Forced Conversion Pune : पुणे जिल्ह्यातील केडगाव (ता. दौंड) येथे २ अल्पवयीन हिंदु मुलींचे ख्रिस्ती धर्मांमध्ये धर्मांतर !

  • ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथ आश्रमा’तील प्रकार !

  • पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा, तसेच अन्वेषणात अक्षम्य चुका असल्याचा ‘भारतीय मानवाधिकार परिषदे’चा आरोप !

पुणे, १७ जानेवारी (वार्ता.) – पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथ आश्रम, केडगाव (ता. दौंड) या संस्थेकडून ‘हिंदु खाटिक’ असलेल्या २ अल्पवयीन मुलींचे बळजोरीने ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्याने गुन्हा नोंद करतांना अयोग्य कलमे लावणे, तक्रारदारांची नावे अल्प करणे आणि आरोपींना पाठीशी घालणे, असा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचे अन्वेषण चुकीच्या पद्धतीने केले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे ‘विशेष अन्वेषण समिती’ (एस्.आय.टी.) किंवा ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’कडून (सी.बी.आय.कडून) अन्वेषण करावे. तसेच धर्मांतरबंदी कायद्याची कार्यवाही करावी, अशी मागणी ‘भारतीय मानवाधिकार परिषदे’चे अधिवक्ता अशिष सोनावणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक) ही पत्रकार परिषद ‘पत्रकार भवन’ येथे १७ जानेवारी या दिवशी पार पडली.

‘भारतीय मानवाधिकार परिषदे’च्या संचालिका संध्या मोरे यांनी घटनाक्रम मांडला.

१. धर्मांतर करण्यात आलेल्या मुली मावशीकडे रहात असून ‘बापूसाहेब पवार प्राथमिक शाळे’मध्ये शिकत होत्या. त्या शाळेशी संबंधित ‘भारतीय समाज सेवा केंद्र, कोरेगाव पार्क’ संस्थेच्या समाजसेविका संध्या वसवे यांनी घरच्यांशी गोड बोलून त्यांना वरील आश्रम शाळेमध्ये प्रवेश घेण्यास दबाव टाकला.

२. एप्रिल २०२२ मध्ये प्रवेश घेतल्यानंतर घरच्यांना प्रत्यक्ष भेटू न देणे, मुलींना घरी न पाठवणे, भ्रमणभाषवरून संपर्क करण्यास मनाई करणे, तसेच मुलींवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले.

३. मुलींना हिंदु धर्माचे रितीरिवाज पाळण्यास मनाई करणे, टिकली, गंध आणि बांगड्या घालू न देणे, असे प्रकार केले. त्यांच्याकडे आईने दिलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती फोडून टाकण्यात आली.

४. आश्रमातील मुलींना ‘वाईन’ देणे, चर्चमध्ये नेणे, मुलींना येशू ख्रिस्त एकमेव देव असून त्याला प्रार्थना करण्यास दबाव टाकण्यात आला. मुलींचा ‘बाप्तिस्मा’ करून त्यांच्या नावामध्ये पालट केला.

५. मुलींच्या मावशीने आमच्याशी सप्टेंबर २०२३ मध्ये संपर्क साधला. त्यानंतर आयोगाने केलेल्या अन्वेषणामधून वरील सत्य बाहेर आले. नोव्हेंबर २०२३ मध्ये आयोगाने रितसर पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.

संपादकीय भूमिका 

  • हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांना वाचवण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक असा निष्काळजीपणा करतात, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? असे पोलीस हिंदूंवर मर्दुमकी गाजवून त्यांची मुस्कटदाबी करतात, हे लक्षात घ्या !
  • राज्यात आणि देशात धर्मांतरबंदी कायदा आणण्याची आवश्यकता या घटनांमधून स्पष्ट होते