तेलंगाणाच्या धर्तीवर विकास करा किंवा तेलंगाणात जाऊ द्या ! – सीमावर्ती गावकर्‍यांची मागणी

नांदेड – जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील काही गावांनी तेलंगाणात जाण्याची मागणी केल्यानंतर आता बाजूच्या बिलोली तालुक्यातील कार्ला गावातील ग्रामस्थांनी ‘तेलंगाणाच्या धर्तीवर विकास करा किंवा तेलंगणात जाऊ द्या’, अशी मागणी केली आहे.

या गावातील लोकांना तेलंगाणात जाण्यास प्रवृत्त करण्यासाठी सीमावर्ती समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून तिच्या वतीने येत्या ५ डिसेंबरपासून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. देगलूर, बिलोली आणि धर्माबाद या ३ तालुक्यांतील सीमावर्ती गावांत या यात्रेच्या माध्यमातून तेलंगाणा आणि स्वतःच्या गावातील विकासाची तुलनात्मक बाजू गावकर्‍यांना समजावून त्यांना तेलंगाणात जाण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

या सीमावर्ती प्रश्न समन्वय समितीच्या संवाद यात्रेमुळे तेलंगाणात जाण्याची सीमावर्ती गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पुढील काळात आंदोलनेही होण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

  • आतापर्यंतच्या सरकारांनी जनतेत राज्याविषयी स्वाभिमान निर्माण न केल्याचा परिणाम !
  • विविध राज्यांच्या सीमावर्ती गावांनी अशा प्रकारे मागणी केली, तर ते योग्य होईल का ?