Bangladesh Hindus Exodus : बांगलादेशात धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणांमुळे २५ हिंदु कुटुंबांतील १०० लोकांनी पलायन करून भारतात घेतला आश्रय !

प्रातिनिधिक छायाचित्र

कोलकाता (बंगाल) – बांगलादेशातून बंगालमध्ये पळून आलेल्या एका निर्वासिताने तेथील वेदनादायी परिस्थिती सांगितली आहे. त्याने सांगितले की, स्वतःच्या सुरक्षेसाठी बांगलादेशातील २५ हिंदु कुटुंबांतील १०० लोकांना पलायन करून बंगालमध्ये आश्रय घेण्यास भाग पडले आहे. बांगलादेशात हत्या, बलात्कार, मंदिरांवर आक्रमणे, भूमी बळकावणे आदी छळाला सामोरे जाणार्‍या हिंदूंना भीतीच्या सावटाखाली जगावे लागत आहे.

१. या निर्वासित हिंदूने सांगितले की, बांगलादेशात निवडणूकपूर्व आणि मतदानानंतरचा हिंसाचार, यांमुळे बांगलादेशातील उजिरपूर येथील हिंदूंमध्ये इतकी भीती निर्माण झाली की, ७ जानेवारी २०२४ पासून २५ हिंदु कुटुंबांनी वेळ न दवडता तेथून पलायन करून बंगालमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि अखेर मार्चमध्ये ते बंगालमध्ये पोचले.

२. बांगलादेशात निवडणुका आल्या की, अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचार आणखी वाढतात. निवडणुकीपूर्वी धर्मांध मुसलमान हिंदूंना लक्ष्य करतात. बांगलादेशमध्ये यावर्षी ७ जानेवारीला संसदेच्या निवडणुका झाल्या. या काळात हिंदूंना जाळपोळ आणि आक्रमणे, यांमुळे घर सोडून पळून जावे लागले. या हिंसक घटनांमध्ये ‘अवामी लीग’ पक्षाशी संबंधित धर्मांधांनी इतर पक्षांना किंवा अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार्‍या हिंदूंच्या घरांवर आक्रमणे केली.

संपादकीय भूमिका

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारत सरकारशी घनिष्ठ (!) संबंध असतांना ही स्थिती आहे. यातून या संबंधांचा हिंदूंसाठी काहीच लाभ नसल्याने पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारतात प्रथम हिंदु राष्ट्र आणणे आवश्यक आहे !