उत्तरप्रदेशात कन्हैयालाल याच्यासारखे हत्याकांड झाले असते, तर परिणाम काय झाले असते, हे तुम्हाला ठाऊक आहे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

अलवर (राजस्थान) – जर कन्हैयालाल याच्यासारखे हत्याकांड उत्तरप्रदेशात झाले असते, तर त्याचे पुढे काय परिणाम झाले असते, हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे, अशा शब्दांत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील निवडणुकीच्या प्रसारसभेत राज्यातील काँग्रेस सरकारच्या निष्क्रीयतेवर टीका केली. येथे तिजारा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून खासदार बाबा बालकनाथ यांनी निवडणूक अर्ज भरला. त्यानंतर झालेल्या सभेत योगी आदित्यनाथ बोलत होते. राजस्थानमधील कन्हैयालाल या शिवणकाम करणार्‍या व्यक्तीची धर्मांधांनी शिरच्छेद केला होता. याचा संदर्भ देत योगी आदित्यनाथ यांनी वरील वक्तव्य केले.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, राजस्थानमधील काँग्रेस सरकार हिंदुविरोधी आणि गुंड यांना प्रोत्साहन देणारे सरकार आहे. उत्तरप्रदेशमध्ये कोणताही गुंड गुन्हे करण्याचे धाडस करत नाही. गरीब व्यापारी किंवा सामान्य नागरिक यांच्या भूमीवर गुंड नियंत्रण मिळवू शकत नाहीत. जेव्हा कुणी असे करतो, त्याला बुलडोजर ठीक करतो. मुलींकडे वाकड्या नजरेने पहाण्याचे कुणाचे धाडस होत नाही.