर्वच पक्षांच्या सभांमध्ये आज हेच चित्र आहे. एकाने टीका केली; म्हणून त्याला उत्तर देण्यासाठी समोरील पक्षाचा नेताही तितकीच जहरी टीका करत आहे. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी या वाक्युद्धामुळे निर्माण झालेल्या भडक्यात तेल ओतत आहेत. अनेक ठिकाणी सभांमध्ये व्यासपिठावर आणि प्रेक्षकांमध्ये महिला उपस्थित आहेत, याचेही भान नेत्यांना राहिलेले दिसत नाही. जो नेता गेल्या लोकसभा निवडणुकीत एका पक्षाचा प्रचार करत होता, तोच नेता यंदा जाहीर सभांतून त्याच पक्षाचे वाभाडे काढतांना दिसत आहे. अशा पक्षबदलू मंडळींच्या जुन्या ध्वनीचित्रफिती निवडणुकांच्या काळातच सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्या गेल्याने त्या पहाणार्‍यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. सामान्य जनतेला निवडणुकांच्या माध्यमातून देशाला योग्य नेतृत्व द्यायचे आहे आणि आपल्या प्रभागाची काळजी घेणारा, लोकांच्या हाकेला धावून येणारा, प्रभागातील जनतेची कामे करणारा, त्यांच्या समस्या सोडवून विकास घडवून आणणारा, तसेच मतदानक्षेत्राशी कृतज्ञतेने वागणारा खासदार निवडायचा आहे. जनता सूज्ञ असल्याने ती  योग्य उमेदवार निवडून आणेल; मात्र सध्याच्या राजकीय सभांतून केल्या जाणार्‍या टीकाटिपणीशी, आरोप-प्रत्यारोपांशी सामान्य जनतेला काहीच देणे-घेणे नाही, हेच खरे !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.