आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांकडून जाळपोळ

ठाणे, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – अनंत करमुसे या अभियंत्याला बंगल्यावर नेऊन त्यांच्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणामुळे, चित्रपटगृहात घुसून चित्रपट बंद पाडून प्रेक्षकावर आक्रमण केल्याच्या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड हे चर्चेत होते. त्यांनी १३ नोव्हेंबर या दिवशी मुंब्रा येथील उड्डाणपूल लोकार्पण सोहळ्यात एका महिलेला लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारे धक्का मारल्याने त्या महिलेने तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर आव्हाड यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. ‘माझ्यावर हा खोटा गुन्हा नोंदवण्यात आला आहे’, असे सांगत आव्हाड यांनी आमदारकीचे त्यागपत्र देण्याची घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर जाळपोळ करत रस्ता अडवला. सकाळीच हा प्रकार झाल्याने बाह्यवळण रस्त्यावर काही काळ वाहतूककोंडी झाली. या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आव्हाड यांची ही कृत्ये राज्यघटनाविरोधी नाहीत का ? – नागरिकांचा प्रश्न

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असतांना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर अनंत करमुसे यांना बेदम मारहाण झाली होती. त्यानंतर आता ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पडल्यावर ‘तिकिटाचे पैसे कोण देणार ?’, असा रास्त प्रश्न विचारणार्‍या प्रेक्षकांवर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले. आव्हाड यांची ही कृत्ये राज्यघटनाविरोधी नाहीत का ? ही लोकशाहीची हत्या नाही का ?’, असे प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

आव्हाडप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस गप्प का ? – भाजप

‘आव्हाड आज तथाकथित अन्यायाच्या विरोधात ओरडत आहेत. अनंत करमुसे यांच्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी आव्हाड क्षमा मागणार का ? या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस गप्प का आहे ?’ असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

संपादकीय भूमिका

जाळपोळ करून सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्‍या अशा गुंडांकडून ही हानीभरपाई वसूल केली पाहिजे !