प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात नगर येथील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

(डावीकडून) सद्गुरु नंदकुमार जाधव, पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, श्री. सुनील घनवट, उद्योजक श्री. नंदलाल मणियार (दीपप्रज्वलन करतांना)

नगर, १८ मे (वार्ता.) – हिंदु राष्ट्रासाठी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज आवश्यक असून याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! समर्थ रामदासस्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे मावळ्यांचे संघटन करून छत्रपतींनी ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. त्याचप्रमाणे ‘सामर्थ्य आहे चळवळींचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।’ या वचनानुसार हिंदूंनी साधना करून भगवंताचे अधिष्ठान प्राप्त करणे आवश्यक ठरते. आध्यात्मिक साधनेला महत्त्व देऊन या हिंदु राष्ट्राच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

अधिवेशनाचे उद्घाटन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी व्यासपिठावर पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, उद्योजक श्री. नंदलाल मणियार उपस्थित होते. या अधिवेशनात वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. याचसमवेत स्थानिक स्तरावर आंदोलन करणे, निवेदन देणे, तक्रार प्रविष्ट करणे या कृती करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी केला.

अधिवेशनाला साहाय्य करणार्‍या मान्यवरांचे समितीचे श्री. रामेश्वर भुकन यांनी आभार व्यक्त केले. या अधिवेशनास बजरंग दलाचे श्री. कुणाल भंडारी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. बापू ठाणगे, अधिवक्ता अभिषेक भगत, समितीचे श्री. सुनील घनवट, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. संजय अडोळे, हिंदु जागरण मंचाचे श्री. अभिमन्यू जाधव, अधिवक्ता पंकज खराडे यांसह नगर, नेवासा, कडा, राहुरी, येथील हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. अधिवेशनाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आली.

चर्चासत्रात व्यासपिठावर उपस्थितांचे छायाचित्र -उजवीकडून श्री. कुणाल भंडारी, श्री. बापू ठाणगे, अधिवक्ता अभिषेक भगत, श्री. सुनील घनवट, श्री. संजय अडोळे, श्री. अभिमन्यू जाधव, अधिवक्ता पंकज खराडे

हिंदु मुली अथवा महिला यांना फसवले जात असल्याचे लक्षात आल्यास संपर्क करा ! – कुणाल भंडारी, बजरंग दल

या पुढे हिंदु मुलींना छेडण्याचा प्रयत्न केला, तर खपवून घेणार नाही. हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवले जाते, त्यांचे धर्मपरिवर्तन करून आतंकवादी कारवाया करण्यासाठी वापर केला जातो. याचे उदाहरण म्हणजे ‘द केरल स्टोरी’ ! हा चित्रपट सर्वांनी पहायला हवा. एखाद्या प्रकरणात महिला अथवा मुली यांना फसवले जात आहे, असे लक्षात आले की, लगेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संपर्क करून कळवूया.

नगर येथील सीना नदीपात्रात धर्मांधांनी केलेले अतिक्रमण काढण्यास भाग पाडले ! – अमोल शिंदे, हिंदू जागरण मंच

लँड जिहादच्या माध्यमातून हिंदूंच्या भूमी बळकावल्या जात आहेत. नगर येथील सीना नदीपात्रात धर्मांधांनी असेच अतिक्रमण केले होते. आम्ही सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनास ते अतिक्रमण काढण्यास भाग पाडले. या संदर्भात आम्हाला बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागले. त्याचसमवेत स्वराज्याचे साक्षीदार गडदुर्ग यांवरही अतिक्रमण होत आहे. तरी याविषयी प्रत्येकाने जागृत रहावे.

सरकारने ‘हलाल प्रमाणीकरण’ पद्धत तात्काळ बंद करावी ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

मूलतः मांसाच्या संदर्भातील ‘हलाल’ची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था, मॉल अशा अनेक गोष्टींत केली जाऊ लागली आहे. त्यासाठी खासगी इस्लामी संस्थांकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक केले गेले आहे. भारतात मुसलमानांची लोकसंख्या केवळ १५ टक्के असतांना उर्वरित ८५ टक्के हिंदूंवर ‘हलाल प्रमाणपत्र’ का लादले जात आहे ? निधर्मी भारतात अशी धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जाणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून सरकारने ‘हलाल प्रमाणीकरण’ पद्धत तात्काळ बंद करावी आणि नागरिकांनी ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घालावा.

क्षणचित्रे

१. वेदमंत्र पठण करून अधिवेशनास प्रारंभ झाला.

२. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय संशोधित ‘गोमातेचे महत्त्व’, हिंदु जनजागृती समिती-निर्मित ‘मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम’, ‘हिंदु एकता दिंडी’ या विषयांवरील ध्वनीचित्रचकत्या दाखवण्यात आल्या.

३. अधिवेशनामुळे सर्वांना धर्मकार्यात सहभागी होण्यासाठी उत्साह वाटत होता.