श्रीरामजन्मभूमीवर जिहादी आतंकवादाचे संकट !

  • आय.एस्.आय.ने चारही बाजूंनी अयोध्येला घेरल्याची पोलिसांनी व्यक्त केली चिंता !

  • जानेवारी २०२४ मध्ये श्रीरामजन्मभूमीचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होऊ शकतो लक्ष्य !

  • उत्तरप्रदेश राज्य आतंकवादविरोधी पथकाने आतापर्यंत ७ जिल्ह्यांतून १५ आतंकवाद्यांना केली अटक !

  • ‘बाबरी ढाच्या’च्या नावाने आतंकवाद्यांना भडकावण्यात आल्याचे प्राथमिक अन्वेषण !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित लोक सहभागी होणार आहेत. अशातच अयोध्येच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पाकची गुप्तचर संघटना ‘आय.एस्.आय.’चे हस्तक, आतंकवादी आणि ‘स्लीपर सेल्स’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांधांचे स्थानिक गट) यांना सातत्याने अटक होत आहे.

१. श्रीरामजन्मभूमीचा निकाल लागल्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये बलरामपूरमधून एका आतंकवाद्याला, फेब्रुवारी-जुलै आणि सप्टेंबर २०२१ मध्ये लक्ष्मणपुरीमधून ४ आतंकवादी, सप्टेंबर २०२१ मध्ये प्रयागराज, रायबरेली अन् बहराइचमधून ३ आतंकवादी आणि गोरखपूरमधून एप्रिल २०२२ मध्ये एका आतंकवाद्याला अटक करण्यात आली होती.

२. आता नव्याने वर्ष २०२३ मध्ये उत्तरप्रदेश राज्य आतंकवादविरोधी पथकाने २ जुलै या दिवशी गोंडा येथून सद्दाम, १ ऑगस्टला मुकीम, १६ जुलै या दिवशी रईस, तर १८ जुलैला सलमान आणि अरमान या ‘आय.एस्.आय.’चे हस्तक आणि आतंकवादी यांना अटक केली. या प्रकरणी ६ जुलै या दिवशी तारिक नावाच्या व्यक्तीलाही गोरखपूरमधून अटक करण्यात आली होती.

३. या सर्व प्रकरणांमध्ये ‘बाबरी ढाच्या’च्या नावाने आतंकवाद्यांना भडकावण्यात आल्याचे आतंकवादविरोधी पथकाच्या प्राथमिक अन्वेषणातून समोर आले आहे. सर्वांना ‘स्लीपर सेल’सारखे प्रशिक्षण देण्यात आले होते आणि आदेश मिळाल्यानंतर ते कार्यान्वित होणार होते.

४. उत्तरप्रदेश राज्य आतंकवादविरोधी पथकाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, बाबरी ढाचा पाडल्याचे सांगत या सर्वांना भडकावण्यात आले. बाबरी पाडल्याचा सूड घेणे, हे या लोकांचे ध्येय होते. अयोध्येजवळ या सर्वांची उपस्थिती काही आतंकवादी कारस्थानाकडेही बोट दाखवत आहे.

५. अधिकार्‍याने पुढे स्पष्ट केले की, बाबरी पाडल्यानंतर अयोध्येतील सुरक्षाव्यवस्था उत्तरप्रदेशातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक कडक आहे. अयोध्या हे आतंकवादी संघटनांचे लक्ष्य असू शकते, ते शेजारील गोंडा, बलरामपूर, बहराइच, बाराबंकी, गोरखपूर आणि आंबेडकरनगर या जिल्ह्यांमध्ये घुसखोरी करत आहेत. आतंकवादी संघटनांचे ‘स्लीपर सेल’ येथे रहात आहेत. वर्ष २०१९ पासून येथे सातत्याने ‘आय.एस्.आय.’चे दलाल सापडत आहेत.

६. अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार आय.एस्.आय. आणि आतंकवादी संघटना यांचे लक्ष्य जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत होणारा कार्यक्रम हासुद्धा आहे.

आतंकवादी सद्दाम शेख मुळचा हिंदु, मुसलमान बनून केला ‘लव्ह जिहाद’ !

लक्ष्मणपुरी येथून अटक करण्यात आलेल्या सद्दाम शेख या आतंकवाद्याचे अल्-कायदा, हिजबुल मुजाहिदीन आणि ‘अन्सार गजवातुल हिंद’ यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले होते. त्याची पत्नी रुबिनाने सांगितले की, सद्दाम पूर्वी हिंदू होता. त्याचे नाव रणजित सिंह होते. तो बेंगळुरूमध्ये ट्रक चालवत असे. त्याने मला धोका दिला. मुसलमान असूनही खोटे सांगून माझ्याशी विवाह केले. देशाला धोका देणार्‍याकडून मी काय अपेक्षा करू ? मला त्याच्यावर विश्‍वास नाही. तो त्याच्या मुलांना इस्लामचे कट्टर शिक्षण देत असे.

अन्य एक आतंकवादी महंमद रईस हा ‘आय.एस्.आय.’चा हस्तक असून त्याने पाकिस्तानातील आतंकवाद्यांना गोपनीय माहिती पुरवली. तिसरा आतंकवादी मुकीम हासुद्धा ‘आय.एस्.आय.’चा हस्तकच ! मुकीमच्या आईने प्रसारमाध्यमांना सांगितले की, मुकीम पुष्कळ साधा होता. रईसने त्याला अडकवले. अन्य एक आतंकवादी सलमान सिद्दीकी हाही ‘आय.एस्.आय.’चा हस्तक होता. त्याचे कुटुंबीय म्हणतात की, सद्दाम आणि रईस यांनी त्याला अडकवले. तारबगंज तालुक्यामधील रईसच्या घरापासून ३० किमी अंतरावर सलमान सिद्दीकी याचे घर आहे. त्यालाही अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या देशात त्यांच्या आराध्य प्रभु श्रीरामाचे जन्मस्थानच आतंकवादाच्या सावटाखाली असणे, ही हिंदूंसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट ! अशी दु:स्थिती असलेला जगातील एकमेव देश भारत !
  • ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’चा पुरस्कार करत हिंदूंची मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांचा जिर्णोद्धार अन् सुशोभीकरण यांसाठी सरकारने केलेले प्रयत्न स्तुत्य असले, तरी त्यांच्या संरक्षणास आपण तेवढ्या प्रमाणात सज्ज आहोत का ?