राष्ट्र्रभाव : भारतीय संस्कृती, म्हणजेच हिंदु संस्कृती !

१. विविध पंथ, संप्रदाय, संस्कृती आणि मते यांना सामावून घेणार्‍या हिंदु धर्माचे अद्वितीयत्व ख्रिस्ती प्रचारकाने मान्य करणे

‘भारतीय संस्कृतीची ‘स्वीकार’ आणि ‘समन्वय’ यांची परंपरा प्राचीन काळापासूनच आहे. या संस्कृतीने द्वैत, अद्वैत, विशिष्ट द्वैत, सगुण, निर्गुण, आस्तिक, नास्तिक (चार्वाक, बुद्ध), वेद हे अर्थहीन असल्याचे मत, बौद्ध आणि जैन मते अशी सर्व प्रकारची उलटसुलट अन् काही परस्परविरोधी मते सामावून घेतली आहेत. येथील आध्यात्मिक विचारांमध्ये द्वैतवादी आणि अद्वैतवादी आदी अनेक पंथ आहेत. जोन्स स्टॅन्ले या अमेरिकी ख्रिस्ती प्रचारकाने ‘द रोल ऑफ ख्राईस्ट’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘हिंदुस्थानात उपासनेच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत, तरीही प्रत्येक व्यक्ती स्वत:ला हिंदु म्हणवतो. कुणी भूत-प्रेत, पिशाच्च यांना मानतात, तर कुणी दगड, वृक्ष यांची पूजा करतात, तर काही जण गंगेच्या किनारी बसून आत्मा-परमात्मा-परब्रह्म यांची चर्चा करतात. तरीही सर्व जण स्वत:ला ‘हिंदु’ म्हणवतात.’ स्टॅन्ले त्यांच्या ख्रिस्ती पाद्रयांना सावध करतांना म्हणतात, ‘हिंदुत्वाच्या या ऑक्टोपस (एक समुद्री जीव) पासून सावधान रहा, नाहीतर आपल्या येशूलाही ते व्यापून टाकतील.’ स्टॅन्लेचा उद्देश वेगळा होता. हिंदूंची कुणालाही एकरूप करून घेण्याची जी प्रक्रिया आहे, त्याचे योग्य स्वरूप आणि आकलन न झाल्याने त्याने विकृत उदाहरण दिले. तरीही त्यांनी हिंदुत्वाला ऑक्टोपसची दिलेली उपमा एका अर्थाने खरी आहे; कारण कोणत्याही गोष्टीला आत्मसात् करणे, ही हिंदूंची प्रारंभापासून परंपरा राहिली आहे. हिंदु हा शब्द जातीवाचक आणि संप्रदायवाचकही नाही. अनादि काळापासून या समाजाने अनेक संप्रदायांना जन्म दिला आहे, तसेच अनेक संप्रदायांना सामावूनही घेतले आहे.

२. हिंदु धर्म हा सर्व पंथ आणि संप्रदाय यांचा एक संघ असणे

‘हिंदुत्व आणि भारतीयत्व हे समानार्थी शब्द आहेत’, असे खुद्द स्व. बाळासाहेब देवरस यांनी म्हटले होते. याचाच अर्थ भारत किंवा भारतीय या शब्दांची कितीही ओढाताण केली, तरी त्यातून ‘हिंदु’ खेरीज शेवटी कोणताच अर्थ निघत नाही. घटनाकारांनीही राज्यघटनेत भारतीय शब्दाऐवजी ‘हिंदु कोड बिल’ असा शब्दप्रयोग केला आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

दुसरे सूत्र असे की, हिंदूंमध्ये धर्माविषयी कोणताही मागासलेपणा नाही. भारतात विविध प्रकारचे संप्रदाय आहेत आणि ३३ कोटी देवतांचा येथे निवास आहे. त्यामुळे यांत आणखी एक अल्ला आणि येशू यांची भर पडली, तर काहीच फरक पडणार नाही. ‘हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे. तो एका विशिष्ट स्वरूपाचा विचार नाही, ती एक वाटचाल आहे. स्थिर अवस्था नाही, तर एक प्रक्रिया आहे. सत्याचे ठराविक दर्शन नाही, तर एक विकसित परंपरा आहे’, असे भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांच्या ‘दि फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम’ (१९२६) या पुस्तकात हिंदूंचे वर्णन केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ‘हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे’, असे प्रतिपादन केले आहे. हिंदु हा सगळ्या धर्माचा संघ आहे (पार्लमेंट ऑफ रिलिजन्स). इस्लाम, ख्रिस्ती, यहुदी हे सगळे पंथ किंवा संप्रदाय आहेत आणि त्यात साम्यवादाचीही भर पडली आहे. एक ग्रंथ, एक प्रेषित, एक उपासना पद्धती असे मानणारे हे सर्व संप्रदाय आहेत. हिंदु नावाचा कोणताही संप्रदाय नाही, तर हिंदूंचे अनेक संप्रदाय आहेत.

