‘सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीचा मृत्‍यू होणे आणि साधकाचा मृत्‍यू होणे’ या दोन प्रसंगांतील भेद दर्शवणारी सूत्रे

‘१८.१०.२०२१ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांचे निधन झाले. त्‍यांच्‍या पार्थिवाचे दर्शन घेतांना माझ्‍या डोळ्‍यांसमोर आपोआप समाजातील एखादी व्‍यक्‍ती मृत होते, त्‍या प्रसंगाचे चित्र आले. ‘सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीचा मृत्‍यू होणे आणि साधकाचा मृत्‍यू होणे’ या दोन प्रसंगांतील भेद दर्शवणारी सूत्रे येथे दिली आहेत.

कै. (सौ.) प्रमिला केसरकर

१. समाजातील एखाद्या व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाल्‍यानंतर जाणवलेली सूत्रे

आम्‍ही नंदुरबार येथे रहात असलेल्‍या वसाहतीत कोरोनाच्‍या काळात २ – ३ जणांचे मृत्‍यू झाले. त्‍या वेळी मी जी स्‍थिती अनुभवली, तशीच स्‍थिती समाजात कुठेही एखाद्याचा मृत्‍यू झाला, तरी असते.

अ. वसाहतीतील एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूच्‍या आधी कुत्र्यांचा रडण्‍याचा आवाज ऐकू येतो. त्‍यावरून ‘काहीतरी अशुभ घडणार आहे’, हे सूचित होते.

आ. एखाद्या व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाल्‍यास ‘त्‍या दिशेला बघू नये’, असे वाटते.

इ. संपूर्ण वसाहतीत एक प्रकारचा दाब जाणवतो आणि हा दाब ३ – ४ दिवस टिकून रहातो.

ई. मी प्रत्‍यक्ष त्‍या ठिकाणी उपस्‍थित नसतांनाही मला ‘पुष्‍कळ जडपणा जाणवणे, डोके दुखणे, काहीही न सुचणे’, असे त्रास होतात.

उ. मृत्‍यू अन्‍य कुटुंबात होऊनही वातावरणातील जडत्‍वामुळे वसाहतीतील लोकांच्‍या दैनंदिन जीवनावर त्‍याचा परिणाम झाल्‍याचे दिसून येते.

सौ. निवेदिता जोशी

२. सौ. केसरकरकाकूंच्‍या पार्थिवाचे दर्शन घ्‍यायला जाण्‍यापूर्वी आणि दर्शन घेतांना

२ अ. जाणवलेली सूत्रे

१. ‘केसरकरकाकूंच्‍या पार्थिवाचे दर्शन घेऊ शकता’, असे समजल्‍यानंतर खोलीतून निघतांना माझे मन शांत होते.

२. काकूंच्‍या पार्थिवाचे दर्शन घेतांना ‘त्‍या गुरुचरणांशी संपूर्णपणे एकरूप झाल्‍या आहेत आणि त्‍या निर्गुण अवस्‍थेतील आनंदावस्‍था अनुभवत आहेत’, असे मला जाणवले.

३. या प्रसंगात आश्रमातील दैनंदिन सेवांमध्‍ये कुठेही पालट झाला नाही. साधकांच्‍या तोंडवळ्‍यावर ताण नव्‍हता. ‘प्रत्‍येक साधकाची नाळ गुरुदेवांशी जोडली आहे’, हे लक्षात आले.

२ आ. अनुभूती

१. त्‍यांच्‍या पार्थिवाचे दर्शन घेतांना माझा ‘श्री विष्‍णवे नमः ।’ हा नामजप आपोआप चालू झाला.

२. मला वातावरणात हलकेपणा जाणवत होता.

वरील प्रसंगावरून ‘येणार्‍या आपत्‍काळात समाजात जी भयानक स्‍थिती निर्माण होईल, त्‍याला साधक स्‍थिरतेने कसे सामोरे जातील ?’, हे लक्षात आले आणि साधकांना अशा पद्धतीने घडवणार्‍या परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी कोटीशः व्‍यक्‍त झाली.’

– सौ. निवेदिता जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक