आंबेत पुलाचे काम ८ दिवसांत चालू करा ! – पालकमंत्री उदय सामंत

३ वर्षांपासून पूल नादुरुस्त असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

उदय सामंत

रायगड – रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणार्‍या आंबेत पुलाच्या कामाची निविदा सतत पुढे ढकलली जात आहे. याविषयी चौकशी करावी लागेल. श्रेयवादातून निविदा प्रक्रिया पुढे जात असेल, तर ते चुकीचे ठरेल. निविदा प्रक्रिया रखडल्याने जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. निविदा प्रक्रिया आजच पूर्ण करून ८ दिवसांत पुलाचे काम चालू करा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील अधिकार्‍यांना दिली आहे. ३१ ऑक्टोबर या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात आंबेत पुलाविषयी संबंधित अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या वेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र धोरवे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आणि संबंधित अधिकारी  उपस्थित होते.

मागील ३ वर्षांपासून आंबेत येथील पूल नादुरुस्त झाला आहे. या पुलावर आतापर्यंत साडे सोळा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत; मात्र अद्यापही हा पूल वाहतुकीस बंद आहे. त्यामुळे प्रवाशी नाराज आहेत.