(म्हणे) ‘सनातन धर्माविरुद्ध पुढील २०० वर्षे बोलत राहू !’ – उदयनिधी स्टॅलिन

उदयनिधी स्टॅलिन यांची पुन्हा एकदा गरळओक !

उदयनिधी स्टॅलिन

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूमध्ये गेल्या १०० वर्षांपासून सनातन धर्माविरुद्ध आवाज उठवला जात आहे. आम्ही पुढील २०० वर्षेही त्याविरुद्ध बोलत राहू, असे प्रक्षोभक विधान तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा करत सनातन धर्मावर टीका केली आहे. कुड्डालोर जिल्ह्यातील नेवेली येथे ते बोलत होते.

उदयनिधी पुढे म्हणाले की, यापूर्वी अनेक प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार आणि एम्. करुणानिधी याविषयी बोलले होते. सनातन धर्माला झालेल्या प्रखर विरोधामुळेच महिला घराबाहेर पडू शकल्या. सती प्रथा सारखी सामाजिक कुप्रथा त्यामुळेच संपली. (सनातन धर्मामध्ये काळानुसार निर्माण झालेल्या अयोग्य प्रथांना सनातन धर्मातील संतांनीही तितकाच विरोध आणि त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या संतांनी ‘सनातन धर्म चुकीचा आहे’ किंवा ‘तो नष्ट केला पाहिजे’, असे म्हटले नाही, तर अयोग्य गोष्टींना विरोध केला. द्रमुक अयोग्य गोष्टींच्या नावाखाली धर्म संपवण्याची भाषा करत आहेत. हा त्याचा सनातनद्वेष आहे ! – संपादक) द्रमुकची स्थापनाच अशा समाजकंटकांना विरोध करणार्‍या तत्त्वांवर झाली आहे. (द्रमुकची स्थापना सनातनद्वेषातून झालेली असल्याने उदयनिधी असे विधान करून दलित, मागसवर्गीय आदींची मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. द्रमुकची विचारसरणी नष्ट करण्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी तमिळनाडूमध्ये हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ करून सनातन धर्माविषयीचे अपसमज दूर केले पाहिजेत ! – संपादक)

सौजन्य: Oneindia Hindi

उदयनिधी यांच्याकडून भाजपची कचर्‍याशी तुलना !

भाजपवर टीका करतांना उदयनिधी म्हणाले की, कचर्‍यातून साप आपल्या घरात घुसतो. सापांचा नायनाट करायचा असेल, तर कचरा होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. वर्ष २०२४ च्या निवडणुकीत भाजप आणि अण्णाद्रमुक यांना तमिळनाडूतून हद्दपार केले पाहिजे.

संपादकीय भूमिका

सहस्रो वर्षांपासून असुर आणि काही शतके मोगल यांनी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र सनातन धर्म आजही जिवंत आहेत, तर नष्ट करणारे स्वतःच नष्ट झाले आहेत, हेच परत परत होत रहाणार आहे !