आपत्‍काळातून तरून जाण्‍यासाठी साधना वाढवून ईश्‍वराचे निस्‍सीम भक्‍त बना !

‘आजच्‍या निधर्मी (अधर्मी) राज्‍यप्रणालीमुळे सध्‍याचा समाज धर्माचरणापासून दुरावला आहे. त्‍यामुळे राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍यावर अनेक संकटे ओढवली आहेत. जगभरात अनाचार आणि अनैतिकता वाढीस लागली आहे, तसेच विविध नैसर्गिक आपत्ती, युद्धसदृश स्‍थिती यांमध्‍येही वाढ होत आहे. मध्‍य-पूर्वेत (सिरीया, इराक आदी ठिकाणी) वाढणारे आय.एस्.आय.एस्.चे प्रस्‍थ, जगभरात होणारी जिहादी आतंकवादी आक्रमणे, ही सर्व उदाहरणे आपत्‍काळ आल्‍याचे द्योतक आहे. संत-महात्‍मे, ज्‍योतिषी आदींच्‍या मताप्रमाणे आपत्‍काळाला प्रारंभ झाला आहे आणि त्‍याची तीव्रता पुढील ३ – ४ वर्षे तरी वाढतच जाणार आहे.

१. आपत्‍काळ ओढवण्‍यामागील कारणमीमांसा :

अतिवृष्‍टिः अनावृष्‍टिः शलभा मूषकाः शुकाः ।

 स्‍वचक्रं परचक्रं च सप्‍तैता ईतयः स्‍मृताः ॥ – कौशिकपद्धति

अर्थ : (प्रजेने धर्माचे पालन न केल्‍यामुळे) अतीवृष्‍टी, अनावृष्‍टी (दुष्‍काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्‍ट्राकर) येतात.

तात्‍पर्य – प्रजा आणि राजा, दोन्‍हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत.

२. साधना न करणारे राज्‍यकर्ते जनतेचे रक्षण करू शकत नाहीत, त्‍यामुळे ईश्‍वराचे ‘भक्‍त’ बना ! : इस्रायलवरील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचे आक्रमण, भारतासह अनेक देशांमध्‍ये होत असलेली अतीवृष्‍टी आदी घटनांमधील मृतांचा आकडा आणि त्‍या आपत्तीच्‍या वेळी सहस्रो नागरिकांना जीवन-मृत्‍यूशी करावी लागलेली झुंज पहाता राज्‍यकर्ते साधनसामग्रीच्‍या संदर्भात कितीही बलवान असले, तरी ते जनतेचे रक्षण करू शकत नाहीत, याची प्रचीती येते. याउलट कोणत्‍याही आपत्‍काळात ईश्‍वर भक्‍ताच्‍या हाकेला धावून येतो, हा इतिहास (उदा. द्रौपदीसाठी भगवान श्रीकृष्‍ण, भक्‍त प्रल्‍हादासाठी नृसिंह) आहे. त्‍यामुळे आपत्‍काळातून तरून जाण्‍यासाठी साधकांनी साधना वाढवून ईश्‍वराचे भक्‍त बनणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी साधकांनी समष्‍टी आणि व्‍यष्‍टी साधना वाढवून भगवंताच्‍या अधिकाधिक अनुसंधानात रहाण्‍यासाठी प्रयत्न करावेत.’

– (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले   

(टीप : वरील चौकट ही याआधी प्रसिद्ध केलेली असून या विशेषांकानिमित्त पुनर्प्रसिद्ध करत आहोत. – संपादक)

‘न मे भक्‍तः प्रणश्‍यति।’  श्रीमद्भगवद़्‍गीता, अध्‍याय ९, श्‍लोक ३१

अर्थ : माझा भक्‍त नाश पावत नाही. भक्‍ताला, साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव आपत्‍काळात वाचवील.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले