रत्नागिरीतील अनधिकृत मजार १५ दिवसांत हटवा ! – मनसेची जिल्हाधिकार्‍यांना चेतावणी

(मजार म्हणजे मुसलमान फकिराचे थडगे)

लोकमान्य टिळक वाचनालयाच्या शासकीय जागेत ‘मजार’चे अनधिकृत बांधकाम

रत्नागिरी – शहरातील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या शासकीय जागेत ‘मजार’चे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. ‘या अतिक्रमणावर त्वरित कारवाई करून ते बांधकाम येत्या १५ दिवसांत हटवा, अन्यथा आम्ही तेथे गणपतीचे मंदिर बांधू’, अशी चेतावणी मनसेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश सौंदळकर यांनी प्रशासनाला दिली. याविषयीचे निवेदन मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना देण्यात आले. हा प्रकार मनसेचे विभाग अध्यक्ष श्री. अजिंक्य केसरकर यांनी श्री. सौंदळकर यांच्या निदर्शनास आणून दिला.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना मनसेचे श्री. अविनाश सौंदळकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. मनीष पाथरे, विभाग अध्यक्ष श्री.अजिंक्य केसरकर, विभाग सचिव श्री. सुशांत घडशी, श्री. प्रशांत कुडाळकर आणि शाखा अध्यक्ष श्री. साहिल वीर उपस्थित होते.

आदेश देऊनही ७ वर्षांनंतरही कारवाई नाही !

या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील रत्नागिरी-पावस रस्त्याच्या बाजूला गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवळ असणार्‍या लोकमान्य टिळक शासकीय ग्रंथालयाच्या जागेत ‘मजार’चे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून ते हटवण्याचा आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जून २०१६ मध्ये बांधकाम विभागाला दिला आहे. असे असतांनाही याविषयी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. (अनधिकृत मजारविषयी ७ वर्षे सुस्त असलेले प्रशासन चेतावणीनंतर तरी जागे होणार का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ?
  • ही अनधिकृत मजार उभी राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अनधिकृत मजार उभारणार्‍यांसह त्यास उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई करा !