राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी जातीय संघटनांचे संघटन करणे महत्त्वाचे !

सध्या हिंदूंमध्ये जातींनुसार विभागणी करून राजकारणी इंग्रजांसारखी ‘फोडा आणि झोडा’ ही नीती अवलंबत आहेत. खरेतर हिंदूंनी राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी जातीय संघटनांचे संघटन करणे का महत्त्वाचे आहे ? याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

१. संघर्षामुळे जीवनातील मार्ग प्रशस्त होतो !

‘हिंदुत्व किंवा हिंदु राष्ट्र यांसाठी कार्य करणार्‍या काहींना पुढे ‘आपल्याशी काही दगाफटका तर होणार नाही ना ?’, अशी भीती वाटते. त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, संघर्ष आणि परीक्षा आपल्या जीवनातील मार्ग प्रशस्त करत असतात. त्या कधी आपल्या मार्गातील बाधा होत नसतात; उलट त्या आपल्यासाठी नवनवीन संधीची दालने उघडत असतात. भगवान श्रीकृष्ण हे निरंतर संघर्ष करूनच भगवंत झाले. श्रीराम संघर्ष करूनच परमात्मा आणि ‘मर्यादा पुरुषोत्तम’ झाले आहेत. ज्यांचे ज्यांचे म्हणून आपण आदराने नाव घेतो, मग ते आपले छत्रपती शिवाजी महाराज किंवा महाराणा प्रताप असो, लोक या महापुरुषांची नावे पुनःपुन्हा घेतात. ही संपूर्ण भूमी ज्यांची आहे, त्या भगवान परशुरामांच्या आज्ञेने समुद्राला मागे हटवून भूमी निर्माण करण्यात आली होती. आजही समुद्र त्यांच्या मर्यादेचे उल्लंघन करत नाही.

श्री. जुगल किशोर तिवारी

२. व्यवसायांमधून जाती निर्माण झाल्याने त्या नष्ट करणे अशक्य !

‘भारतात अनेक जातीनिहाय संस्था आहेत. काही लोकांना वाटते की, जातीनिहाय संघटनांचे नेते आणि पुढारी केवळ राजकारण करण्यासाठी या सर्व गोष्टी करतात. त्यामुळे हे सर्व संपले पाहिजे. ‘जातीनिहाय संस्थांचे या राष्ट्र निर्माण कार्यात राष्ट्रीय एकतेसाठी कशा प्रकारे योगदान होऊ शकते ?’, याचा विचार होणे आवश्यक आहे. जात हे एक उघड सत्य आहे. या वास्तविकतेकडे डोळेझाक करता येणार नाही. कबूतर मांजरीला पाहून डोळे मिटून घेते आणि विचार करत असते की, मांजर निघून गेली असेल; पण केवळ विचार केल्याने मांजर कधी जात नसते. त्याप्रमाणे जात ही गोष्ट या देशातील एक वास्तव आहे. जातींची निर्मिती आपण केली नसून त्या आपोआप निर्माण झाल्या आहेत. आपल्याकडे असलेल्या उद्योग-व्यवसायांमधून या जाती निर्माण झाल्या आहेत. जाती निर्माण करण्यासाठी मनुला दोष दिला जातो, तर कधी वेदांतील ओळींना दोष दिला जातो. ‘ब्राह्मण हे मुखापासून निर्माण झाले, तर बाहूपासून क्षत्रिय निर्माण झाले’, असे वर्णव्यवस्थेविषयी म्हटले आहे. ज्याचे वर्णन स्वतः भगवान श्रीकृष्णाने केले आहे.

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक १३

अर्थ : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या ४ वर्णांचा समूह, गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रितीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्मांचा मी कर्ता असूनही मला (अविनाशी परमात्म्याला) तू वास्तविक अकर्ताच समज. प्रत्येकाच्या व्यवसायावरून जाती बनल्या. चामड्याचे काम करणार्‍याला ‘चांभार’, सोन्याचे काम करणार्‍याला ‘सोनार’, लोखंडाचे काम करणार्‍याला ‘लोहार’, कपडे धुण्याचे काम करणार्‍याला ‘धोबी’ म्हटले जाऊ लागले. आता जसे वैद्यकीय व्यवसाय करणार्‍याला ‘डॉक्टर’ म्हटले जाते. वकिली करणार्‍याला अधिवक्ता म्हणतात. पूजा-पाठ, सत्संग घेणार्‍यांना आपण ‘संत महात्मा’ म्हणतो. या क्रमाने जाती निर्माण झाल्या आहेत. असे असतांना त्यांना नष्ट कसे करणार ?

