आपणच आतंकवादाची बीजे पेरली !

  • पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची संसदेत स्वीकृती !

  • पेशावर येथील मशिदीत झालेल्या आत्मघाती स्फोटाचे प्रकरण

पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ (डावीकडे)

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या पेशावर येथील मशिदीत नमाजपठणाच्या वेळी झालेल्या आत्मघाती बाँबस्फोटामध्ये ठार झालेल्यांची संख्या १०० झाली आहे. ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या आतंकवादी संघटनेने हा स्फोट घडवून आणला होता. याविषयी पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत ‘आपणच आतंकवादाची बीजे पेरली आहेत’, अशी स्वीकृती दिली. भारत आणि इस्रायल या देशांमध्येही प्रार्थना करतांना भाविक मारले गेले नाहीत; मात्र पाकिस्तानध्ये ते घडले आहे.

ख्वाजा असिफ यांनी वर्ष २०१० ते २०१७ या कालावधीतील आतंकवादी आक्रमणांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आतंकवाद्यांचे हे युद्ध पाकिस्तान ‘पीपल्स पक्षा’च्या काळात स्वात भागापासून चालू झाले, तर ‘पी.एम्.एल्.-एन्.’ या पक्षाच्या मागील सरकारच्या कार्यकाळात कराचीपासून ते स्वातपर्यंत पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित झाली. मला अधिक बोलायचे नाही; पण आपणच आतंकवादाची बीजे पेरली आहेत. आतंकवादापासून मुक्तता हवी असेल, तर आपण वर्ष २०११ ते २०१२ मध्ये जशी एकता दाखवली होती, अगदी तशाच एकतेची आज आवश्यकता आहे.

पाकने अमेरिकेच्या हितासाठी युद्ध लढू नये !

आसिफ पुढे म्हणाले की, महाशक्तीच्या हातातील बाहुले बनण्याची आपली (पाकची) जुनीच इच्छा होती. आता आतंकवादाच्या विरोधातील युद्धात पाकिस्तान एकटाच आहे. अमेरिकशी आपण चांगले संबंध ठेवले पाहिजेत; मात्र पाकने अमेरिकेच्या सांगण्यावरून त्याच्या (अमेरिकेच्या) हितासाठी युद्ध लढू नये. आपल्याला अफगाणिस्तानमध्ये सुधारणा हव्या आहेत.

आतंकवादी बनवणे, ही आपली सामूहिक चूक ! – पाकचे गृहमंत्री

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी संसदेत सांगितले की, मुजाहिदिन (अन्य धर्मियांशी लढणार्‍या योद्धे) सिद्ध करणे आणि त्यांच्यासमवेत जाऊन युद्ध करणे, ही सामूहिक चूक होती. आपल्याला मुजाहिदीन बनण्याची आवश्यकता नव्हती.

आम्ही मुजाहिदीन बनवले आणि नंतर ते आतंकवादी बनले. पाकिस्तान बर्‍याच काळापासून जगातील सर्वाधिक अमानुष आतंकवाद्यांचा आश्रयदाता बनला आहे. त्याचे मूल्य आपल्याला आता चुकवावे लागत आहे; कारण आतंकवादी आक्रमणे वाढतच आहेत. मागील इम्रान खान यांच्या सरकारने फाशीची शिक्षा झालेल्या ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या संघटनेच्या आतंकवाद्यांची सुटका केली होती.

संपादकीय भूमिका

पाकला ७५ वर्षांनी ही उपरती होऊन काहीही उपयोग नाही. त्यांनी निर्माण केलेला आतंकवादरूपी राक्षस आता त्यांचा बळी घेतल्याविना रहाणार नाही, हेच खरे !