अभिव्यक्तीस्वातंत्र्याची दिशा भारतविरोधी शक्तींनी निश्चित केली आहे !- चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस

रामनाथी, २२ जून (वार्ता.) – हिंदु धर्म दुराचाराला अधर्म मानतो. विश्वकल्याणाच्या भावनेने काम करणे हा धर्म आहे. योग्य कृतीलाच धर्म म्हटले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अन्यांना पिडा देणे हा अधर्म आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यातील मुख्य अडचण ही आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कि स्वैराचार ? हे नेमके निश्चित कोण निश्चित करणार ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य नेमके कोणते ? याची दिशा भारतविरोधी शक्तींनी निश्चित केली आहे. यामध्ये डाव्या शक्ती आघाडीवर आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अनावश्यक प्रसार करण्यात आला आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य साम्यवादी, डावे, नक्षलवादी आदी राष्ट्रविरोधी शक्तींच्या बाजूने झुकलेले आहे.

राज्यघटनेतील कलम १९ (१ ए) नुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; मात्र १९ (२) नुसार भारताच्या अखंडत्वाच्या दृष्टीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रतिबंधही घालण्यात आला आहे. सद्यःस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोयीनुसार वापरले जात आहे. शबरीमला मंदिरामध्ये स्त्रियांच्या प्रवेशासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सूत्र उपस्थित केले जाते; मात्र अन्य धर्मियांच्या विषयी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले मूग गिळून गप्प रहातात, असे उद्गार सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी उपस्थितांना संबोधित करत होते.