Hajimalang Dargah: (म्हणे) ‘मुख्यमंत्र्यांना सर्व धर्म सारखे असले पाहिजेत !’ – खासदार असदुद्दीन ओवैसी

एकनाथ शिंदे हाजीमलंग दर्गा

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाजीमलंग दर्गा हटवणार असल्याचे म्हणत आहेत. एखादे मुख्यमंत्री असे वक्तव्य कसे करू शकतात ? ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या दृष्टीने सर्व धर्म सारखे असले पाहिजेत. हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती अथवा बौद्ध त्यांच्यासाठी सगळे सारखे असायला हवेत. मुख्यमंत्री असूनही ते अशी निरर्थक वक्तव्ये का करतात ?, असे संधीसाधु वक्तव्य ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुलिस्म (एम्.आय.एम्.आय.) पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

श्री मच्छिंद्रनाथांचे समाधीस्थान मलंगगड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २ जानेवारी या दिवशी श्री मच्छिंद्रनाथांचे समाधीस्थान असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील मलंगगड येथे अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहिले होते. त्या वेळी ‘मलंगगड मुक्त केल्याविना रहाणार नाही’, असे वक्तव्य त्यांनी केले. यावर ओवैसी यांनी वरील शब्दांत जळफळाट व्यक्त केला. मलंगगडावर वक्फ बोर्डाने मालकी सांगितली आहे.

असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले, ‘‘भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे हाजीमलंग दर्गा हटवणार आहेत. २०० ते ३०० वर्षे जुन्या दर्ग्याविषयी ते असे वक्तव्य करत आहेत. बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या लोकांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. त्या निकालानंतर देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. चिथावणीखोर वक्तव्ये वाढली आहेत. लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशा प्रकारची वक्तव्ये सातत्याने करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांपुढे याविषयीचे धोरण स्पष्ट करावे. हे त्यांचे दायित्व आहे.’’ (हिंदूंना धोरण स्पष्ट करायला सांगण्यापूर्वी ओवैसी यांनी वक्फ बोर्डाद्वारे हिंदूंची भूमी बळकावणार्‍यांना जाब विचारण्याचे धाडस का दाखवत नाही ? – संपादक)

सर्व धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांवरील अतिक्रमणे हटवणार ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्व धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांवरील अतिक्रमणे हटवू, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केले. पत्रकारांनी त्यांना तेथील अनधिकृत बांधकामे पाडल्याविषयी प्रश्‍न विचारला होता. त्या वेळी ते बोलत होते.

संपादकीय भूमिका

एवढी वर्षे सरकारकडून ‘अल्पसंख्यांक’ म्हणून विशेष सवलती घेतांना ओवैसी यांना हे तत्त्व का आठवले नाही ? ओवैसी यांचे धर्मबांधव जेव्हा हिंदु धर्माच्या विरोधात गरळओक करतात, हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमणे करतात, लव्ह जिहाद करतात, हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करतात, तेव्हा ओवैसी त्यांच्यापुढे हे तत्त्वज्ञान का पाजळत नाहीत ? सोयीनुसार सर्वधर्मसमभावाचा वापर करणार्‍यांना हिंदू ओळखून आहेत !