उरण (जिल्हा रायगड) येथील श्री. राजेश पाटील यांना सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

१. ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा किंवा ‘हिंदु एकता दिंडी’ अशा उपक्रमांच्या वेळी अल्प वेळ झोप मिळूनही दिवसभर पुष्कळ उत्साह आणि आनंदी वाटणे

श्री. राजेश पाटील

‘मी मुंबई येथे होणार्‍या ‘हिंदु राष्ट्रजागृती सभा’, मोर्चा किंवा ‘हिंदु एकता दिंडी’ या उपक्रमांच्या सेवेला गेलो होतो. तेथील साधकांची निवासव्यवस्था करण्याची सेवा माझ्याकडे होती. रात्री शेवटी झोपायला येणारा साधक झोपेपर्यंत मी जागाच असायचो. ‘प्रत्येक साधकाला अंथरूण-पांघरूण मिळाले कि नाही ?’, ते मला पहावे लागायचे. पुन्हा सकाळी सर्व साधकांना लवकर उठवण्याचे दायित्व माझ्याकडे होते. त्यामुळे मी सर्व साधकांना लवकर उठवून त्यांना अंघोळीसाठी पाणी गरम करून देत असे. मला ‘सर्व साधक माझे आहेत’, असे वाटायचे. ही सर्व सेवा करतांना मला रात्रीची २ – ३ घंटेच झोप मिळायची. कधी झोपमोड होऊन एकच घंटा झोप मिळायची, तरीही दिवसभर मला उत्साह वाटायचा आणि सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळायचा. असा आनंद मी यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. माझी अधूनमधून भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू यायचे.

२. वर्ष २०२३ च्या जून मासात झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवानंतर रामनाथी आश्रमात झालेल्या शिबिराच्या सेवेच्या वेळी जाणवलेली सूत्रे

२ अ. ‘घासायचे भांडे जेवढे मोठे असेल, तेवढे मोठे पाप धुतले जाणार आहे’, असे वाटून ‘या सेवेच्या माध्यमातून स्वतःची पापे धुतली जाणार’, या भावाने आनंदाने सेवा होणे : मी अधिवेशनानंतर जुलै मासात रामनाथी आश्रमात झालेल्या एका शिबिराच्या सेवेसाठी आलो होतो. या शिबिराच्या काळात रामनाथी आश्रमात मी भांडी घासायची सेवा करत होतो. तेव्हा ‘घासायचे भांडे जेवढे मोठे असेल, तेवढे माझे मोठे पाप धुतले जाणार आहे’, या भावाने मी भांडी धूत होतो. या सेवेच्या माध्यमातून माझी सर्व पापे धुतली जाणार आहेत’, असे वाटून मला पुष्कळ आनंद अनुभवता आला. त्यामुळे मला ‘ही सेवा संपूच नये’, असे वाटले.

२ आ. छोटी भांडी (ताटे-वाट्या, चमचे, पेले) पुसतांना माझ्या मनात असा भाव होता की, प्रत्येक साधकाच्या हृदयातील भगवंतच या ताटात महाप्रसाद घेऊन ग्रहण करणार आहे.

२ इ. ‘सर्व साधक गुरुदेवांचीच रूपे आहेत’, असे मला वाटत होते. त्यामुळे ‘प्रत्येक साधक माझाच आहे’, असे वाटून मला सर्वांप्रती प्रेमच वाटत होते.

२ ई. माझ्याकडून श्रीकृष्णाच्या चरणी मनापासून प्रार्थना होत होती, ‘सर्व साधकांचे स्वभावदोष जाऊन सर्वांची आध्यात्मिक प्रगती होऊ दे.’

२ उ. रामनाथी आश्रमात असतांना ‘मन शांत आणि स्थिर आहे’, असे जाणवणे : शिबिराच्या काळात रामनाथी आश्रमात मी सतत भावावस्था अनुभवत होतो. माझे मन शांत आणि स्थिर होते. ‘माझे शरीर एकदम हलके झाले आहे’, असे मला जाणवत होते. केवढी मोठी ही गुरुमाऊलींची कृपा !

