(म्हणे) ‘दंगल घडवणार्‍यांवर नोंद केलेले गुन्हे मागे घ्या !’ – गोव्यातील काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन

  • गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी आक्रमण केल्याचे प्रकरण

  • दंगलखोरांचे समर्थक काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन !

खासदार फ्रान्सिस सार्दिन

मडगाव, २१ फेब्रुवारी (वार्ता.) : दक्षिण गोव्यात सां जुझे दि आरियल (नेसाई) येथील एका खासगी जागेत १९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना राज्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर धर्मांध ख्रिस्त्यांनी मातीचे गोळे फेकून आक्रमण केले होते. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी सां जुझे दि आरियल पंचायतीच्या सरपंच लिंडा फर्नांडिस, उपसरपंच वालेन फर्नांडिस यांच्यासह एकूण २० जणांवर गुन्हे नोंद केले आहेत. ‘या प्रकरणी सरकारने नोंद केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे’, अशी मागणी काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी २१ फेब्रुवारी या दिवशी मडगाव येथे दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

खासदार फ्रान्सिस सार्दिन पुढे म्हणाले, ‘‘मी मंत्र्यांवर केलेल्या आक्रमणाचे समर्थन करत नाही. या आक्रमणाविषयी मलाही दु:ख वाटते. वास्तविक पुतळा उभारतांना स्थानिक पंचायतीला विश्वासात घेणे आवश्यक होते. स्थानिकांना त्याविषयी प्रोत्साहित केले पाहिजे होते. आम्हीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करतो.’’

पुतळ्याच्या विषयावर ग्रामस्थांची २२ फेब्रुवारी या दिवशी विशेष बैठक

सां जुझे दि आरियल ग्रामस्थांनी गुरुवार, २२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता पाद्रीभाट येथे स्थानिक पंचायतीला विश्वासात न घेता सां जुझे दि आरियल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याच्या प्रकरणी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. पंचसदस्य जायसी डायस म्हणाले, ‘‘गावातील शांती बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि यासाठी सर्वांनी बैठकीला उपस्थिती लावावी.’’ (गावातील शांती मंत्र्यांवर आक्रमण करणार्‍यांनीच बिघडवली. स्थानिक पंचायतीला विश्वासात न घेता जर पुतळा उभारला जात होता, तर कायदा हातात घ्यायचा असतो का ? त्याविषयी जिल्हाधिकारी किंवा न्यायालयात तक्रार का केली नाही ? – संपादक)

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी १०० चौ.मी. भूमी दान दिली ! – भूमीचा मालक सरताज मकंदर

भूमीत नवीन बांधकामे व्हावीत, यासाठी पुतळा उभारल्याचा आरोप खोटा

सां जुझे दि आरियल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलतांना संबंधित भूमीचे मालक सरताज मकंदर म्हणाले, ‘‘हाऊसिंग बोर्ड, मडगाव येथील काही शिवप्रेमी माझे पूर्वीपासून मित्र आहेत. त्यांनी माझ्या भूमीत डोंगराळ भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी जागा मागितली. मी त्यांना १०० चौ.मी. भूमी देणगी स्वरूपात दिली. यासाठी ‘ना हरकत दाखला’ आणि आवश्यक अनुमती दिली. ‘आपली २० सहस्र चौ.मी. भूमीत नवीन बांधकामे व्हावी, यासाठी किंवा जागा विकसित करावी, यासाठी मी पुतळा उभारण्यास अनुमती दिली’, असा खोटा आरोप होत आहे. याविषयीचे सत्य मी लवकरच सर्वांसमोर मांडणार आहे.’’

(म्हणे) ‘पुतळ्याच्या वादावरून प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घ्या !’ – उपसरपंच वालांते फर्नांडिस

उपसरपंच वालांते फर्नांडिस म्हणाले, ‘‘पोलिसांनी पुतळ्याच्या वादावरून प्रविष्ट केलेले सर्व गुन्हे मागे घेतले पाहिजेत. सां जुझे दि आरियल हे गाव शांतीप्रिय आहे. पंचायत क्षेत्रात खासगी किंवा सरकारी भूमीत बांधकाम करण्यासाठी पंचायतीचा ‘ना हरकत दाखला’ घेणे बंधनकारक आहे.’’ (नोंद केलेले गुन्हे पुतळ्याच्या वादावरून नाहीत, तर मंत्र्यांवर आक्रमण केल्यामुळे आहेत. ‘ना हरकत दाखला’ न घेता पुतळा उभारला असेल, तर त्यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार करायला हवी होती. पंचायतीत अवैध बांधकाम होत असेल, तर दगड आणि माती घेऊन आक्रमण करणे ही सां जुझे दि आरियल गावाची प्रथा आहे का ? – संपादक)


हे ही वाचा – गोवा : दंगल घडवल्याच्या प्रकरणी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद


संपादकीय भूमिका

  • असेच आक्रमण खासदार सार्दिन यांच्यावर झाले असते, तर त्यांनी पोलिसांना आक्रमणकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यायला सांगितले असते का ?
  • आक्रमणकर्ते ख्रिस्ती असल्यामुळे सार्दिन त्यांच्या धर्मबांधवांवरील गुन्हे मागे घ्यायला सांगत आहेत. यातून त्यांचीही धर्मांधता लक्षात येते. याविषयी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या काँग्रेसच्या अन्य नेत्यांना काय म्हणायचे आहे ?