मुलांना सर्दी-खोकला झाला आहे का ?

थंडीच्या दिवसांत किंवा एरव्हीही सर्दी-कफ होणे, ही अतिशय सामान्य समस्या आहे. लहान मुले वातावरणात असणार्‍या विविध प्रकारच्या जीवाणूंशी लढा देत असल्याने त्यांना ठराविक काळाने सर्दी-कफ, ताप यांसारख्या तक्रारींचा सामना करावा लागतो. आता सर्दी किंवा कफ झाला की, लहान मुले हैराण होतात. कधी त्यांचे नाक गळते, तर कधी नीट श्वास घेता येत नसल्याने त्यांना अस्वस्थ होते. अनेकदा सर्दी आणि कफ असला की, मुले मलूल होतात, त्यांना जेवण जात नाही. यामुळे घरात असणारा लहानग्यांचा दंगा एकदम न्यून होतो. सर्दी-कफाने वैतागलेली मुले मग अनेकदा कुरबूर करतात आणि सतत आईला चिकटून बसतात. खोकला झाल्यावर मुले फारच हैराण होतात.

अशा वेळी मुलांना लगेच डॉक्टरांकडे नेण्यापेक्षा काही सोपे घरगुती उपाय करून पहाणे केव्हाही चांगले; कारण औषधांची अधिक प्रमाणात सवय लागणे चांगले नसते. सतत औषधे घेतली, तर आपल्या शरिराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती न्यून होते. पूर्वी घरात आजी असल्याने ती घरात कुणाला काही झाले, तर झटपट काहीतरी उपाय करायची आणि मुलांचे आजारपण कुठच्या कुठे पळून जायचे; पण आता विभक्त कुटुंबामुळे अनेक घरांत आजी असतेच, असे नाही. म्हणूनच आज आपण एक खास उपाय पहाणार आहोत. सर्दी-कफापासून आराम मिळण्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.

 कसा करायचा हा उपाय ?

१. २० काळी मिरी आणि १० लवंगा तव्यामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या.

२. त्यानंतर त्या खलबत्त्यामध्ये कुटून त्याची बारीक पूड करायची.

३. आले किसून घ्यायचे आणि त्याचा सुती कपड्यातून रस काढायचा.

४. हा आल्याचा रस मधात घालावा आणि त्यात चिमूटभर मीठ अन् हळद घालायची.

५. या मिश्रणात मिरी आणि लवंग यांची कुटलेली पावडर घालायची अन् सगळे चांगले एकजीव करायचे.

६. दिवसातून २ वेळा हे चाटण अर्धा चमचा घ्यायचे. यामुळे शरिराला उष्णता मिळून सर्दी-कफ आणि खोकला न्यून होण्यास साहाय्य होते.

संकलन : डॉ. प्रमोद ढेरे, निसर्ग उपचार तज्ञ, आरोग्यविषयक व्याख्याते आणि लेखक, पिंपरी-चिंचवड, जिल्हा पुणे.