३. कृतज्ञता

रामनाथी आश्रमात असतांना मला ‘सर्व गोष्टींचा कर्ता-करविता श्रीकृष्णच आहे’, ही गोष्ट सातत्याने अनुभवता आली. हाच मोठा आनंद आणि हाच मोठा चमत्कार आहे ! गुरुदेवांनी माझ्या मनात ‘प्रत्येकाच्या हृदयात श्रीकृष्णच बसला आहे’, असा भाव निर्माण करून मला पुष्कळ आनंद दिला’, यासाठी गुरुदेवांच्या पावन चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच ठरेल.’

– श्री. राजेश पाटील, उरण, रायगड. (२९.७.२०२३)

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी श्री. राजेश पाटील यांना आलेल्या अनुभूती !

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

१. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या मार्गदर्शनानंतर पुष्कळ वेळ भावावस्था अनुभवणे

अ. एप्रिल २०२३ मध्ये एकदा सद्गुरु अनुराधा वाडेकर मला ठाणे सेवाकेंद्रात घेऊन गेल्या होत्या. तेव्हा माझी भावावस्था बराच वेळ टिकून राहिली आणि मी एक वेगळाच आनंद अनुभवला.

आ. एकदा सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी मला एक ते दीड घंटा मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांच्याकडून आनंद प्रक्षेपित होत होता आणि तो माझ्या संपूर्ण शरिरात पसरून मला संपूर्ण शरीरभर आनंदाची स्पंदने जाणवत होती.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या नागोठणे या गावातील जन्मस्थानी शांत वाटणे आणि ‘हे प्रत्यक्ष श्रीविष्णूचे जन्मस्थान आहे’, या विचारांनी आनंद होणे : मी मार्च २०२३ मध्ये गुरुदेवांच्या नागोठणे येथील जन्मस्थानी गेलो होतो. त्यांच्या जन्मखोलीच्या मध्यभागी मला ‘सनातन संस्था’ हे नाव दिसत होते. मी त्या खोलीत ४ दिवस झोपलो होतो. मला तिथे पुष्कळ शांत जाणवत होते. ‘हे प्रत्यक्ष श्रीविष्णूचे जन्मस्थान आहे’, असा विचार येऊन मला पुष्कळ आनंद वाटत होता.

२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पुष्कळ देखणे दिसून संत तुकाराम यांच्या अभंगातील ओळ स्मरणे : एकदा मला प.पू. गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. तेव्हा प.पू. गुरुदेव एवढे सुंदर दिसत होते की, अजूनपर्यंत मी एवढे सुंदर कुणीच पाहिले नाही. मला संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील पुढील ओवीची आठवण झाली.

‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ।।’ (तुकाराम गाथा, अभंग ४)

अर्थ : ‘या विठ्ठलाचे रूप इतके देखणे आहे की, ‘जणू तो सुकुमार मदनाचा पुतळाच आहे’, असे वाटते. त्याच्यासमोर सूर्य-चंद्र यांचे तेजही फिके आहे.’

२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे शेषशायी श्रीविष्णुरूपात दर्शन होणे : त्यानंतर एकदा मला प.पू. गुरुदेव क्षीरसागरातील शेषावर आरूढ श्रीविष्णूच्या रूपात दिसले. यावरून ‘प.पू. गुरुदेव श्रीविष्णुच आहेत’, अशी माझी श्रद्धा दृढ झाली.

३. प्रार्थना

‘हे गुरुमाऊली, प्रत्येक जिवाच्या हृदयस्थ श्रीकृष्णाला मी कसे शरण जाऊ ?’, हे तुम्ही मला वेळोवेळी शिकवा. गुरुदेवा, हीच आपल्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना करतो.’

– श्री. राजेश पाटील, उरण, रायगड. (२९.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक