श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

‘काही जिल्ह्यांतून रामनाथी आश्रमात आलेल्या अध्यात्मप्रसाराची सेवा करणार्‍या काही साधकांशी २९.९.२०२३ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी अनौपचारिक संवाद साधला. त्या वेळी साधकांनी त्यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांनी साधकांना दिलेली उत्तरे येथे दिली आहेत. २ मे या दिवशी आपण लेखाचा काही भाग पाहिला आज उर्वरित भाग पाहूया.

याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/789754.html  

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

४. हिंदु राष्ट्र आधी स्वत:मध्ये आणायचे आहे, त्यासाठी अंतर्मुख होऊन स्वतःत पालट करणे आवश्यक असणे

४ अ. चौथी साधिका : माझे विसरणे वाढले आहे. त्यासाठी स्वत:कडून अपेक्षा केली जाते. ‘पूर्वी मी किती केले ?’, असे वाटते. आता विसरणे वाढल्याने माझी चिडचिड होते. मग यजमान मला रागावतात. तेव्हा मला स्वत:बद्दल नकारात्मक विचार येतात.

कु. मेघा चव्हाण

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : काका (साधिकेच्या यजमानांना), तुम्ही काकूंना साहाय्य करा.

साधिकेचे यजमान : मी साहाय्य करतो. आठवणही करत असतो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

अ. तुम्ही आठवण करा; पण न रागवता साहाय्य म्हणून करा. आपण रागावल्याने ‘रागीटपणा’ या स्वभावदोषाचा संस्कार अजून वाढवतो.

आ. तुम्हाला काकूंचे काही स्वभावदोष लक्षात आल्यास त्याविषयी त्यांच्या उत्तरदायी साधकांना सांगा. काकूंनीही ‘मी कुठे कमी पडते ? माझे कुठे चुकते ?’, असे अंतर्मुख होऊन पहायला हवे. आपण कितीही आटापिटा केला, तरी दुसर्‍याला पालटू शकत नाही. माझी साधना स्वत:ला पालटणे, ही आहे, तेच मी करायचे. यासाठी स्वयंसूचना घ्यायची.

इ. ‘साधनेने आपल्याला देवाण-घेवाण हिशोब अल्प करायचा असतो; पण अशा वादाने आपण तो वाढवतो कि न्यून करतो ? आपण साधनेसाठी आलो आहोत. अशाने साधनेची दिशा उलट होत आहे’, हे लक्षात घ्यायला हवे.

ई. साधना म्हणजे स्वत: अंतर्मुख होणे आणि पालटणे. दुसर्‍याला साहाय्य म्हणून सांगतांना योग्य प्रकारे सांगायला हवे. मनुष्य जन्माचे सार्थक व्हायला हवे. आपण चुकीचे वागतो, त्याचा स्वत:लाच मनस्ताप झाला ना ? आता दोघांनी स्वत:ला पालटायचे ध्येय घ्या.

उ. सर्वांनी लक्षात घ्या की, हिंदु राष्ट्र आधी स्वत:मध्ये आणायचे आहे. मग ते घर, गाव, जिल्हा…. असे व्यापक होईल. सनातनच्या प्रत्येक साधकाचे घर हा आश्रम आहे, हे सतत ध्यानात घ्यावे.

५. प्रयत्नांमध्ये सातत्य येण्यासाठी अंतर्मनाला जाणीव होणे आवश्यक असल्याने स्वत:कडून प्रयत्न न झाल्यास शिक्षा घ्यावी !

५ अ. पाचवी साधिका : माझ्याकडे सेवेचे दायित्व आहे. मी व्यष्टी साधनेचे प्रयत्न ध्येय घेऊन करते; पण कृती करण्यास अल्प पडते. माझ्या मनात त्याची खंत रहाते. त्यामुळे मला समाधान किंवा आनंद मिळत नाही. घरचे मला म्हणतात, ‘‘तुझ्या चेहर्‍यावर ते (समाधान) जाणवत नाही.’’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : तुम्हाला जे वाटते ते बाह्यमनाला वाटते. अंतर्मनाला वाटते, तेव्हा आपल्याकडून कृती होतेच. अंतर्मनाला जाणीव होण्यासाठी स्वत:कडून प्रयत्न न झाल्यास शिक्षा घ्यायची. मनाला बंधन घालायचे की, आज सारणी लिखाण आणि स्वयंसूचना सत्रे झाल्याविना मी जेवणार नाही. प्रयत्न पूर्ण करून मग वेळेवर जेवण करणेही जमू लागते. जेव्हा वरवर वाटते, त्याने काही होत नाही. मधुमेह झालेल्याला जसे इन्सुलीनचे महत्त्व ठाऊक आहे, तसे आपल्या मनाला साधनेच्या प्रयत्नांचे महत्त्व पटले पाहिजे, तर कृती होईल.’

मनुष्यजन्माचे सार्थक करायचे. किती योनींतून आल्यावर हा जन्म आणि गुरु मिळाले. असा जन्म आणि गुरु परत मिळणार नाहीत. आपत्काळात गतीने साधना होईल, यासाठी संकल्प कार्यरत आहे. आपल्याला भवसागरातून मुक्त व्हायचे आहे.’ (समाप्त)

(सर्व सूत्रांचा दिनांक : २९.९.२०२३)