भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांना विचारला जाब !

कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तान्यांच्या निदर्शनांचे प्रकरण

नवी देहली –  कॅनडातील टोरंटो येथील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तान्यांनी काही दिवसांपूर्वी निदर्शने केली. यामुळे भारतीय उच्चायुक्तांना एका कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी जाता आले नाही. याविषयी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तालयाला नोटीस बजावून सुरक्षेविषयी निष्काळजीपणा केल्यावरून जाब विचारला आहे. तसेच याविषयी उच्चायुक्तांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने बजावलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, कॅनडाने व्हिएन्ना कराराविषयीच्या तरतुदींला लक्षात ठेवले पाहिजे. तसेच निदर्शने करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. आम्हाला आशा आहे की, कॅनडा सरकार आमच्या उच्चायुक्तालयातील अधिकार्‍यांच्या सुरक्षेविषयी योग्य पावले उचलेल, जेणेकरून ते मोकळ्या वातावरणात काम करू शकतील.

संपादकीय भूमिका

मागील काही दशके कॅनडा हा खलिस्तानी कारवायांचा अड्डा बनला आहे. हे लक्षात घेऊन भारताने नुसता जाब विचारून न थांबता तेथे फोफावलेला खलिस्तानवाद नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !