‘आदित्य एल् १’चे यशस्वी प्रक्षेपण !

  • ६३ मिनिटांत पोचले पृथ्वीच्या कक्षेत !

  • १६ दिवसानंतर करणार सूर्याच्या दिशेने प्रयाण !

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताच्या सूर्य मोहिमेच्या अंतर्गत ‘आदित्य एल् १’ हे यान २ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील कॅप्टन सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे यान ‘पी.एस्.एल्.व्ही-सी ५७’ या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर ६३ मिनिटांनी हे यान पृथ्वीच्या कक्षेत पोचले. येथे हे यान १६ दिवस रहाणार आहे. त्यांनतर ते सूर्याच्या दिशेने मार्गस्थ होईल. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर असणार्‍या ‘लांग्राज पाईंट १’ येथे ४ मासानंतर हे यान पोचले अन् तेथे स्थिर होईल. येथे पुढील ५ वर्षे राहून ‘आदित्य एल् १’ सूर्याचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे सूर्यामध्ये होणारे पालट पृथ्वीवरील अवकाश आणि जीवन यांवर कसा परिणाम करतात ? हे समजू शकते. ‘इस्रो’ला या मोहिमेसाठी अनुमाने ४०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

‘आदित्य एल् १’च्या माध्यमातून कशाप्रकारे सर्व ग्रह सूर्याला व्यवस्थितपणे प्रदक्षिणा घालत आहेत ?, सूर्याची निर्मिती कशी झाली ?, पृथ्वीची उत्पत्ती कुठून झाली ?, संपूर्ण सौरमंडळ सूर्यातूनच निघाले आहे ? कि पृथ्वीसह सौरमंडळातील ग्रह आणखी कुठून आले ? या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जाईल. ही संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम ‘आदित्य एल् १’ करेल.

चीनच्या सूर्य मोहिमेपेक्षा भारताची मोहीम अधिक प्रभावी !

भारताच्या पूर्वी चीनने सूर्य मोहीम राबवली आहे. चीनने ८ ऑक्टोबर २०२२ या दिवशी ‘ए.एस्.ओ.-एस्.’ हे यान प्रक्षेपित केले होते. ते सूर्याच्या दिशेने न जाता पृथ्वीपासून ७२० किलोमीटर उंचीवर राहून, म्हणजे पृथ्वीच्या कक्षेत राहून सूर्याचा अभ्यास करत आहे. या तुलनेत भारताचे ‘आदित्य एल् १’ हे यान पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर जाऊन सूर्याचा अभ्यास करणार आहे. भारताच्या या यानाचे वजन केवळ ४०० किलो, तर चीनच्या यानाचे वजन ८८८ किलो इतके आहे. भारताचे यान अनुमाने ४०० कोटी रुपयांत बनवले, तर चीनने त्याच्या यानावर भारतापेक्षा अधिक पैसे खर्च केले आहेत.