पाकमधील हिंदूंना भारताचा व्हिसा न मिळाल्याने त्यांना करावी लागते आत्महत्या !

गेल्या १२ वर्षांत पाकमध्ये १४ सहस्र हिंदु मुलींचे अपहरण आणि धर्मांतर

पाकिस्तानी हिंदू

नवी देहली – पाकिस्तानातील हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. हिंदु मुलींचे अपहरण आणि त्यांचे धर्मांतर या नेहमीच्या घटना झाल्या आहेत. याला कंटाळून तेथील हिंदूंना भारतात यायचे आहे; मात्र भारताचा व्हिसा (पारपत्र) न मिळाल्याने हिंदु समाजातील अनेकांनी आत्महत्या केल्या.

१. सिंधमधील गदिया लुहार साहाय्यता समितीचे अध्यक्ष मंजी लुहार उपाख्य काका यांनी सांगितले की, गेल्या ६ मासांमध्ये त्यांच्या ओळखीच्या ४ हिंदूंनी आत्महत्या केल्या आहेत. या लोकांना भारतात यायचे होते; पण त्यांना व्हिसा दिला जात नव्हता. पाकिस्तानात अशी शेकडो हिंदु कुटुंबे आहेत, ज्यांना भारतात येण्यासाठी व्हिसा मिळत नाही आणि त्यांच्या कुटुंबांची पाकिस्तानातील स्थिती धोक्यात आली आहे.

२. सिंधमधील मीरपूर खास येथील मोहन यांना भारतातील जैसलमेरला यायचे होते; परंतु ३ वर्षांपासून त्यांना व्हिसा मिळत नाही. याला कंटाळून त्यांनी विष प्राशन केले. तसेच कच्छुरी येथील एका हिंदु वृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

३. पाकिस्तानातून विस्थापित झालेला गणेश जयपूर येथे रहातो. त्याने सांगितले की, त्याचे काका पाकिस्तानातील रहिमयार खानमध्ये मजूर म्हणून काम करतात. त्यांना ६ मुली आहेत. त्यातील तिघांना धर्मांध मुसलमानांनी बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले, तरी एकीची हत्या केली. संधी मिळताच गणेश १० वर्षांपूर्वी भारतात आला.

४. पाकिस्तानातील कोटगुलाम येथे रहाणारी विष्णुराम यांची मुलगी नववीत शिकत होती. तेथील काही मुसलमानांनी तिला पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी पुष्कळ प्रयत्न करूनही त्यांना त्यांची मुलगी सापडली नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांच्या बहिणी आणि मुली यांना मुसलमान पळवून नेतात. पालक आवाज उठवतात; पण पोलिसांपासून न्यायव्यवस्थेपर्यंत त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले जात नाही.

५. मीरपूर खास येथे रहाणारे राव कुटुंब ३ मासांपूर्वी पाकिस्तानातून राजस्थानमध्ये पोचले. त्यांच्या एका मुलीचे धर्मांतर करण्यात आले होते. राव कुटुंबातील लोकांचे म्हणणे आहे की, त्यांची मुलगी आता कोणत्या स्थितीत आहे, हे त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना ठाऊक नाही.

६. समाजसेवक रोशन भिल यांनी सांगितले की, अशा प्रत्येक कुटुंबाला भूतकाळ विसरायचा असतो; पण तसे होत नाही. पाकिस्तानमध्ये गेल्या १२ वर्षांत १४ सहस्र हिंदु मुलींचे अपहरण, धर्मांतर आणि सामूहिक बलात्कार यांच्या घटना समोर आल्या आहेत.

७. पाकमधील अत्याचारांमुळे व्यथित झालेल्या तेथील हिंदूंनी भारतात आश्रय देण्याची मागणी भारत सरकारकडे केली आहे. भारतात येणार्‍या हिंदु कुटुंबांना व्हिसा देण्याची मागणी केली आहे. तसेच भारतात असलेल्या कुटुंबांना पाकिस्तानात परत न पाठवण्याचे आवाहन केले आहे.

संपादकीय भूमिका

  • पाकमधील हिंदूंची ही दयनीय स्थिती संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आदींना दिसत नाही का ?
  • बाणेदार परराष्ट्र धोरणाद्वारे युरोप आणि अमेरिका यांना नमवणारा भारत शेजारील पाकिस्तानमधील हिंदूंच्या समस्यांकडे केव्हा लक्ष देणार ?