३. अनेक राजकीय पक्षांचा जात हाच आधारस्तंभ

खरे पहाता अनेक राजकीय पक्षही याच जातीच्या आधारावर बनले आहेत. ते याच आधारावर त्यांचा निवडणूक मतदारसंघ आणि त्यांचे लोकप्रतिनिधी निश्चित करतात. त्यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष, तसेच प्रदेशाध्यक्ष अन्य जातीची व्यक्ती होऊच शकत नाही. सार्वजनिक निवडणुकीत एखादी जागा आरक्षित असेल, तरच तेथे त्या जातीच्या उमेदवारासाठी जागा सोडली जाते. निवडणूक उमेदवारासाठी तिकीट वाटपही तसेच होते. या देशाची ही सत्य परिस्थिती आहे.

४. विशेष जातीविषयक कायद्यांमुळे जातीभेदाला प्रोत्साहन

आता नवनवीन शहर वसवली जात आहेत. तेथे अनेक मजल्यांच्या गगनचुंबी इमारती बनत आहेत. गावांमधील लोक प्रतिदिन शहरात जाऊन राहू लागले आहेत. त्यामुळे थोडा जातीभेद न्यून होत आहे. पहिले म्हणजे भारतीय कुटुंबांमध्ये एकजुटता होती. ती भ्रमणभाष संच आणि दूरचित्रवाणी यांमुळे पार विस्कटून गेली आहे. शेजार्‍यांच्या संदर्भातही तसेच झाले आहे. आपण आपले कुटुंब आणि आपले लोक यांनाच एकत्रित ठेवू शकत नाही, तर आपल्या जातीची एकजूट कशी करून ठेवणार ? आपण आपल्या जातीला महत्त्व मिळावे; म्हणून दुसर्‍या जातींना लक्ष्य करतो. ही सर्वाधिक धोकादायक गोष्ट आहे. आपल्या कायद्यांनीही याला थोड्या प्रमाणात पुष्टी देऊन वाढवले आहे. काही विशेष जातींना संरक्षण देण्यासाठी काही विशेष कायदे बनवले गेले. त्यानंतर पुन्हा आरक्षणाची नीती आली. आधी आरक्षण मर्र्र्यादित काळासाठी होते. ते कांँग्रेसच्या सरकारांनी वाढवत नेले. अर्जुन सिंह आणि मनमोहन सिंह हे मनुष्यबळ विकास मंत्री होते. त्यांनी हे कायदे विश्वविद्यालयांमध्येही लागू केले आहेत. जी गोष्ट संरक्षणाची असायला पाहिजे होती, तर ती आरक्षणात जाऊन सामावली गेली. आपल्या देशाने लोकसंख्येत चीनलाही मागे टाकले आहे. आपण एखादी जात निवडली, तरी त्यातील सर्वांना सरकारी नोकर्‍या मिळणे अशक्य आहे.

