बलात्कारानंतरच्या कौमार्य चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी !

नवी देहली – बलात्कार आणि लैंगिक शोषण यांप्रकरणांमध्ये करण्यात येणार्‍या कौमार्य चाचणीवर (टू फिंगर टेस्ट) सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. यासह अशा प्रकारची चाचणी करणार्‍यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले जाईल, असेही स्पष्ट केले.

१. न्यायालयाने म्हटले की, या न्यायालयाने वारंवार बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणांत कौमार्य चाचणी करण्यास नकार दिला आहे. या चाचणीला कोणताही आधार नाही. याउलट पीडित महिलेवर पुन्हा अत्याचार करण्यासारखे आहे. तिला अजून एक मानसिक धक्का देण्यासारखे आहे. ही चाचणी केली जाऊ नये.

२. न्यायालयाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला बलात्कार आणि लैंगिक शोषण यांतील पीडितांची कौमार्य चाचणी केली जाणार नाही, याची काळजी घेण्याचा आदेश दिला आहे. तसेच केंद्र सरकारसह राज्य सरकारांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूचना सर्व सरकारी अन् खासगी रुग्णालयांमध्ये पाठवण्याचा आदेश दिला आहे.

३. न्यायालयाने पीडित महिलांची योग्य चाचणी व्हावी, यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांची कार्यशाळा घेण्याचीही सूचना केली. यासह वैद्यकीय अभ्यासक्रमांची चाचपणी करण्यास सांगितले आहे. जेणेकरून बलात्कार किंवा लैंगिक शोषण पीडित महिलांची तपासणी करतांना कौमार्य चाचणी एक प्रक्रिया म्हणून मान्य केली जाणार नाही.