(म्‍हणे) ‘फाळणीच्‍या रक्‍तपाताचा इतिहास शाळेत शिकवायला नको !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांचे वक्‍तव्‍य

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार

पुणे – वर्ष १९४७ मध्‍ये देश स्‍वतंत्र होतांना देशात फाळणी झाली. भारतातील अनेक लोक पाकमध्‍ये गेले आणि पाकमधील अनेक लोक भारतात आले. भारताच्‍या फाळणीचा रक्‍तपाताचा इतिहास भयंकर आहे. नव्‍या पिढीपुढे हा इतिहास जाऊ नये, फाळणीचा इतिहास शिकवणे कुणाच्‍याही हिताचे नाही. सी.बी.एस्.ई. बोर्डाकडून (केंद्रीय विश्‍वविद्यालयाने) एक पत्रक काढून शाळेत फाळणीच्‍या भयंकर दिवसांचे स्‍मरण करण्‍याचा कार्यक्रम आयोजित करण्‍यास सांगितले आहे, जे चुकीचे आहे, असे प्रतिपादन राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात केले. (फाळणीचा इतिहास आजवरच्‍या सरकारांनी लपवला, ही इतिहासाशी केलेली प्रतारणा आणि पाप आहे. जे राष्‍ट्र स्‍वत:चा इतिहास विसरते, ते कालप्रवाहात टिकून न रहाता नामशेष होते. फाळणीचा इतिहास शिकवला गेला असता, तर देश आणि देशवासीय यांना फाळणीत कोणत्‍या भयंकर अत्‍याचारांना सामोरे जावे लागले, हे समजल्‍यावर स्‍वातंत्र्याचे मूल्‍य कळळेले असते आणि पाकशी कसे वागावे ? हेसुद्धा लक्षात आले असते ! – संपादक) सरहद संस्‍थेच्‍या सरहद पब्‍लिक स्‍कूल, धनकवडी येथील नवीन इमारत आणि गोपाळकृष्‍ण गोखले प्रबोधिनीचा शुभारंभ शरद पवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

या कार्यक्रमात शरद पवार पुढे म्‍हणाले की, केंद्रीय विद्यालयाने फाळणी झाली, त्‍या भयंकर दिवसाचे स्‍मरण करा, असे सांगितले. त्‍या वेळी हिंदु-मुसलमान यांच्‍यात दंगली झाल्‍या, तर ते नवीन पिढीच्‍या मनावर पुन्‍हा बिंबवण्‍यासारखे आहे. (फाळणी का झाली ? कुणी केली आणि तिचे परिणाम काय झाले, हे भारतियांना समजणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. त्‍यामुळे ते भविष्‍यात येऊ शकणार्‍या संकटांविषयी सजग आणि सतर्क राहू शकतात !- संपादक) आम्‍हाला देशात धार्मिक युद्ध नको, संसदेत अशा प्रकारे जाणीव करून देण्‍यासाठी आक्रमक झाले पाहिजे. याविषयीच्‍या सूचना शरद पवार यांनी महाराष्‍ट्राचे उच्‍च आणि तंत्रशिक्षण मंत्री, तसेच पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही याच कार्यक्रमात झालेल्‍या भेटीत केल्‍या. त्‍यात त्‍यांनी फाळणीचा इतिहास नव्‍या पिढीच्‍या मनावर बिंबवणे, हे देशाच्‍या सामाजिक, सांघिक ऐक्‍यासाठी योग्‍य रहाणार नाही. समाजात विसंवाद वाढेल, असे सांगितले. (समाजाला सत्‍य समजल्‍यावर समाजात विसंवाद वाढेल कि समाजाला अशा घटना कशा हाताळायच्‍या आणि टाळायच्‍या याची दिशा मिळेल ? समाजाला सत्‍यापासून वंचित न करता फाळणीसह जो इतिहास काँग्रेसने भारतियांपासून लपवून ठेवला आहे, तो सरकारने शाळा-महाविद्यालयांमध्‍ये विद्यार्थ्‍यांना शिकवणे आवश्‍यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

जर्मनीमध्‍ये अडॉल्‍फ हिटलरचा इतिहास शिकवला जातो. तो कुणीही नाकारत नाही. त्‍यामुळे फाळणीचा इतिहास भारतातील मुलांना का शिकवू नये ? मुसलमानांच्‍या लांगूलचालनासाठीच अशी विधाने केली जातात, हे लक्षात घ्‍या !