५. धर्मरुची आणि धर्मशीलता

ऋग्वेदाने म्हटल्यानुसार जोपर्यंत आपल्या कार्याशी आत्मशक्ती जोडल्या जात नाही. तोपर्यंत आपल्या वाणीत वजन येत नाही. आपल्याकडे जेवढे उपदेशक, आचार्य आणि महंत अन् संत आहेत, ते दुसरीकडे कुठेच नाहीत. तरीही परिवर्तन का होत नाही ? कारण आपल्या समाजात धर्मरुची आहे; पण आचरणात धर्मशीलता नाही. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दिखाऊपणा आहे. लोक बिभीषणाला मोठा महात्मा म्हणतात. बिभीषणाला धर्मरुची होती; परंतु तो धर्मशील नव्हता. प्रथम त्याने रावणाला समजावले; पण त्याने ऐकले नाही. त्याने त्याला हाकलून पळवून लावले; परंतु त्याने प्रभु रामाच्याकडे जाऊनही रावणाच्या मृत्यूचे रहस्य सांगितले नाही. त्यानंतर रामाने बिभीषणाला लंकेचा भावी राजा म्हणून राज्याभिषेक केला. तेव्हाही बिभीषणाने रामाला ‘रावण कसा मरणार? त्याच्या नाभीत अमृत आहे’, हे रहस्य सांगितले नाही. एकदा बिभीषण आणि रावण समोरासमोर आले. रावण म्हणाला, ‘‘अरे धूर्त कपटी, तू येथे आहेस?’’ नंतर रावणाने बिभीषणाच्या दिशेने आसुरी शक्ती सोडली. अत्यंत भयानक शक्ती येत असल्याचे पाहून बिभीषणाने प्रभु श्रीरामाचे स्मरण केले, ‘माझे प्राणप्रिय रामा, या शरणागताच्या दुःखाचा नाश करावा.’ श्रीरामाने त्वरित बिभीषणाला स्वतःच्या मागे केले आणि स्वतः समोर उभा राहून ती शक्ती स्वतःवर घेतली. तेव्हा बिभीषणाला वाटले की, या वेळी तर साक्षात प्रभु आले होते. पुढील वेळी पुन्हा रावणाला सामोरे जावे लागले, तर आपले काय होणार ? त्यानंतर बिभीषण हा रावण कसा मरणार? याचे रहस्य श्रीरामाला सांगतो.

६. धर्मांतरानंतरही जात सुरक्षित !

सध्या हिंदूंनी देवता आणि महापुरुष वाटून घेतले आहेत. हे ठीक असले, तरी दुसर्‍या महापुरुषांना कनिष्ठ समजू नये. त्यांच्याविषयी तुच्छतेने विचार करू नये. शाहीनबागेत धरणे आंदोलन झाले.

तेव्हा त्यांची ‘दलित-मुस्लिम भाई-भाई आणि ब्राह्मण साले कसाई’, अशी भित्तीपत्रके आपल्याला सापडतील. ते आपल्याला कसाई म्हणत आहेत. असे बोलणे योग्य आहे का ? ‘जेव्हा एखाद्या जातीविरुद्ध काही घडते, तेव्हा दुसर्‍या जातीच्या संघटनांचे आम्ही संरक्षण करावे’, अशी त्यांची इच्छा असते. हिंदूंची एकजूट करण्याची इच्छा असली, तरी जेव्हा जातीभेदाची गोष्ट येते, तेव्हा आपण विवश होतो. आपण जातीभेदात पालट करू शकत नाही. धर्मांतरानंतरही जात सुरक्षित राहू शकत नाही. एखादा मुसलमान बनला असेल आणि तो मागासवर्गियांच्या अनुसूची जातीमध्ये येत असेल, तरी त्याला अनुसूचीत पद्धतीचा अधिकार मिळतो, अशी सध्याची स्थिती आहे.

७. हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक !

महनीय लोक जेव्हा एखादी मोठी चळवळ चालवतात, तेव्हा त्यात सहभागी झालेले सर्वजण धर्मयोद्धे नसतात आणि सर्वजण प्राण द्यायला, तसेच तन-मन-धन द्यायलाही सिद्ध नसतात. छत्तीसगडमध्ये लोक त्यांच्या कामाला घराबाहेर जातात. तेव्हा ख्रिस्ती प्रचारक त्यांच्या घरी जाऊन घरातील भोळ्याभाबड्या महिलांना भ्रमित करतात आणि त्यांचे धर्मांतर करतात. आपण आपली हिंदूंची सर्व धर्मचिन्हे सोडून दिली आहेत. हिंदूंनी शेंडी ठेवणे, जानवे (यज्ञोपवीत) घालणे, टिळा लावणे सोडून का दिले आहे ? मंदिरातील हनुमानाच्या चरणांवरून आणलेला शेंदूर घेऊन या आणि स्वतःजवळ ठेवा. यासाठी काही पैसा लागत नाही. तो मासभर पुरेल. घरातून बाहेर पडतांना तो शेंदूर कपाळाला लावून हनुमानाच्या चित्राचे दर्शन घ्या. मी स्वत: शेंडी ठेवतो; कारण संकल्प केला आहे. त्याचा मंत्र आहे,

ॐ चिद्रूपिणि महामाये दिव्यतेजसमन्विते ।
तिष्ठ देवि शिखामध्ये तेजोवृद्धिं कुरुष्व मे ।।

अर्थ : हे चैतन्यमय महामाये, दिव्य तेजाने युक्त अशी देवी, तू शिखेच्या मध्यभागी प्रतिष्ठित होऊन माझ्यातील तेजाची वृद्धी कर.

