पाकिस्तानमध्ये तीव्र होत आहे स्वतंत्र सिंधुदेशाची मागणी !

पाकिस्तानचे ४ भागांत तुकडे होण्याची शक्यता !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकिस्तानच्या सिंधमध्ये हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. याविरोधात तेथील हिंदूंनी संघटित होऊन आंदोलन चालू केले आहे. सिंध प्रांताला पुन्हा स्वतंत्र ‘सिंधुदेश’ बनवण्याच्या मागणीसाठी सिंधमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. गेल्या वर्षी येथे अशा प्रकारचा मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी तेथील हिंदूंनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अन्य नेते यांना सिंधला ‘सिंधुदेश’ बनवण्यासाठी साहाय्य करण्याची विनंती केली होती.

१. हिंदूंचे म्हणणे आहे की, सिंधुदेश झाल्यामुळेच सिंधमध्ये हिंदूंना रहाण्याचा अधिकार मिळेल. यासाठी पाकची फाळणी होणे आवश्यक आहे.

२. सिंधमधील लोकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या प्रांतावर इंग्रजांनी नियंत्रण मिळवले होते आणि वर्ष १९४७ मध्ये सिंधमधील लोकांची इच्छा नसतांना हा प्रांत अवैधरित्या पाकिस्तानला देण्यात आला होता.

३. येथील सिंध राष्ट्रवादी लोकांचे म्हणणे आहे, ‘महाभारतातील सिंधुदेशाप्रमाणे हा प्रांत पाकपासून स्वतंत्र होऊन एक देश बनला पाहिजे.’ यापूर्वी वर्ष १९६७ मध्ये सिंधुदेशाची मागणी मोठ्या प्रमाणात पुढे आली होती. जी.एम् सैयद आणि पीर अली महमद रश्दी यांनी याचे नेतृत्व केले होते. वर्ष १९७१ मध्ये पाकपासून बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर सिंध देशाची मागणी आणखी तीव्र झाली होती.

४. आता वर्ल्ड सिंधी काँग्रेस, सिंधुदेश लिबरेशन आर्मी, जय सिंधु स्टुडंट, सिंध नॅशनल मूव्हमेंट पार्टी आदी ही मागणी पुढे नेत आहेत.

५. सिंधुदेशाचे समर्थक आणि ‘जय सिंध फ्रीडम मूव्हमेंट’चे संस्थापक जफर साहितो यूरो यांनी सांगितले की, वर्ष १८४३ मध्ये ब्रिटीश सैन्याने आक्रमण करून सिंधुदेश कह्यात घेतला होता. ते जेव्हा भारतातून परत गेले, त्यानंतर आमचा देश आम्हाला द्यायला हवा होता. तो आमचा अधिकार होता. ब्रिटिशांनी पाकिस्तानची निर्मिती स्वतःच्या स्थार्थासाठी केली. सिंधचा राजा दाहिर याच्या कालखंडात, म्हणजे वर्ष ७११ मध्ये हा स्वतंत्र देश होता.

६. पाकच्या खैबर पख्तूनख्वा येथे अफगाणी, तर बलुचिस्तानमध्ये बलुची नागरिकांकडूनही स्वतंत्र होण्यासाठी काही वर्षांपासून सशस्त्र आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे ४ तुकडे होण्याचे संकट निर्माण झाले आहे.

संपादकीय भूमिका 

भारताने यासाठी सिंध प्रांतातील नागरिकांना साहाय्य करावे, असेच भारतियांना वाटते !