विवाहाच्या प्रसंगी शास्त्रानुसार सात्त्विक आणि भावपूर्ण कृती करून आनंद घेणारे पुणे येथील श्री. सुमित आणि सौ. उन्नती सुमित खामणकर !

‘कार्तिक कृष्ण सप्तमी (१५.११.२०२२) या दिवशी पुणे येथील श्री. सुमित आणि सौ. उन्नती सुमित खामणकर यांच्या विवाहाला २ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांनी विवाहसोहळा शास्त्रानुसार आणि आश्रमातील वातावरणाप्रमाणे व्हावा, यासाठी केलेले प्रयत्न अन् विवाहसोहळ्याच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. सुमित आणि सौ. उन्नती सुमित खामणकर यांना विवाहाच्या द्वितीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

श्री. सुमित आणि सौ. उन्नती खामणकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्रीमती सुरेखा कदम

१. ‘श्री. सुमित माझ्याशी मुलाप्रमाणे वागतात. त्यांना कुणाकडूनही अपेक्षा नसतात. त्यांच्यातील गुणांमुळे त्यांच्याशी मोकळेपणाने बोलता येते. ‘आमचे नाते पुष्कळ जुने आहे’, असे मला वाटते.

२. मुलगी आणि जावई दोघेही सेवा अन् साधना यांना प्राधान्य देतात. ते एकमेकांना साधनेत साहाय्य करतात. मला दोघांकडून शिकता येते.

‘दोघेही लवकरात लवकर आध्यात्मिक प्रगती करून अखंड साधनारत राहोत’, अशी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करते.’

१. सौ. उन्नती सुमित खामणकर (पूर्वाश्रमीच्या कु. अश्विनी कदम)

सौ. उन्नती सुमित खामणकर

१ अ. विवाहाच्या दिवशी आश्रमात होणार्‍या विवाहाप्रमाणेच सिद्धता आणि सात्त्विक सजावट करणे, सनातनच्या ग्रंथांत सांगितल्यानुसार वेशभूषा आणि केशभूषा करणे अन् त्यामुळे ‘विवाहसोहळा आश्रमातच साजरा झाला आहे’, असे वाटणे

‘आमची (मी आणि माझे यजमान श्री. सुमित यांची) आश्रमात विवाह करण्याची इच्छा होती; परंतु कोरोना महामारीमुळे ते शक्य झाले नाही. विवाहाच्या दिवशी आश्रमात जशी सिद्धता आणि सात्त्विक सजावट असते, तशीच सिद्धता देवाने आमच्याकडून करून घेतली. विवाहाच्या आदल्या दिवशी आणि विवाहाच्या दिवशी मी सिद्ध होतांना सनातनच्या ग्रंथांत (कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ? केशरचना कशी असावी ? मेंदीच्या सात्त्विक कलाकृतींचे प्रकार, बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार, कंठभूषणांपासून मेखलेपर्यंतचे अलंकार) सांगितल्यानुसार करायचे प्रयत्न केले. त्यामुळे आम्हाला आध्यात्मिक स्तरावर लाभ अनुभवता आला. काही साधकांनी विवाहाची छायाचित्रे पाहून विचारले, ‘‘कोणत्या आश्रमात लग्न झाले ?’’ तेव्हा

‘श्री गुरूंच्या चरणी सर्व पोचले’, असे वाटून माझी श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

१ आ. विवाह सोहळ्याच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

१. ‘विवाह सोहळ्याच्या वेळी देवता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून उपस्थित आहेत अन् ते आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले.

२. मंगलाष्टके चालू असतांना मला ‘डोक्याच्या मध्यभागातून संपूर्ण देहात चैतन्य जात आहे’, असे प्रकर्षाने जाणवले. तेव्हा माझा भाव जागृत होऊन मला आनंद आणि शांती अनुभवता आली. त्या वेळी ‘हा सोहळा अन्य लोकांत होत आहे’, असेही अनुभवता आले.

१ इ. विवाह सोहळ्याला उपस्थित असलेले नातेवाईक आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

१. आमच्या विवाह सोहळ्यासाठी काही नातेवाईक आणि समाजातील काही व्यक्ती उपस्थित होत्या. त्या सर्वांनी सांगितले, ‘‘आम्ही आतापर्यंत असा विवाह सोहळा कधीही पाहिला नाही. सर्वकाही शांततेत पार पडले. आम्हा सर्वांना आनंद घेता आला.’’

२. माझ्या माहेरच्या घराशेजारी रहाणार्‍या एका व्यक्तीने सांगितले, ‘‘माझ्या मुलीच्या लग्नातही मी जितका आनंद घेतला नाही, तेवढा आनंद मला या विवाहाच्या दिवशी मिळाला.’’

३. उपस्थित साधकांनाही ‘हा सोहळा आश्रमातच चालू आहे’, असे वाटले.

२. श्री. सुमित खामणकर

श्री. सुमित खामणकर

‘विवाहातील सर्व कृती सात्त्विक होण्यासाठी माझ्याकडून गुरुदेवांना सातत्याने प्रार्थना होत होती. मला प्रत्येक विधीतून चैतन्य मिळत होते. लग्न झाल्यानंतर मंडपातून निघतांना सौ. उन्नतीने नातेवाइकांना सांगितले, ‘‘कुणीही रडू नका. मी एका आश्रमातून दुसर्‍या आश्रमात जात आहे.’’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (२४.११.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.