८. ‘ऑनलाईन कोचिंग’च्या माध्यमातून परीक्षेत उत्तीर्ण होणे कठीण !

हिंदु धर्माचरणावर मोठमोठी पुस्तके लिहिली जाऊ शकतात. हिंदूंच्या १६ संस्कारांवर १ सहस्र पानांची माहिती होईल. त्याहून आपण सनातन संस्थेची लहान लहान पुस्तके घेऊन वाचणे योग्य होईल. सध्या लोकांमध्ये वाचन करण्याची वृत्तीही नष्ट झाली आहे. सर्वकाही भ्रमणभाषसंचाच्या माध्यमातून वाचले जाते. जी गोष्ट जेवढ्या सहजतेने उपलब्ध होते, तेवढ्या लवकर ती नष्ट होते. मग ते ज्ञान असो किंवा पैसा. जी मुले या भ्रमणभाषसंचाच्या माध्यमातून खासगी नोकर्‍या मिळवण्यासाठी सिद्धता करत असतील, तर ते थांबले पाहिजे. ‘ऑनलाईन कोचिंग’च्या माध्यमातून शिकून परीक्षेत उत्तीर्ण होणे फार कठीण आहे. आम्ही एक लहान संस्था चालवतो. शेकडो मुलांना ठेवून त्यांच्याकडून परीक्षेची सिद्धता करून घेतो. मुलांना एखाद्या शब्दाचा अर्थ नीट समजत नसेल, जर ते त्याचा अर्थ भ्रमणभाषसंच किंवा भ्रमणसंगणक (लॅपटॉप) यांवरून शोधतात; परंतु केवळ ते वाचून लक्षात रहात नसते. हीच गोष्ट त्या पैशाची होते. जो अप्रामाणिकपणे कमावतो त्याचेही असेच असते. असे म्हणतात, ‘चोरीचे धन बोरीत (पोत्यात) जाते’, तर ही गोष्ट अशीच असते.

९. धर्मांधांची धर्माविषयीची एकनिष्ठता !

देवाचे नाव घेऊन कार्याला आरंभ करा. ‘जय श्रीकृष्ण’, ‘राधे राधे’, ‘जय श्रीराम’, ‘जय परशुराम’ म्हणा, जे बोलायचे ते बोला. यामुळे घरातील सदस्यांवर संस्कार होईल. मुसलमानांची मुले आपल्याला ‘सलाम’ असेच म्हणतात. तसे आपल्याही मुलांना धर्मशिक्षण द्यावे लागेल. केवळ ‘वाईट आहे’ असे म्हणून काम होणार नाही. धर्मांध संघटित असतात. प्रत्येक शुक्रवारी त्यांचा मौलवी मशिदीतून निघतो. तो नमाजानंतर प्रत्येक गल्ली बोळात जातो आणि जी मुले नमाजासाठी आली नाहीत, त्यांना  प्रत्येक शुक्रवारी मशिदीत जाण्यास सांगतो. मुसलमान अधिकारी आमच्या कार्यालयात मोठ्या पदावर होते. ते नियमितपणे नमाजासाठी मशिदीत जात होते, तसेच कार्यालयातील एखादा कनिष्ठ किंवा चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यालाही त्यांच्या चारचाकी गाडीत बसवून घेऊन जात होते. आपल्याला असे करायला संकोच कसला वाटतो ? कोणती भीती वाटते ? आपण काही आतंकवादी काम करत आहोत का ? आपण राष्ट्रद्रोही काम करत आहोत का ? आपण एखादा देश आणि जाती यांच्या विरुद्ध बोलत आहोत का ? त्यामुळे ‘आपल्याला कुणी अडवू शकत नाही’, ही दृढता आजपासून आरंभ करा. तेव्हा आपल्या आसपासच्या कुटुंबांमध्ये आणि संपूर्ण राष्ट्रात ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हिंदु युवतींची धर्मांधांनी केलेल्या फसवणुकीची पुनरावृत्ती होऊ शकणार नाही.

१०. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी धर्माचरण करून संघटित होणे आवश्यक !

