साधनेच्या बळावर समाजातील नकारात्मकतेशी लढून हिंदु राष्ट्र आणू शकतो ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., कोडागू, कर्नाटक

कर्नाटकातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

विद्याधिराज सभागृह, १८ जून (वार्ता.) – मी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) विरोधात खटला लढत आहे. यापूर्वी हा खटला लढवणार्‍या अधिवक्त्यांनी या खटल्यातून माघार घेतली; कारण तेथे पी.एफ्.आय’चे कार्यकर्ते मैसुरू जिल्हा न्यायालयाच्या आवारात अधिवक्त्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ काढत आणि त्यांना धमक्या देत असत. माझ्या संदर्भातही तेच केले; परंतु नामस्मरण करत असल्यामुळे मला त्याची भीती वाटली नाही. मला मिळत असलेल्या धमक्यांविष्यी न्यायाधिशांना कळल्यावर मला संरक्षण देण्यात आले, तरीही माझ्यावर आक्रमण झाले.

नामस्मरण करत असल्याने मला आता कुठल्याच प्रकारची भीती वाटत नाही. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ अधिवकत्यांनी प्रवास करतांना, आपली सुनावणी चालू होईपर्यंत जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा नामस्मरण करावे. येथे सनातन संस्था शिकवत असलेले स्वभावदोष निर्मूलन शिकून कृतीत आणा. त्याने समाजातील नकारात्मक शक्तींशी लढून आपण हिंदु राष्ट्र आणू शकतो, असे प्रतिपादन कर्नाटकातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. यांनी केले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या ‘पी.एफ्.आय. : भविष्यकालीन संकट’ या विषयावर बोलत होते.

क्षणचित्रे

१. यावेळी ‘अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्याकडे पाहून काय वाटते ?’, असा सूक्ष्म प्रयोग उपस्थितांकरून करून घेण्यात आला. तेव्हा अनेकांना ‘अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्याकडे पाहून प्रसन्न वाटले’, ‘त्यांच्या चेहर्‍यावर साधनेचे तेज जाणवले’, असे सांगितले. अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्याविषयी बोलतांना नाशिक येथील हिंदुत्वनिष्ठ रवींद्र पाटील, यती मा चेतनानंद सरस्वती, प्रसन्न अय्यर, कुमार रेड्डी आदींनी त्यांना जाणवलेली सूत्रे सांगितली.

२. यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रामानंद गौडा म्हणाले, ‘‘अधिवक्ता कृष्णमूर्ती धर्मनिष्ठ अधिवक्ता आहेत. त्यांचा अखंड नामजप चालू असतो. प्रवासात ते प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकतात. ‘प्रवास कसा पूर्ण झाला  ?’, हे कळत नाही, असे ते सांगतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी त्यांच्या मनात पुष्कळ भाव असून ते त्यांच्याविषयी कितीही वेळ बोलू शकतात. न्यायालयीन प्रकरणे आणि त्यासाठीचा प्रवास करतांना ते स्वतःचे धन खर्च करतात. एकदा ३-४ घंटे प्रवास करून एका खटल्यासाठी न्यायालयात पोहोचले होते; पण तेथे गेल्यावर न्यायाधीश सुट्टीवर असल्याचे कळले. दुसर्‍या अधीवक्त्याने त्यांना याविषयी विचारल्यावर त्यांनी ‘ईश्‍वरइच्छा’, असे सांगितले. त्यांच्या मनात याविषयी कुठलाही विचार किंवा प्रतिक्रिया आली नव्हती. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आक्रमण झाले तेव्हा ‘परमपूज्य गुरुदेवांनी माझे रक्षण केले आहे. मला अजून पुष्कळ कार्य करायचे आहे’, असे सांगितले. आता त्यांनी कर्नाटकातील अधिवक्त्यांचे संघटन करण्याचे दायित्व स्वीकारले आहे.