(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घाला !’  

  • केरळ राज्यात धार्मिक द्वेष निर्माण होण्याच्या शक्यतेवरून काँग्रेसची मागणी

  • पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर चित्रपटाच्या विरोधात गुन्हा नोंद !

  • चित्रपटात केरळमधील ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी बनवल्याचा दावा !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या आगामी ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटावर राज्यातील काँग्रेसकडून बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी केरळच्या पोलीस महासंचालकांनी थिरूवनंतपूरम् शहराच्या पोलीस आयुक्तांना या चित्रपटाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला होता. चित्रपटात केरळमध्ये आतंकवाद्यांना आश्रय दिला जात असल्याचे दाखवण्यात आल्याने हा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर चित्रपटाशी संबंधितांवर ‘कलम १५३ अ आणि ब’ या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. ३ नोव्हेंबरला या चित्रपटाचा संक्षिप्त भाग (टीझर) प्रदर्शित करण्यात आला होता. त्यात म्हटले होते की, केरळमध्ये ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी बनवण्यात आले आहे.

३२ सहस्र तरुणींविषयी केंद्रीय यंत्रणांकडे माहिती असेल, तर ती सार्वजनिक करावी ! – काँग्रेस

काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षेनेते व्ही.डी. सतीसन् म्हणाले की, या चित्रपटाद्वारे चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे त्यावर बंदी घातली पाहिजे. मी या चित्रपटाचा ‘टीझर’ पाहिला आहे. केरळमध्ये असे काहीही होत नाही. अन्य राज्यांसमोर केरळची प्रतिमा अपकीर्त करण्याचा प्रयत्न होत आहे. याद्वारे द्वेष पसरवला जात असल्याने या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. कोणत्याही चित्रपटावर बंदी घालण्याच्या आम्ही नेहमी विरोधात असतो; मात्र या चित्रपटात चुकीची माहिती देण्यात आल्याने धार्मिक तणाव निर्णाण होईल. राज्यातील पोलिसांकडे ३२ सहस्र तरुणींविषयी अशा प्रकारची कोणतीही माहिती नाही. जर केंद्रातील गुप्तचर यंत्रणांकडे केरळमधील तरुणींची आतंकवादी संघटनेत भरती केल्याची काही माहिती असेल, तरुणींची नोंद असेल किंवा पत्ता असेल, तर ती माहिती त्यांनी सार्वजनिक केली पाहिजे.

‘टीझर’मध्ये काय दाखवले आहे ?

‘द केरल स्टोरी’च्या प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘टीझर’मध्ये एका तरुणीला बुरख्यामध्ये दाखवण्यात आले आहेत. ती म्हणते, ‘‘माझे नाव शालिनी उन्नीकृष्णनन् होते. मला परिचारिका बनून लोकांची सेवा करायची होती. मी आता फातिमा बनले आहे. मी इस्लामिक स्टेटची एक आतंकवादी असून आता अफगाणिस्तानच्या कारागृहात आहे. मी एकटी नाही, तर यापूर्वी माझ्याप्रमाणे धर्मांतरित झालेल्या ३२ सहस्र तरुणींना सीरिया आणि येमेन या देशांतील वाळवंटात पुरण्यात आले आहे. एका सामान्य मुलीला आतंकवादी बनवण्याचा धोकादायक खेळ केरळमध्ये चालू आहे आणि तोही उघडपणे. कुणी हे थांबवले का ? ही माझी गोष्ट आहे. ही त्या ३२ सहस्र तरुणींची गोष्ट आहे. ही ‘द केरल स्टोरी’ आहे.’’

‘द केरल स्टोरी’ चे ‘टीझर’ सौजन्य: Sunshine Pictures

संपादकीय भूमिका

  • केरळमधून हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींना ‘लव्ह जिहाद’द्वारे जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करून त्यांना इस्लामिक स्टेटमध्ये भरती करण्यात आल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. त्याविषयी काँग्रेसने आतापर्यंत तोंड का उघडले नाही ?, हे ती सांगेल का ?
  • हिंदूंनी हिंदुविरोधी चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली की, लगेच  व्यक्तीस्वातंत्र्य आठवणारी काँग्रेस आता मुसलमानांसाठी त्याच व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करत आहे, हे लक्षात घ्या !