आपल्या मुलांना ‘नमस्कार’ कसा करायचा, हे सांगा. सकाळी उठल्यानंतर घरातही आई-वडिलांना नमस्कार करा. भ्रमणभाषसंचावर ‘सुप्रभात’ असे संदेश पाठवू शकतो. आपण ‘हरि ॐ’ म्हटले, तरच पुढील व्यक्ती ही ‘हरि ॐ’ म्हणेल. कपाळाला टिळा लावणे, शेंडी राखणे, यज्ञोपवीत धारण करणे आणि सात्त्विक वेशभूषा यांचे पुष्कळ महत्त्व आहे. त्यामुळेच आपण एकमेकांना ओळखू शकणार आहोत. जेव्हा एखाद्या गटाला एकसारखाच गणवेश दिला जातो, तेव्हा त्यांच्यात संघटितपणा निर्माण होऊन बळ वाढते. एकरूपता ही एकजूट असते. सनदी अधिकारी नियाज खान यांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्याचे नाव ‘ब्राह्मण द ग्रेट’ असे आहे. या पुस्तकामध्ये लोकशाहीविषयी पुष्कळ चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. ‘हिंदु राष्ट्र येणार आहे’, यात कुणालाही कसलाही संशय असता कामा नये. जर आपल्या सर्वांचे एकजुटीने प्रयत्न झाले, तर निश्चितपणे आपण या जीवनातच हिंदु राष्ट्र निर्मिती झाल्याचे पाहू शकणार आहोत.’

– श्री. जुगल किशोर तिवारी, संरक्षक, अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषद, उत्तरप्रदेश.

श्री. जुगल किशोर तिवारी यांचा संक्षिप्त परिचय

उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरी येथील श्री. जुगल किशोर तिवारी हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असून उत्तरप्रदेशचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) आहेत. तसेच ते ‘अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषदे’चे संरक्षक आणि राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. त्यांनी केलेल्या कौतुकास्पद दीर्घकाळ पोलीस सेवेसाठी त्यांना ‘राष्ट्रपती पदक’ मिळाले आहे. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे हिंदीमध्ये पद्यात लिखाण केले आहे. त्यासाठी ‘साहित्य रत्न पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.


सनातन संस्थेप्रमाणे हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर साधनेचे संस्कार करण्याची आवश्यकता !

भारतात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संस्था आहेत. त्या त्यांच्या स्तरावर त्यांचे कार्य करत आहेत; परंतु त्यांना म्हणावे एवढे यश मिळत नाही; कारण त्यांच्या कार्याशी साधना जोडलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर साधनेचे संस्कार करणे आवश्यक आहे, ज्या प्रकारे सनातन संस्था कार्य करत आहे. ऋग्वेदातील एक मंत्र आहे,

इन्द्रं वर्धन्तो अप्तुरः कृण्वन्तो विश्वमार्यम् ।
अपघ्नन्तो अराव्णः ।

– ऋग्वेद, मण्डल ९, सूक्त ६३, ऋचा ५

अर्थ : आत्म्याचा विकास करत (परमेश्वराचा महिमा गात), आत्म्याला दिव्य गुणांनी अलंकृत करत (श्रेष्ठ कर्म करत) संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू. शत्रूंना (दुष्ट आणि पापी व्यक्तींना) दूर करत तत्परतेने कार्य करू.

तात्पर्य हे आहे, हे परम ऐश्वर्ययुक्त आत्मज्ञानी, तू आत्मशक्तीचा विकास करत गतीशील होऊन, प्रमादरहित होऊन, अनुउदारता, ईर्षा इत्यादींचा नाश करत आर्य बनावे आणि संपूर्ण विश्वाला आर्य बनवावे. आर्य बनण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहे; परंतु त्यासाठी उदार व्हावे लागेल, म्हणजे कंजूसपणा करून चालणार नाही. ईर्षा न करता प्रगतीशील आणि आत्मज्ञानी व्हावे लागेल. सौभाग्याने सनातन संस्था हे कार्य करत आहे.

– श्री. जुगल किशोर तिवारी

संपादकीय भूमिका

मुसलमान व्यक्ती कोणत्याही पदावर असली, तरी प्रत्येक शुक्रवारी नमाजाला जाते, तर मग हिंदूंना प्रतिदिन मंदिरात जायला संकोच कसला ?