मंदिरांचे सरकारीकरण करून ती चालवणारे तमिळनाडू सरकार ‘सनातन धर्मा’ची मंदिरेही नष्‍ट करणार का ? – गायत्री एन्., संस्‍थापिका, ‘भारत व्‍हॉईस’

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘सनातन धर्म डेंग्‍यू, मलेरिया यांच्‍यासारखा नष्‍ट होणार का ?’

गायत्री एन्

मुंबई – स्‍वत:ला ख्रिस्‍ती मानणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलीन यांना सनातन धर्म नष्‍ट करायचा आहे; पण द्रविड विचारधारेवर चालणार्‍या तमिळनाडू सरकारला तेथील जातीयवाद मिटवता आलेला नाही. उलट तो अधिक वाढलेला आहे. तेथील हिंदु आज हतबल झाला आहे. तमिळनाडूमध्‍ये अतिक्रमणाच्‍या नावाने हिंदूंची पुरातन मंदिरे तोडली जात आहेत; मात्र चर्च किंवा मशीद यांना हातही लावला जात नाही. द्रमुक सरकारला हिंदूंमधील भेदभाव दिसतो; मात्र चर्चमधील भेदभाव का दिसत नाही ? तमिळनाडूमध्‍ये मंदिरांचे सरकारीकरण झालेले आहे आणि मंदिरे चालवणारे सरकारमधील मंत्री सनातन धर्म नष्‍ट करू पहात आहेत. ‘असे सरकार हिंदूंची मंदिरे चालवणार कि ती नष्‍ट करणार ?’, असा प्रश्‍न ‘भारत व्‍हॉईस’च्‍या संस्‍थापिका गायत्री एन्. यांनी केला आहे. हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘सनातन धर्म डेंग्‍यू, मलेरिया यांच्‍यासारखा नष्‍ट होणार का ?’, या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्‍या बोलत होत्‍या. समितीचे देहली प्रवक्‍ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी वक्‍त्‍यांशी संवाद साधला.

उदयनिधी स्‍टॅलीन यांच्‍यासह अन्‍य दोषींवर कारवाई करा ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वोत्तर भारत संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. शंभू गवारे

सनातन धर्माविषयी द्वेषमूलक विधाने केल्‍यानंतरही उदयनिधी स्‍टॅलिन यांच्‍या विरोधात तमिळनाडूमध्‍ये एकही गुन्‍हा नोंदवला जात नाही. खरेतर उदयनिधी यांनी देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या आहेत. असे असतांना याउलट उदयनिधी यांच्‍या आक्षेपार्ह विधानाला विरोध करणार्‍या, तसेच आंदोलन करणार्‍या हिंदूंवर आणि हिंदु संघटना यांच्‍यावर गुन्‍हे नोंदवून त्‍यांना अटक केली जात आहे. हा प्रकार अत्‍यंत वेदनादायी आहे. या आंदोलनाची नोंद घेऊन उदयनिधी स्‍टॅलीन आणि अन्‍य दोषींवर कारवाई केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

सत्तेच्‍या लालसेने सनातन धर्मावर टीका ! – जे.के., माजी वृत्तनिवेदक, ‘पी गुरुज् होस्‍ट’ मेगा टीव्‍ही

द्रमुक (द्रविड मुन्‍नेत्र कळघम् म्‍हणजे द्रविड प्रगती संघ) पक्षाची द्रविड संस्‍कृतीची विचारधारा सनातनविरोधी आहे. यामुळे त्‍यांनी प्रथम ब्राह्मणांना विरोध केला, नंतर हिंदूंच्‍या देवतांच्‍या मूर्ती तोडल्‍या, देवतांचा अवमान केला. हे सर्व केल्‍याने सत्ता मिळाली, असे द्रमुकच्‍या नेत्‍यांना वाटते. ‘सनातन धर्म नष्‍ट झाला पाहिजे, असे विधान करणे’, हेही या विरोधाचाच एक भाग आहे. हिंदूंनी आज संघटित होऊन याला विरोध केला पाहिजे. द्रमुक समर्थक भारताचा स्‍वातंत्र्यदिन ‘काळा दिवस’ म्‍हणून मानतात. त्‍यांना तमिळनाडूवर ब्रिटिशांचे राज्‍य हवे आहे. विरोधी पक्षांनी राष्‍ट्रीय स्‍तरावर ‘इंडिया’ (I.N.D.I.A.) नावाची आघाडी बनवली आहे. त्‍यात सर्वाधिक जागा स्‍वपदरी पाडून घेणे आणि आघाडीच्‍या पंतप्रधानपदासाठी दावा करणे, यांसाठीही अशी विधाने केली जात आहेत.