गोवा : आसगाव येथे बनावट विक्री कराराद्वारे १२ मालमत्तांची विक्री केल्याचे उघड

गोव्यातील भूमी घोटाळा

गोवा : भूमी घोटाळा प्रकरण

म्हापसा, ९ एप्रिल (वार्ता.) – वर्ष १९५१ च्या विक्री करारामध्ये घुसडण्यात आलेल्या एका बनावट विक्री कराराद्वारे १२ मालमत्तांची विक्री केल्याचे उघड झाले आहे. वर्ष १९५१ मध्ये सिद्ध केलेल्या एका वारसाहक्क कराराचा उपयोग करून या सर्व मालमत्ता आंतोनियो फ्रान्सिको दिनीज या महिलेला विकण्यात आल्या. या मालमत्तांमध्ये सहमालक असलेले ज्येष्ठ नागरिक नेविस डिसोझा आणि अ‍ॅनाक्लेतो व्हिन्सेंट मोंतेरो हे त्यांच्या पूर्वजांची भूमी परत मिळवण्यासाठी लढा देत आहेत. या बनावट करारामधील त्रुटी खालीलप्रमाणे आहेत.

१. या १२ मालमत्ता आसगाव आणि पर्रा या गावांतील आहेत. बनावट सिद्ध केलेल्या करारामध्ये सर्वे क्रमांक ३९/६ या भूमीवर वारसाहक्क असलेले मिंगेल आर्कांजिओ डिसोझा एप्रिल १९५१ मध्ये मरण पावले. त्यानंतर ७ महिन्यांनी ते हयात असल्याचे दाखवण्यात आले.

२. वर्ष १९५१ मध्ये या भूमीचे सहमालक अ‍ॅनाक्लेतो व्हिन्सेंट मोंतेरो १५ वर्षांचे असतांना त्यांची या करारावर स्वाक्षरी घेण्यात आली.

३. जानेवारी २०२२ मध्ये मरण पावलेल्या ब्रांका दिनीज यांनी मार्च २०२२ मध्ये म्युटेशनसाठी अर्ज केला.

४. १७ मार्च २०२२ या दिवशी जाहीर नोटीस जारी केल्यानंतर १९ मार्च २०२२ या दिवशी १ आणि १४ उतार्‍यावर नावे असलेल्यांना टपालाने पत्रे पाठवण्यात आली.

५. ज्या वर्तमानपत्रामध्ये ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आल्याचे म्हटले आहे, त्या वर्तमानपत्राची प्रत या कागदपत्रांमध्ये नाही.

भूमी बळकावल्याच्या प्रकरणी पुढील मासात आरोपपत्र प्रविष्ट करणार  ! – पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन

भूमी बळकावल्याच्या प्रकरणी आरोपपत्र प्रविष्ट करण्याची प्रक्रिया पुढील मासापासून चालू केली जाणार असल्याचे विशेष अन्वेषण पथकाचे प्रमुख पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांची सांगितले. ते म्हणाले, ‘‘विशेष अन्वेषण पथकाने या प्रकरणी पुरेसे पुरावे गोळा केले असून या पुराव्यांच्या आधारे सक्षमपणे बाजू मांडली जाणार आहे.

पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन

आतापर्यंत करण्यात आलेल्या अन्वेषणाविषयी माहिती देणारी प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. विशेष अन्वेषण पथकाने केलेल्या अन्वेषणावर अभ्यास करणे, हे यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचे प्राधान्य असेल. यासाठी आयोगाला भूमी बळकावल्याच्या प्रकरणी अन्वेषण करणार्‍या पोलिसांची साक्ष आवश्यक आहे. विशेष अन्वेषण पथकाने केलेल्या अन्वेषणाच्या आधारे आयोग त्याचा अहवाल सरकारला सादर करणार आहे. विशेष अन्वेषण पथकाकडून सध्या ४४ प्रकरणांचे अन्वेषण चालू आहे. या प्रकरणी साक्षीदारांकडून चांगले सहकार्य मिळत आहे. काही स्टॅम्प पेपर आणि इतर पुरावे असून ते न्यायालयात सादर केले जाणार आहेत.’’