India Heat Wave : देशात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला !

नवी देहली – देशातील अनेक भागांत तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. अशा स्थितीत उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, या वर्षी एप्रिल ते जून या काळात देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक रहाणार आहे. देशाच्या विविध भागांमध्ये नेहमीच्या ४ ते ८ दिवसांच्या तुलनेत उष्णतेची लाट १० ते २० दिवस टिकू शकते.

हवामान विभागानुसार, जेव्हा कमाल तापमान ४५ अंश किंवा सामान्य तापमानापेक्षा अधिक किंवा कमाल तापमान किमान ४० अंश सेल्सिअस असते. जर कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पोचले, तर त्या वेळी वहाणार्‍या वार्‍यांना उष्णतेची लाट मानले जातात. सर्वसाधारण शब्दात, उन्हाळ्यात उत्तर-पूर्व किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे तीव्र उष्णता आणि कोरडे वारे यांना ‘उष्णतेच्या लाटा’ म्हणतात.

उष्णतेच्या लाटांवरून केंद्र सरकारकडून जनतेला सल्ला

१. शाळांनी गर्दीच्या वेळेत (दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत) काम करू नये. शाळेतील उघड्यावरील वर्गांवर बंदी घालण्यात यावी.

२. दुपारी १२ ते ४ या वेळेत बस गाड्या चालवू नयेत.

३. स्थलांतरित लोकांसाठी रात्रीचे निवारे दिवसभर उघडे ठेवावेत.

४. पाण्याचा अनावश्यक वापर थांबवावा.

५. पाण्याच्या टाक्यांमधून लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी दिले जाईल याची निश्चिती करावी.

६. दिवसभरात ठराविक अंतराने पुरेसे पाणी प्या. शरिरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका.

७. उष्माघातामुळे आजारी वाटत असल्यास, जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा सल्ला घ्या.