भटकी कुत्री सांभाळतांना इतरांना त्रास होऊ नये ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – भटक्या कुत्र्यांना पाळण्याचा असा अर्थ नाही की, तुम्ही त्यांना रस्त्यावर आणून लढा द्यावा, अथवा इतरांच्या दैनंदिन जीवनावर त्याचे दुष्परिणाम व्हावेत, असाही त्याचा अर्थ नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना सांभाळण्यासाठी न्यायालयीन संरक्षण मागण्यांसाठी करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात दुसरे खंडपीठ विचार करत असल्याने या याचिकेवर विचार करण्यास न्यायालयाने नकार दिला. ‘संबंधित खंडपिठाकडे याचिका प्रविष्ट करा’, असे न्यायमूर्ती एम्.आर्. शहा आणि न्यायमूर्ती एम्.एम्. सुंदरेश यांच्या खंडपिठाने याचिकाकर्त्यांच्या अधिवक्त्यांना सांगितले. मध्यप्रदेशातील समरीन बानो यांनी याचिका प्रविष्ट करून ‘राज्यात भटक्या कुत्र्यांना संरक्षण दिले जात नाही’, असा दावा केला होता, तसेच त्यांनी पाळलेल्या ६७ भटक्या कुत्र्यांसाठी संरक्षण मागितले होते.

संपादकीय भूमिका

  • मुळात भटक्या कुत्र्यांमुळे सर्वांनाच त्रास होतो, हे स्पष्ट आहे. देशात प्रतिदिन पाळीव असो कि भटकी कुत्री, ती अनेक लोकांना चावे घेत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय काढण्याची आवश्यकता आहे !