३. हिंदु धर्मात अन्य पंथियांना आदराची वागणूक देण्यात येणे

श्री. रवींद्र साठे

हिंदूंच्या मनात अन्य संप्रदायांसाठी नेहमीच समान आदराची भावना राहिली आहे. येथील मुसलमान कुराण वाचू शकतात. मशिदीत जाऊ शकतात. धार्मिक नेता म्हणून पैगंबराचे स्मरण करू शकतात. तसेच ख्रिस्ती त्यांच्या बायबलचे पठण करू शकतात आणि गिरिजाघरात (चर्चमध्ये) जाऊ शकतात. येथे सर्वांना उपासना स्वातंत्र्य आहे; परंतु हे राष्ट्र एक आहे, हे राष्ट्र माझे आहे आणि आपले पूर्वज एक आहेत अन् जे जे राष्ट्रीय आहे, ते आपले आहेत, हे म्हणतांना कुणाला संकोच वाटण्याची आवश्यकता नाही. एक संस्कृती म्हणतो, तेव्हा हे अभिप्रेत आहे. यांत कोणत्याही प्रकारचे एकारलेपण उद्भवत नाही.

४. भारतात रहाणार्‍या प्रत्येकाने या देशाचे राष्ट्रीयत्व स्वीकारणे आवश्यक !

आज अमेरिकेत रहाणार्‍यांनी समजा असे म्हटले, ‘मी राष्ट्रीय आहे; परंतु जॉर्ज वॉशिंग्टन, जेफरसन आणि लिंकन यांना अशासाठी मानणार नाही; कारण ते मुसलमान किंवा  हिंदु नाहीत, तर ते म्हणणार्‍यांना तेथील राष्ट्रीय म्हणण्याचा अधिकार रहात नाही.’ पंथ म्हणून इस्लाम, शैव, वैष्णव तुम्ही कुणीही असाल; परंतु अमेरिकेत राष्ट्रीय म्हणून ज्यांना रहायचे असेल, त्यांना तेथील राष्ट्रीय मानबिंदू, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे घोषणापत्र, राज्यघटना, तेथील राष्ट्रीय ग्रंथ यांना मानावे लागते. जो असे मानणार नाही, त्याला अमेरिकेत राष्ट्रीय होण्याचा अधिकार उरत नाही. फ्रान्समध्येही ‘द गॉल’ यांना तेथील यच्चयावत नागरिकांनी आपला पूर्वज मानावे, ही अपेक्षा फ्रान्स सरकारने व्यक्त केली आहे. जे नियम अमेरिकेत लागू आहेत, जे फ्रान्समध्ये आहेत, तीच अपेक्षा भारतातील सर्व धार्मिक नागरिकांकडून आहे, यात चुकीचे काहीच नाही.

५. ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तेवढे मार्ग’ असल्याने हिंदु धर्म इतरांवर थोपवण्यात न येणे

आणखी एक सूत्र असे की, ‘रिलिजन’ (पंथ) आणि राष्ट्रीयता या वेगळ्या गोष्टी आहेत. ‘रिलिजन’, म्हणजे मनुष्य आणि त्याच्या निर्मात्यामधील संबंधाचे नाव आहे (रिलिजन इज रिलेशनशिप बिटविन् अ मॅन अँड हिज मेकर). मनुष्य बनवणार्‍याला कुणी अल्ला, ईसा मसिहा, कुणी जव्होवा किंवा स्वर्गात रहाणारा पिता म्हणेल, कोणत्याही नावाने संबोधित करेल; परंतु ‘रिलिजन’, म्हणजे मनुष्यप्राणी आणि ईश्वर यामधील संबंधांचे नाव आहे. ‘रिलिजन’ ही सर्वार्थाने व्यक्तीगत गोष्ट आहे. आपल्या देशात सर्वांचा ‘रिलिजन’ एक झाला पाहिजे, असे आपण कधी मानले नाही; कारण ते अशास्त्रीय आहे. ‘‘रिलिजन’ व्यक्ती आणि परमेश्वर यांच्यामधील संबंध आहे, तर प्रवृत्ती, रुची, प्रकृती, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तराच्या विभिन्नतेमुळे व्यक्ती-व्यक्तीत भिन्नता असल्यामुळे सर्वांचा ‘रिलिजन’ एक होऊ शकणार नाही’, असे हिंदु चिंतन म्हणते. त्यामुळे आपल्या देशात सर्वांसाठी एक ग्रंथ, एक धर्मगुरु, एक उपासना पद्धती आणि एक द्वंद्वात्मकता मानली गेली नाही. येथे आम्ही म्हणतो, ‘जितक्या रुची प्रवृत्ती आहेत, तितके मार्गही आहेत.’ येथे उपासना पद्धतीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. सगळ्यांचे गंतव्य स्थान एक असूनही दिशा विविध असू शकतात. शिवमहिम्न स्तोत्रात याचे वर्णन करणारा श्लोक आहे.

रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिल नानापथजुषां
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव ॥

– शिवमहिम्नस्तोत्र, श्लोक ७

अर्थ : हे परमेश्वरा, ज्याप्रमाणे पाण्याच्या विविध प्रवाहांचे समुद्र हेच अंतिम गंतव्य स्थान आहे, त्याप्रमाणे आपापल्या प्रकृती आणि स्वभावानुसार वेगवेगळ्या मार्गाने उपासना करणार्‍यांचे अंतिम गंतव्य स्थान आपणच आहात.

६. विजेत्यांना नेहमी पराभूत राष्ट्राच्या श्रेष्ठ संस्कृतीपुढे नमावे लागणे, हा इतिहासाचा सनातन नियम !

भारतीय संस्कृतीची ही विशेषत: आहे की, तिने सर्वांना सामावून घेतले आहे. त्यात येथील मुसलमान आणि ख्रिश्चन यांचाही समावेश आहे. जहांगीर आणि शाहजहां यांच्या काळात रामायण, महाभारत, अथर्ववेद, योग वशिष्ठ आदी हिंदु ग्रंथांचे फारसी भाषेत अनुवाद करण्यात आले होते. पुढे हे ग्रंथ वाचून मुसलमानांचे हिंदुकरण होत आहे, असे औरंगजेबाला वाटले आणि त्याने त्याचा मोठा भाऊ दारा शुकोह याला अर्धा हिंदु असल्याच्या संशयावरून ठार मारले. ‘या देशात मुसलमान नावाने विभिन्न जाती आल्या होत्या आणि त्यांचे हिंदुकरण होऊ लागले होते’, याचे विवरण प्रत्यक्ष कार्ल मार्क्सने दिले आहे. १२ जुलै १८५३ या दिवशी लंडनहून लिहिलेल्या पत्रामध्ये मार्क्स म्हणतो की, अरब, तुर्क आणि मोगल यांनी हिंदुस्थान पादाक्रांत केला असला, तरी शीघ्र त्यांचे हिंदुकरण झाले आहे. इतिहासाचा हा सनातन नियम आहे की, विजेत्यांना नेहमी पराभूत राष्ट्राच्या श्रेष्ठ संस्कृतीपुढे नमावे लागते. यासाठी त्यांनी पुढे रोमन साम्राज्याचे उदाहरण दिले आहे. त्यामुळे सांस्कृतिक दृष्टीने जेरुसलेमने रोमन लोकांवर विजय मिळवला आणि रोमन लोकांना जेरुसलेमच्या ख्रिश्चन लोकांची संस्कृती स्वीकारावी लागली.’ भारतात ही प्रक्रिया चालू होती; परंतु पुढे ब्रिटिशांची राजवट, त्यांची ‘फोडा आणि झोडा’ ही नीती, मुसलमान समाजातील धर्माधता आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकीय पक्षांचे अल्पसंख्यांकांच्या मतपेढीचे राजकारण यांमुळे यांत खंड पडला.

७. भारतीय संस्कृतीप्रमाणे काळानुसार समाजात होणार्‍या परिवर्तनाची प्रथा ९ व्या शतकानंतर संपुष्टात येणे

‘येथे केवळ भारतीय संस्कृतीच’ असे जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याचा असा अर्थ अभिप्रेत असतो की, येथे रहाणार्‍या प्रत्येक व्यक्तीला उपासना आणि विकास करण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु त्यांच्या मनात भारतीय राष्ट्राच्या प्रति एकात्मतेचा भाव असणेही तितकेच महत्त्वपूर्ण अन् आवश्यक आहे. हे खरे आहे की, मध्यंतरीच्या काळात आपल्या समाजव्यवस्थेत दोष निर्माण झाले आणि समाजातील काही घटकांवर अन्याय झाला, हे मान्य करावे लागेल. भारतीय संस्कृतीमध्ये सातत्याने पालट होत जातात आणि त्यामुळे कालमानानुसार समाज पालटतो; परंतु ही प्रथा ९ व्या शतकानंतर संपुष्टात आली, हे आपल्या देशाचे दुर्दैव होय.’

– श्री. रविंद्र माधव साठे, महासंचालक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सचिव, सावरकर दर्शन प्रतिष्ठान

(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’)

संपादकीय दृष्टिकोन 

भारतीय संस्कृती म्हणजे भारतात रहाणार्‍यांच्या मनात राष्ट्राप्रतीचा एकात्मतेचा भाव असणे महत्त्वपूर्ण !