आळंदी (जिल्हा पुणे) येथे इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण चालू !

प्रतिकात्मक चित्र

आळंदी (जिल्हा पुणे) – येथे राष्ट्रवादी अध्यात्मिक आणि वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने १५ जानेवारीपासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण चालू केले आहे. अजूनही हे उपोषण चालू आहे. (नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना उपोषण करायला लावणारे प्रशासन ! प्रशासन संवेदनशील आणि कार्यक्षम कधी होणार ? – संपादक) या उपोषणाच्या सहाव्या दिवशीही इंद्रायणी जलप्रदूषणामुळे फेसाळलेली होती. एकीकडे जलप्रदूषणा संदर्भात उपोषण, तर दुसरीकडे इंद्रायणीच्या नदीपात्रात दूषित काळवंडलेले पाणी आणि फेस अशी सद्य परिस्थिती दिसून येत आहे.

इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठी चाललेल्या उपोषणाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आहे. व्यंकटेश दुर्वास, जिल्हा सहआयुक्त नगरपालिका शाखा यांचे त्यासंदर्भात २० जानेवारीला उपोषणकर्त्यांना पत्र मिळाले आहे; मात्र कार्यवाही कधी होणार ? असा उपोषणकर्त्यांचा प्रश्न आहे.

संपादकीय भूमिका :

सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी आता अन्यायाला थारा नसणारे रामराज्यच हवे !