मंत्रालयात उपमुख्‍यमंत्र्यांच्‍या कार्यालयाबाहेर बसवली जाळी !

आत्‍महत्‍येसाठी उडी न मारण्‍याच्‍या दृष्‍टीने उपाय

मुंबई, १२ ऑक्‍टोबर (वार्ता.) – आत्‍महत्‍येसाठी कुणालाही उडी मारता येऊ नये, यासाठी मंत्रालयात ६ व्‍या मजल्‍यावर उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या कार्यालयाच्‍या बाहेर १२ ऑक्‍टोबर या दिवशी जाळी लावण्‍यात आली आहे. अभ्‍यागतांपैकी एकाने उडी मारून आत्‍महत्‍या केल्‍यामुळे मंत्रालयाच्‍या पहिल्‍या मजल्‍याच्‍या मध्‍यभागी खुल्‍या असलेल्‍या भागात यापूर्वी जाळी बसवण्‍यात आली आहे. मंत्रालयाच्‍या कोणत्‍याही मजल्‍यावरून उडी मारल्‍यास त्‍या जाळीवर ती व्‍यक्‍ती अडू शकते; मात्र आत्‍महत्‍येसाठी उडी मारताच येऊ नये, यासाठी उपमुख्‍यमंत्र्यांच्‍या कार्यालयाबाहेर जाळी बसवण्‍यात आली आहे. अशा प्रकारे सर्वच मजल्‍यांवर मंत्र्यांच्‍या कार्यालयांबाहेर जाळी बसवण्‍यात येणार आहे, असे सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले. (मंत्रालयासारखे संवेदनशील ठिकाण आत्‍महत्‍येचे केंद्र होणे दुर्दैवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका

आत्‍महत्‍येवरील उपाययोजना म्‍हणून जाळी बसवण्‍याऐवजी जनतेचे प्रश्‍न त्‍वरित आणि समाधानकारक सोडवणे आवश्‍यक !