सरकारने ब्रह्मगिरी पर्वत हा ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर’ म्हणून घोषित करावा ! – छगन भुजबळ

  • त्र्यंबकेश्‍वर येथील पवित्र ब्रह्मगिरी पर्वतवरील अवैध उत्खननाचे प्रकरण

  • पर्वतावर अवैध बांधकाम करण्यावर बंदी घालण्याचीही मागणी

छगन भुजबळ यांनी ब्रह्मगिरी परिसरात पहाणी केली

नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर पसिराला पर्यावरण, पर्यटन अन् धार्मिक असे महत्त्व आहे. त्यामुळे कोणताही विकास करतांना पर्यावरणाला धोका पोचणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे; मात्र पर्यावरण आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ब्रह्मगिरी परिसरात नदीचे स्रोत नष्ट केले जात आहेत. ब्रह्मगिरी पर्वत पोखरून अवैध स्वरूपात बांधकाम केले जात आहे. त्यामुळे पर्यावरणाची, परिणामी सर्वच घटकांची मोठी हानी होणार आहे. त्यामुळे शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन हा परिसर ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील’ घोषित करावा, तसेच तेथे बांधकामबंदी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ५ जानेवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केली.

पर्यावरणवादी आणि साधू-महंत यांच्याकडून ब्रह्मगिरी परिसरातील अवैध उत्खननाविषयी आवाज उठवला जात आहे. याची नोंद घेत छगन भुजबळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात याविषयी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘या परिसरात उत्खनन करण्यात येणार नाही, तसेच उत्खनन केलेल्यांवर कारवाई करू’, असे आश्‍वासन दिले होते. याविषयी छगन भुजबळ यांनी प्रत्यक्ष ब्रह्मगिरी परिसरात पहाणी केली. या वेळी महंत गोपालदास महाराज यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, २० डिसेंबर २०२२ या दिवशी त्र्यंबकेश्‍वर येथील नदीपात्रात पर्यावरणाला बाधा निर्माण करणार्‍या बांधकामाची साधूंनी चिडून तोडफोड केली. ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन आणि नदीपात्रातील अवैध बांधकाम यांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये; म्हणून आंदोलन करणार्‍या पर्यावरणप्रेमी नागरिकांवर त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेने २२ डिसेंबर २०२२ या दिवशी भारतीय दंड विधान संहिता कलम ३५३ आणि ४२७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ब्रह्मगिरी पर्वत पोखरून उत्खनन चालू आहे. त्यामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून पशू-पक्ष्यांचे स्थलांतर होत आहे. उत्खननामुळे पर्वताच्या कडा कोसळून शहराला धोका निर्माण होणार आहे.