रत्नागिरीत ब्रिगेडियर एस्.व्ही. भास्कर आणि कॅप्टन डॉ. राजेश अढाऊ या वीर योद्ध्यांच्या मुलाखतीतून उलगडली कारगील युद्धाची कथा  !

लक्ष्य फाऊंडेशनच्या प्रमुख सौ. अनुराधा प्रभूदेसाई यांच्या ओघवत्या वाणीतून झाले सादरीकरण

रत्नागिरी – जम्मू आणि काश्मीरमधील आणि समुद्रसपाटीतून १९ सहस्र फूट उंच, उणे २० तापमान, प्रचंड थंडी, बर्फाच्छादित शिखरे अशा प्रतिकूल स्थितीत कारगिलचे युद्ध भारताने वीर सैनिकांमुळे जिंकले. टायगर हिल, तोलोलिंग, काकसर, कारगिल, जुबर, खालुबर यासह रॉकी नॉक आणि अन्य चौक्यांवर पाकिस्तानने ताबा मिळवला होता. त्या वेळी अनुमाने ३ महिने चाललेल्या घनघोर युद्धात भारताने पाकवर विजय संपादन केला. आपले अनेक सैनिक हुतात्मा झाले. या कारगिल युद्धाची कथा कारगील युद्धातील ब्रिगेडियर एस्.व्ही. भास्कर आणि कॅप्टन डॉ. राजेश अढाऊ यांच्या तोंडून ऐकण्याची पर्वणी रत्नागिरीकर विद्यार्थ्यांना मिळाली.
लक्ष्य फाऊंडेशनच्या वतीने ३ फेब्रुवारीला ‘मेरा देश मेरी पहचान’ या कार्यक्रमात हे दोघेही कारगील योद्धे बोलत होते. फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. अनुराधा प्रभुदेसाई यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. प्रमोद महाजन क्रीडांगणात ४ सहस्रांहून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, एन्.सी.सी. कॅडेट्स आणि रत्नागिरीकरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. डॉ. अढाऊ हे मूळचे अमरावतीचे. त्यांनी या युद्धात अनुमाने १०८ घायाळ सैनिकांना जीवदान दिले. कॅप्टन विक्रम बात्रा आणि अन्य सैनिकांना वाचवू शकलो नसल्याचे दुःख त्यांना वाटते. रक्तबंबाळ घायाळ सैनिकांना वाचवण्याकरता त्यांची शस्त्रक्रिया, त्यांना सलाईन लावणे, औषध गोळ्या देणे हे काम केल्याचे सांगतांना ते भावुक झाले.


आर्मीचे कठीण प्रशिक्षण, एलओसी कारगिल चित्रपटातील काही क्षणचित्रे या वेळी दाखवून त्या वेळचे प्रसंग ब्रिगेडियर भास्कर यांनी सांगितले. रेडिओ सेटवरून बोलावे लागते. त्या वेळी संदेश देतांना वापरण्यात येणारे सांकेतिक शब्द (कोडवर्ड) कसे असतात ? याविषयी त्यांनी सांगितले. शत्रूला कोणत्याही गोष्टीची माहिती मिळू नये; म्हणून हे करावे लागते. युद्धामध्ये सैनिकांचे मनोबल वाढवण्याचे काम करावे लागते. आपल्याला पुढे जात रहायचे आहे. आर्मीत आपण याकरताच आलो होतो, आर्मीचे अपयश म्हणजे देशाचे अपयश; परंतु आम्ही यश मिळवल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कौस्तुभ सावंत, संतोष पावरी, सुहास ठाकूरदेसाई, राजेश आयरे, नंदू चव्हाण, माजी सैनिक मोहन सातव, शंकर मिलके, विजय आंबेरकर, राकेश नलावडे यांच्यासमवेत सर्व माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्त्ये आणि विविध विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन यशस्वी केल्याबद्दल अनुराधा प्रभुदेसाई यांनी त्यांचे विशेष आभार मानले. सुनियोजित कार्यक्रम आणि बैठक व्यवस्थेमुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला रत्नागिरीतील ३० माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता उपस्थित होत्या.

देशासाठी एवढे करा !

युवकांना संदेश देतांना डॉ. अढाऊ म्हणाले की, मी स्वतःसाठी काय केले, यापेक्षा देशासाठी अर्पण काय केले ? याचा विचार करा. आपल्या पायाखाली येणारा प्लास्टिक कचरा गोळा करा. स्वतः कुठेही प्लास्टिक रॅपर्स, पिशव्या टाकून कचरा करू नका. समुद्रात प्लास्टिक गेल्यामुळे मासे, जलचर आणि पर्यायाने आपल्याला धोका पोचत आहे.

तर ब्रिगेडियर भास्कर यांनी सांगितले की, भारतीय सैनिकच देशसेवा करतात असे नाही, तर सर्व भारतीय देशासाठी काम करत आहेत. दायित्व घेऊन काम पूर्ण करा, देशाचे कायदे, नियम पाळा, कुणीही लहान मोठा असू दे, त्याचा आदर करायला शिका. तेव्हा सर्वांनाच आदर मिळेल.