‘डेंग्यू’चा गंभीर आजार झाल्यावर गुरुकृपेने त्यातून लवकर बरे होणे आणि विदेशात प्रचाराच्या सेवेसाठी जाता येणे

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

‘वाराणसी येथे ४ आणि ५ नोव्हेंबर २०२३ या दिवशी क्षेत्रीय हिंदु राष्ट्र अधिवेशन होते. अधिवेशनानंतर सर्व आवराआवर झाल्यावर रात्री मला थंडी वाजून ताप आला. त्यानंतर २ दिवसांनी रक्ताची तपासणी केल्यावर मला ‘डेंग्यू’ (डासांच्या संक्रमणातून होणारा जीवघेणा आजार) झाल्याचे समजले. या आजारामुळे माझ्या रक्तातील पांढर्‍या पेशी, लाल पेशी आणि प्लेटलेट्स यांचे प्रमाण अल्प झाले. (निरोगी व्यक्तीच्या रक्तातील पांढर्‍या पेशींचे प्रमाण ४,००० ते १०,००० प्रती मिली असते. माझे ते २,९०० ते ३,४०० प्रती मिली, इतके अल्प झाले होते. निरोगी व्यक्तीच्या रक्तातील लाल पेशींचे प्रमाण ४.७ ते ६.१ मिलियन प्रती मायक्रोलिटर असते. माझे ते ४.३ मिलियन प्रती मायक्रोलिटर, इतके अल्प झाले होते. निरोगी व्यक्तीच्या रक्तातील प्लेटलेट्स प्रमाण १,५०,००० ते ४,५०,००० प्रती मायक्रोलिटर असते. माझे ते १,३०,००० ते १,४५,०००, इतके अल्प झाले होते.)

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

मला पुष्कळ खोकला येत होता. मला ‘थकवा असणे, चक्कर येणे, रक्तदाब अल्प होणे’, असे अनेक प्रकारचे त्रास होत होते. त्याच कालावधीत मला बँकॉक (थायलंड) येथे ‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’साठी आणि त्यानंतर इंडोनेशिया येथे जायचे होते. त्यासाठी माझे १५ दिवसांच्या विदेश दौर्‍याचे नियोजन चालू होते. माझी प्रकृती पहाता ‘मी एवढा मोठा प्रवास करून विदेश दौरा करू शकेन’, असे मला वाटत नव्हते. ‘आजारपणामुळे मी तेथे जाऊ शकणार कि नाही ? एवढी सिद्धता करून मी गेलो आणि आजारपणामुळे सेवा होऊ शकली नाही, तर कसे होणार ?’, असे विचार माझ्या मनात येत होते. त्या वेळी मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी बोलल्याने मला आध्यात्मिक बळ आणि प्रोत्साहन मिळाले. सर्वसाधारणपणे डेंग्यूचा आजार झाल्यानंतर तो पूर्ण बरा व्हायला ३ मास लागतात; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला १५ दिवसांतच बरे वाटायला लागले. २२.११.२०२३ या दिवशी मी प्रवास करून विदेश दौरा करू शकलो. ‘थायलंड आणि इंडोनेशिया येथील दौरा करतांना गुरुदेवांची कृपा अन् चैतन्य यांमुळे माझे आरोग्य चांगले राहून माझ्याकडून सेवा होत होती’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ, वाराणसी (३०.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक