देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप

विद्यार्थी आंदोलनात देशद्रोही ‘उमर खालिद’ याच्या समर्थनार्थ फलक दर्शवल्याचे प्रकरण

पत्रकार परिषदेत बोलतांना डावीकडून कृष्णा साळकर आणि सिद्धार्थ कुंकळकर

पणजी, २७ जुलै (वार्ता.) – गोव्यात विद्यार्थी आंदोलनामध्ये उमर खालिद आणि शर्जील इमाम यांच्या सुटकेची मागणी करणारे फलक (प्लेकार्ड) झळकवल्याच्या घटनेमागे कोणत्या अराष्ट्रीय शक्तींचा हात आहे, याचे गोवा पोलीस आणि सरकार यांनी सखोल अन्वेषण करावे, अशी मागणी भाजपचे नेते सिद्धार्थ कुंकळकर यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली आहे. पत्रकार परिषदेला आमदार कृष्णा (दाजी) साळकर आदींची उपस्थिती होती.

सिद्धार्थ कुंकळकर पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात आतंकवाद्यांना किंवा त्यांना सहानुभूती दाखवणार्‍यांना भाजप कधीही थारा देणार नाही. फलक धरून उभा असलेल्या मुलामागे नक्की कोण आहे ? बाहेरून आलेली ही मुले गोव्यातील कोणत्या मद्यालयामध्ये मजा करत होती ? या संपूर्ण कटासाठी पैसा कुठून आला ? आणि याचा सूत्रधार कोण ? याच्या मुळापर्यंत पोचून पोलिसांनी शोध घ्यावा आणि संबंधितांना कठोर शिक्षा द्यावी. गोव्यातील विद्यार्थी आंदोलनात स्थानिक विद्यार्थी नसून बाहेरील भाडोत्री लोक आणि ‘बाऊन्सर’ (भाडोत्री गुंड) सहभागी होते. या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे सखोल चौकशी करण्यात यावी. पणजी येथे २५ जुलै या दिवशी झालेल्या निदर्शनांमध्ये प्रसारमाध्यमांना शिवीगाळ करून त्यांना अपकीर्त करण्यात आले. ही राष्ट्रविरोधी प्रवृत्ती आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने नोंद घेऊन कारवाई करावी. भारतीय जनता पक्ष विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या आणि त्यांचे भवितव्य यांसाठी नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांनी कठोर पावले उचलली आहेत. विद्यार्थी आंदोलनामध्ये देशद्रोही शक्तींचा शिरकाव झाल्याच्या प्रकरणी काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी या विघातक शक्तींचा सार्वजनिकरित्या निषेध करून दाखवावा. निष्पाप नागरिकांचे बळी घेणार्‍या आतंकवादी कसाबसंबंधी एका मोहिमेत आपच्या अध्यक्षांनी स्वाक्षर्‍या केल्या होत्या.’’

आमदार कृष्णा (दाजी) साळकर म्हणाले, ‘‘भविष्यात परीक्षांमध्ये असे गैरप्रकार घडू नयेत आणि एक सक्षम व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी संसदेत २७ जुलै या दिवशी विधेयक मांडले; मात्र विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. विरोधकांना विद्यार्थ्यांचे हित नको आहे, तर त्यांना केवळ या सूत्रावर राजकारण करायचे आहे. जनता हे सर्व पहात आहे.’’

म्हापसा येथील आंदोलनासाठी देहली येथील युवकांना आणले

म्हापसा येथील आंदोलनासाठी देहली येथूक युवकांचा एक गट गोव्यात आणण्यात आला होता. हा गट करंझाळे येथील एका सदनिकेत वास्तव्यास होता. आता संबंधित सदनिकेचा मालक पसार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. सिद्धार्थ कुंकळकर यांनी या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्याची मागणी केली.