भारतातील घुसखोरांना परत पाठवेपर्यंत त्यांना ठेवण्यासाठी ‘नजरकैद केंद्रा’ची उभारणी होणार !

मुंबई – भारतात बेकायदेशीररित्या रहाणार्‍या नागरिकांना परदेशी पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना कुठे ठेवावे ? हा प्रश्न होता. दादर येथील भोईवाडा परिसरात त्यांच्यासाठी एक ‘नजरकैद केंद्र’ (‘डिटेंशन सेंटर’) उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला राज्यशासनाने संमती दिली आहे. त्यांना सध्या आतंकवादविरोधी पथकाच्या कोठडीत ठेवले जाते. या कोठडीतून पोलिसांना हे नागरिक पळून जाण्याची भीती वाटते. काही दिवसांपूर्वी काळा चौकी पोलीस ठाण्यातून एक बांगलादेशी पळून गेल्याने पोलिसांवर कारवाई करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग या केंद्रासाठी इमारत उभारणार आहे. याला ५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. येथे बंदीवानांसाठी ग्रंथालयही असणार आहे. (घुसखोर नागरिक पुस्तके वाचतील हा शासनाचा किती गोड गैरसमज आहे ! – संपादक) या सेंटरमध्ये १०० ते १५० लोक असतील. कायदेशीर प्रक्रिया झाल्यावर त्यांना त्यांच्या देशात पाठवण्यात येईल. ३ मासांत ३९ बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. वर्ष २०२३ मध्ये ३६७ हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका 

भारतात घुसून या नागरिकांना पुष्कळ गंभीर गुन्हा केला असल्याने एवढा खर्च करून त्यांची बडदास्त ठेवण्याची आवश्यकता आहे का ? त्यापेक्षा कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने करून त्यांनी न्यूनतम दिवसांत त्यांच्या देशात कसे पाठवता येईल, यावर भर का दिला जात नाही ?